गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

 <<<<<<<<<<<<<<<<  शर्यत  दोन   पिढ्यांची   >>>>>>>>>>>>>>>>>>>>>
.
.                   .फटफटी  कशीबशी  उभी  करून , अंगणातूनच  हाका  देत  , सर्जेराव  घरात  घुसला  . "" आबा sssssओ   आ ssबा  ""  ओटीवर  , कणग्याच्या  खोलीत  , सगळी  कडे तो  फणफणत  फिरत  होता  . त्याचा  आवाज  ऐकून  आतल्या  घरातून  मालती  लगबगीने  पाण्याचा  तांब्या  आणि  फुलपात्र  घेऊन  आली  . 
                   . सर्जेराव  घामाने  थबथबला  होता . शर्ट  अंगाला  चिकटला  होता .  डोक्यावरचे  केस  ओले  गच्च  होऊन  कपाळाला    चीपकले  होते  . घाम  पुसायचं  ही  त्याला  भान नव्हतं .रागाने  लाल पिवळा  झाला  होता . सापासारखे फुस्कारे  सोडत  होता .  काहीतरी  त्रांगड  झालंय  हे मालतीच्या  लक्षात  आल  .अशावेळी  नवऱ्या  पासून   कासराभर  दूरच  राहायचं  एवढ ती अत्तापोतूर  शिकली  होती  . तांब्या भांड  तिथेच  टेबलावर  ठेवून  , शिवल्या  ओठाने  ती  आत  गेली  .
                 , तिची  सासू  मान  उंचावून   चाहूल  घेतच  होती  . ""  काय  झालं  ग  सर्ज्याच  ? "" तिने  विचारलं  . "" काय  की  ? ""  मालतीने   खांदे  उडवले  . सासू  पदराने  घाम  पुसतच  चुली  समोरून  उठली  . मालतीने तिची  जागा  घेतली  . तिचे हात चालू  होते आणि  कान  बाहेरच्या   संभाषणाकडे  लागले  होते .
.                .सर्जेरावाच्या  हाका  चालूच  होत्या  . ""  आर , गप  गप  ! काय  आग  लागलीय  का  गावाला  ? ""
                 "" आग  माझ्या  कलेजाला  लागलीय . आबान  तो  ओढ्या  पल्याडला  बागायातीचा  तुकडा  कवडीमोलान  फुकून   टाकलान ग ! आणि  सर्वे  पैशे   घेऊन  आज  बाजाराला  गेलाय  ! "" सर्जेराव वेडापिसा झाला  होता .
.              ""  आर  , माझ्या  कर्मा ! कुटून  ही  अवदसा   आठवली  ? कली  शिरलाय   रं  माझ्या  सौन्सारात  !  हा सैतान  आता  सगळ्याची  बरबादी   करूनच  शांत  होणार  रं बाबा  !! "" आईन  बसकण  मारली . तिचे  डोळे  पाझरायला   लागले  होते  . सर्जेराव  पण   हातापायातली   शक्ती  गेल्या  सारखा  , झोपाळ्यावर  कोलमडला  . तिकडे  चुलीतला  धूर  डोळ्यात  गेल्याचं  निमित्त  करून  मालती  पण  वाहणारे  डोळे  पुसत  होती . सर्जेरावाच्या  डोक्यात  विचारांची  मळणी  चालली  होती  .
                आबा  आधी  असे  नव्हते  . आजोबा  आजी  गेले  ; सर्व  सत्ता  त्यांच्या  हातात  आली आणि  आबांना  बैलगाडा  शर्यतीचा  नाद  लागला  . शर्यती  साठी  लागणारे  बैल  अस्सल   खिलारी   , सुलक्षणी   असतात  . त्यांची  अंगकांती  , वेलांटी  सारख  कमानदार  वशिंड , टोकदार , कंस करणारी  एकसारखी  देखणी  शिंगं , भक्कम   सडसडीत   पाय , भेदक  तेज  डोळे  ; असा  बत्तीस  लक्षणी  बैल  शोधून  शोधून   मिळवावा  लागतो  . अशा  बैलाची  किंमत  पण  लाखात  असते  . आबांना  बैलाची  पारख  उत्तम  होती  . सिझनला  सात  आठ  शर्यती  तरी  आबा  जिंकायचे  . 
                ह्या  बैलांचा  राजेशाही  थाट  असतो  . खूप  निगुतीन  , डोळ्यात  तेल  घालून  त्यांची  बडदास्त  ठेवावी  लागते .खास  खुराक  द्यावा  लागतो  . काटक ,चपळ  झाले  पाहिजेत  पण  स्थूल  , जाडे  होता कामा  नयेत. आबा  सगळं  जातीने  करायचे .. तरुण  असताना  ते  स्वतः  धुऱ्यावर  उभे  राहून  रिंगी  पळवायचे . त्या साठी  ते  स्वतःची  पण  काळजी  घ्यायचे  . खाण्यापिण्याची  बंधनं , व्यायाम  ह्या  बाबतीत  त्यांनी  कधी  हयगय  केली  नाही . धुरकरी  पण  कमी  वजनाचा  , काटक  , बलवान  हवा  . उधळलेले  बैल  आवरायची  ताकद  त्याच्या  मनगटात  हवी  . 
             शर्यतीच्या  वेळी  सुद्धा  वीस  पंचवीस  माणसांची  गरज  पडायची  .ही   माणस  सांभाळून  ठेवावी  लागायची . बैलांना  टेम्पोत  चढवायचं , उतरवायचं. त्यांना  उन्माद  चढावा ; धुंदी  चढावी  म्हणून  वाजंत्री वाले  लागायचे . फुरफुरणाऱ्या  बैलांना  आवरण्यासाठी  धडधाकड   आठ  दहा  माणस लागायची  . आणि  जर  शर्यत  जिंकली  तर  शेमले  फडकावत , गुलाल  , भंडारा  उडवत , ""   यळकोट    यळकोट  जय  मल्हार "  करत  ; विजय ध्वज  नाचवत मिरवणूक  काढायला  माणसांचा  ताफा  लागायचा  . त्यांच्यावर  उधळायला   नोटांची  थप्पी  लागायची  .
           सर्जेराव  मोठा  व्हायला  लागला  तेव्हां  एक गोष्ट  त्याच्या  लक्षात  आली . मोसमात  सात  आठ  बक्षिसं  मिळाली  तरी बैलांचा  खर्च  भरून  यायचा  नाही  . शर्यतीच्या  आधी  बैलांना  दारू  पाजायचे  .ते सावध व्हावेत  , संतापाने  वेडेपिसे  व्हावेत , असह्य  यातना  व्हाव्यात म्हणून  त्यांना  काठीने , चाबकाने   बेदम  मारले  जायचे .पराणी  मारणे , कानाजवळ  खिळ्यांची  पिंजरी बसवण ,  इलेक्ट्रिक   शॉक देणं  हे  तर  सर्रास  चालायचं  .सर्जेरावाला  हा  क्रूरपणा  सहन  होत  नव्हता  . पण  आबांच्या  समोर तो  बोलू  पण  शकत  नव्हता  . अमानुष  अत्याचार  होतात  म्हणून  नंतर  कोर्टानेच  बंदी  आणली , पण विनाकाठी  , विनालाठी  शर्यतीला  परवानगी  मिळाली . मग  तर  काय  पोलीस , खबरे , फुकट  फौजदार , प्रमाणपत्र  देणारे  सगळ्यांनाच  कुरण  मोकळं  झालं .
             मधली  काही  वर्षं शेतकी  शिक्षणा  साठी तो दुसऱ्या  शहरातच  होता  . पदवी  घेऊन , डोळ्यात  अनेक  स्वप्नं  घेऊन  तो  गावी  परत  आला  . पण  ती  काळी  माय , जिच्यावर  तो प्रयोग  करणार  होता  , ती कुठे  होती  ?  आबांनी ह्या  शर्यतीच्या  नादापायी  एकेक  तुकडा  करीत  भलीमोठी  जमीन  विकून  टाकली  होती  .. बापाच्या  नादी  लागायचं  नाही  . उरलं  आहे  ते  सांभाळायचं असं  सर्जेरावान  मनोमनी  पक्कं  केलं  होतं .
             गेल्या  वर्षी  जेव्हां  छोट्या  अक्षयला  कळलं की  त्याचे  लाडके चिकू  आणि  गोरा  शर्यतीत  धावणार आहेत  ; तेव्हां  त्याने  शर्यत  बघायचा  हट्ट  धरला . शर्यतीच्या  वेळेला  होणारा  गोंधळ , उन्माद , कल्लोळ  सर्जेरावाला  माहित  होता . बैलच  नाहीत  प्रेक्षक  पण  पुरे  ढोसून  आलेले  असतात . म्हणून  सर्जेराव  स्वतः अक्षुला  घेऊन  गेला .
           माळरानावर   शर्यतीची  आखणी  केली  होती  . शर्यतीसाठी  मोकळ्या  ठेवलेल्या  भागाच्या  दुतर्फा  लोकांनी  शर्यत  बघायला  गर्दी  केली  होती  . चिकू  , गोरा  मार  खाऊन  बेचैन  झाले  होते  . पाजलेल्या  दारूने  बेभान  झाले  होते  .त्यांच्या  नजरेत  ओळख  नव्हती . जाडीत अडकवताना  पण ते  उसळ्या  मारत  होते . कसे बसे  त्यांना  जुपले . धुरकरी  हातात  कासरा धरून  ठाम  उभा  राहिला . बैलांना  धरून  उभे  असलेले  क्षणात  चपळाईने  , सुरक्षित  जागी  पळाले . डोळ्याचं  पात  लवत न लवत  तोच  बंदुकीच्या  गोळी  सारखा  बैलगाडा  सुटला  . बैल  उधळले , वाऱ्याच्या  वेगाने  त्यांनी निशाण  गाठलं . आबा  शर्यत  जिंकले .
          पण  कसा  कोण  जाणे  , अंतिम  क्षणाला  धुरकर्याच्या  हातून  कासरा  निसटला . बेधुंद  असणारे  , अफाट  वेगात  असणारे , वेदनांनी  तळमळणारे  बैल  स्वतःला  सावरू शकले  नाहीत  . गाड्या  सहित  ते  बाजूच्या  गर्दीत  घुसले .एकच  हलकल्लोळ  माजला . माणस जीव  वाचवायला  सैरावैरा  धावत  सुटली . कुणी  तुडवली  गेली  . चेंगराचेंगरी झाली . खाली  पडलेल्या  धुरकर्याने धाव  घेऊन  कासरा  पकडला  . आणखीनही  काही लोक  मदतीला  आले  , त्यामुळे  अनर्थ  टळला. 
          तेव्हां  अक्षुला  नीट  दिसावं  म्हणून  सर्जेरावान  त्याला  खांद्यावर  घेतलं  होतं  . आंधळ्या  पळापळीत  अक्षु खाली  पडला  . आपल्या  शरीराचं  पांघरूण  त्याच्यावर  घालून  जीवाच्या  कराराने  सर्जेरावाने  त्याला  वाचवलं . पण  अक्षयचा  पाय  फ्र्याकचर  झाला . मोठ्या  नशिबाने  तो वाचला . सर्जेरावाला  वाटलं  होतं ; लाडक्या  नातवाच्या  जीवावर  बेतल होतं म्हणून  तरी  आबा  आता  शर्यत  बंद  करतील . पण  कसलं काय ; जित्याची  खोड  मेल्याशिवाय  जात  नाही . 
         रात्री  सगळी  नीजानीज  झाली . सर्जेरावाला  झोप येत नव्हती . रात्री  दीड  दोन  ला  दिंडी  दार वाजल्याचा  आवाज  आला  . एक टेम्पो  आत  आला  . त्यातून  पांढराशुभ्र   , दर्जेदार  बैल  खाली  उतरवला  गेला . रस्त्यावरच्या  दिव्यांच्या उजेडात  त्याचा  बादशाही  रुबाब  डोळ्यात  भरत  होता . सहज  दोन  लाखांचा  असेल . सर्जेराव  डोक्यावर  बुक्या  मारून  घेत  होता . त्याच्या  डोक्यात  घण पडत  होते . बैलांची  व्यवस्था  लावून  , पैसे  घेऊन  माणस  निघून  गेली . ओटीवरच  झोपलेल्या  गणप्याने  आबांना  दार  उघडून  घरात  घेतलं . सगळ  काही  चुपचाप  चालल  होतं . 
         पहाट  व्हायला  आली  होती  .घरात  सामसूम  होती .आबा  गाढ झोपले  होते  .सर्जेराव  बेचैन  मनाने  बाहेर  आला . अस्वस्थपणे अंगणात  फेऱ्या  मारू  लागला  .मघाशी  दिंडी  दरवाजा  उघडा  राहिला  होता  . तो  गोठ्याकडे  गेला  . दार  सताड  उघडलन . त्याला  बघून  चिकू  , गोरा ,आणि  आजचा  नवीन  पाहुणा  , तिघेही  खडबडून  उभे  राहिले . सर्जेरावाने  एकदा  त्यांच्या  पाठीवरून  हात  फिरवला  आणि  दाव  सोडलं . तो  कोपऱ्यात  सरकला . त्या  उमद्या  , तरण्याबांड  , उत्साहाने  मुसमुसलेल्या  बैलांनी  एक  उसळी  मारली आणि  तिघेही   गोठ्यातून   बाहेर  पडले .उघड्या  दिंडी  दारातून सुसाट  वाऱ्यावर  स्वार  होऊन  भन्नाट  धावत  सुटले  .
        ते  दिसेनासे  होई  पर्यंत  सर्जेराव  त्यांच्या  कडे  बघत  होता . मग  एकाएकी  शक्तीपात  झाल्या  सारखा तो  तिथेच  वैरणीच्या  ढिगार्यावर  बसला  . गुढग्यात  तोंड  खुपसून  त्यानं हंबरडा  फोडला  . हमसाहमशी  रडू  लागला  कोणीतरी  मेल्यावर  रडावं  तसा  !त्याचा  टाहो  ऐकायला  कोणीही  जाग  नव्हतं  !!!!
 
 सुरेखा   मोंडकर  
२७/०१/२०१७ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा