गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

 <<<<<<<<<<<<<<<<  शर्यत  दोन   पिढ्यांची   >>>>>>>>>>>>>>>>>>>>>
.
.                   .फटफटी  कशीबशी  उभी  करून , अंगणातूनच  हाका  देत  , सर्जेराव  घरात  घुसला  . "" आबा sssssओ   आ ssबा  ""  ओटीवर  , कणग्याच्या  खोलीत  , सगळी  कडे तो  फणफणत  फिरत  होता  . त्याचा  आवाज  ऐकून  आतल्या  घरातून  मालती  लगबगीने  पाण्याचा  तांब्या  आणि  फुलपात्र  घेऊन  आली  . 
                   . सर्जेराव  घामाने  थबथबला  होता . शर्ट  अंगाला  चिकटला  होता .  डोक्यावरचे  केस  ओले  गच्च  होऊन  कपाळाला    चीपकले  होते  . घाम  पुसायचं  ही  त्याला  भान नव्हतं .रागाने  लाल पिवळा  झाला  होता . सापासारखे फुस्कारे  सोडत  होता .  काहीतरी  त्रांगड  झालंय  हे मालतीच्या  लक्षात  आल  .अशावेळी  नवऱ्या  पासून   कासराभर  दूरच  राहायचं  एवढ ती अत्तापोतूर  शिकली  होती  . तांब्या भांड  तिथेच  टेबलावर  ठेवून  , शिवल्या  ओठाने  ती  आत  गेली  .
                 , तिची  सासू  मान  उंचावून   चाहूल  घेतच  होती  . ""  काय  झालं  ग  सर्ज्याच  ? "" तिने  विचारलं  . "" काय  की  ? ""  मालतीने   खांदे  उडवले  . सासू  पदराने  घाम  पुसतच  चुली  समोरून  उठली  . मालतीने तिची  जागा  घेतली  . तिचे हात चालू  होते आणि  कान  बाहेरच्या   संभाषणाकडे  लागले  होते .
.                .सर्जेरावाच्या  हाका  चालूच  होत्या  . ""  आर , गप  गप  ! काय  आग  लागलीय  का  गावाला  ? ""
                 "" आग  माझ्या  कलेजाला  लागलीय . आबान  तो  ओढ्या  पल्याडला  बागायातीचा  तुकडा  कवडीमोलान  फुकून   टाकलान ग ! आणि  सर्वे  पैशे   घेऊन  आज  बाजाराला  गेलाय  ! "" सर्जेराव वेडापिसा झाला  होता .
.              ""  आर  , माझ्या  कर्मा ! कुटून  ही  अवदसा   आठवली  ? कली  शिरलाय   रं  माझ्या  सौन्सारात  !  हा सैतान  आता  सगळ्याची  बरबादी   करूनच  शांत  होणार  रं बाबा  !! "" आईन  बसकण  मारली . तिचे  डोळे  पाझरायला   लागले  होते  . सर्जेराव  पण   हातापायातली   शक्ती  गेल्या  सारखा  , झोपाळ्यावर  कोलमडला  . तिकडे  चुलीतला  धूर  डोळ्यात  गेल्याचं  निमित्त  करून  मालती  पण  वाहणारे  डोळे  पुसत  होती . सर्जेरावाच्या  डोक्यात  विचारांची  मळणी  चालली  होती  .
                आबा  आधी  असे  नव्हते  . आजोबा  आजी  गेले  ; सर्व  सत्ता  त्यांच्या  हातात  आली आणि  आबांना  बैलगाडा  शर्यतीचा  नाद  लागला  . शर्यती  साठी  लागणारे  बैल  अस्सल   खिलारी   , सुलक्षणी   असतात  . त्यांची  अंगकांती  , वेलांटी  सारख  कमानदार  वशिंड , टोकदार , कंस करणारी  एकसारखी  देखणी  शिंगं , भक्कम   सडसडीत   पाय , भेदक  तेज  डोळे  ; असा  बत्तीस  लक्षणी  बैल  शोधून  शोधून   मिळवावा  लागतो  . अशा  बैलाची  किंमत  पण  लाखात  असते  . आबांना  बैलाची  पारख  उत्तम  होती  . सिझनला  सात  आठ  शर्यती  तरी  आबा  जिंकायचे  . 
                ह्या  बैलांचा  राजेशाही  थाट  असतो  . खूप  निगुतीन  , डोळ्यात  तेल  घालून  त्यांची  बडदास्त  ठेवावी  लागते .खास  खुराक  द्यावा  लागतो  . काटक ,चपळ  झाले  पाहिजेत  पण  स्थूल  , जाडे  होता कामा  नयेत. आबा  सगळं  जातीने  करायचे .. तरुण  असताना  ते  स्वतः  धुऱ्यावर  उभे  राहून  रिंगी  पळवायचे . त्या साठी  ते  स्वतःची  पण  काळजी  घ्यायचे  . खाण्यापिण्याची  बंधनं , व्यायाम  ह्या  बाबतीत  त्यांनी  कधी  हयगय  केली  नाही . धुरकरी  पण  कमी  वजनाचा  , काटक  , बलवान  हवा  . उधळलेले  बैल  आवरायची  ताकद  त्याच्या  मनगटात  हवी  . 
             शर्यतीच्या  वेळी  सुद्धा  वीस  पंचवीस  माणसांची  गरज  पडायची  .ही   माणस  सांभाळून  ठेवावी  लागायची . बैलांना  टेम्पोत  चढवायचं , उतरवायचं. त्यांना  उन्माद  चढावा ; धुंदी  चढावी  म्हणून  वाजंत्री वाले  लागायचे . फुरफुरणाऱ्या  बैलांना  आवरण्यासाठी  धडधाकड   आठ  दहा  माणस लागायची  . आणि  जर  शर्यत  जिंकली  तर  शेमले  फडकावत , गुलाल  , भंडारा  उडवत , ""   यळकोट    यळकोट  जय  मल्हार "  करत  ; विजय ध्वज  नाचवत मिरवणूक  काढायला  माणसांचा  ताफा  लागायचा  . त्यांच्यावर  उधळायला   नोटांची  थप्पी  लागायची  .
           सर्जेराव  मोठा  व्हायला  लागला  तेव्हां  एक गोष्ट  त्याच्या  लक्षात  आली . मोसमात  सात  आठ  बक्षिसं  मिळाली  तरी बैलांचा  खर्च  भरून  यायचा  नाही  . शर्यतीच्या  आधी  बैलांना  दारू  पाजायचे  .ते सावध व्हावेत  , संतापाने  वेडेपिसे  व्हावेत , असह्य  यातना  व्हाव्यात म्हणून  त्यांना  काठीने , चाबकाने   बेदम  मारले  जायचे .पराणी  मारणे , कानाजवळ  खिळ्यांची  पिंजरी बसवण ,  इलेक्ट्रिक   शॉक देणं  हे  तर  सर्रास  चालायचं  .सर्जेरावाला  हा  क्रूरपणा  सहन  होत  नव्हता  . पण  आबांच्या  समोर तो  बोलू  पण  शकत  नव्हता  . अमानुष  अत्याचार  होतात  म्हणून  नंतर  कोर्टानेच  बंदी  आणली , पण विनाकाठी  , विनालाठी  शर्यतीला  परवानगी  मिळाली . मग  तर  काय  पोलीस , खबरे , फुकट  फौजदार , प्रमाणपत्र  देणारे  सगळ्यांनाच  कुरण  मोकळं  झालं .
             मधली  काही  वर्षं शेतकी  शिक्षणा  साठी तो दुसऱ्या  शहरातच  होता  . पदवी  घेऊन , डोळ्यात  अनेक  स्वप्नं  घेऊन  तो  गावी  परत  आला  . पण  ती  काळी  माय , जिच्यावर  तो प्रयोग  करणार  होता  , ती कुठे  होती  ?  आबांनी ह्या  शर्यतीच्या  नादापायी  एकेक  तुकडा  करीत  भलीमोठी  जमीन  विकून  टाकली  होती  .. बापाच्या  नादी  लागायचं  नाही  . उरलं  आहे  ते  सांभाळायचं असं  सर्जेरावान  मनोमनी  पक्कं  केलं  होतं .
             गेल्या  वर्षी  जेव्हां  छोट्या  अक्षयला  कळलं की  त्याचे  लाडके चिकू  आणि  गोरा  शर्यतीत  धावणार आहेत  ; तेव्हां  त्याने  शर्यत  बघायचा  हट्ट  धरला . शर्यतीच्या  वेळेला  होणारा  गोंधळ , उन्माद , कल्लोळ  सर्जेरावाला  माहित  होता . बैलच  नाहीत  प्रेक्षक  पण  पुरे  ढोसून  आलेले  असतात . म्हणून  सर्जेराव  स्वतः अक्षुला  घेऊन  गेला .
           माळरानावर   शर्यतीची  आखणी  केली  होती  . शर्यतीसाठी  मोकळ्या  ठेवलेल्या  भागाच्या  दुतर्फा  लोकांनी  शर्यत  बघायला  गर्दी  केली  होती  . चिकू  , गोरा  मार  खाऊन  बेचैन  झाले  होते  . पाजलेल्या  दारूने  बेभान  झाले  होते  .त्यांच्या  नजरेत  ओळख  नव्हती . जाडीत अडकवताना  पण ते  उसळ्या  मारत  होते . कसे बसे  त्यांना  जुपले . धुरकरी  हातात  कासरा धरून  ठाम  उभा  राहिला . बैलांना  धरून  उभे  असलेले  क्षणात  चपळाईने  , सुरक्षित  जागी  पळाले . डोळ्याचं  पात  लवत न लवत  तोच  बंदुकीच्या  गोळी  सारखा  बैलगाडा  सुटला  . बैल  उधळले , वाऱ्याच्या  वेगाने  त्यांनी निशाण  गाठलं . आबा  शर्यत  जिंकले .
          पण  कसा  कोण  जाणे  , अंतिम  क्षणाला  धुरकर्याच्या  हातून  कासरा  निसटला . बेधुंद  असणारे  , अफाट  वेगात  असणारे , वेदनांनी  तळमळणारे  बैल  स्वतःला  सावरू शकले  नाहीत  . गाड्या  सहित  ते  बाजूच्या  गर्दीत  घुसले .एकच  हलकल्लोळ  माजला . माणस जीव  वाचवायला  सैरावैरा  धावत  सुटली . कुणी  तुडवली  गेली  . चेंगराचेंगरी झाली . खाली  पडलेल्या  धुरकर्याने धाव  घेऊन  कासरा  पकडला  . आणखीनही  काही लोक  मदतीला  आले  , त्यामुळे  अनर्थ  टळला. 
          तेव्हां  अक्षुला  नीट  दिसावं  म्हणून  सर्जेरावान  त्याला  खांद्यावर  घेतलं  होतं  . आंधळ्या  पळापळीत  अक्षु खाली  पडला  . आपल्या  शरीराचं  पांघरूण  त्याच्यावर  घालून  जीवाच्या  कराराने  सर्जेरावाने  त्याला  वाचवलं . पण  अक्षयचा  पाय  फ्र्याकचर  झाला . मोठ्या  नशिबाने  तो वाचला . सर्जेरावाला  वाटलं  होतं ; लाडक्या  नातवाच्या  जीवावर  बेतल होतं म्हणून  तरी  आबा  आता  शर्यत  बंद  करतील . पण  कसलं काय ; जित्याची  खोड  मेल्याशिवाय  जात  नाही . 
         रात्री  सगळी  नीजानीज  झाली . सर्जेरावाला  झोप येत नव्हती . रात्री  दीड  दोन  ला  दिंडी  दार वाजल्याचा  आवाज  आला  . एक टेम्पो  आत  आला  . त्यातून  पांढराशुभ्र   , दर्जेदार  बैल  खाली  उतरवला  गेला . रस्त्यावरच्या  दिव्यांच्या उजेडात  त्याचा  बादशाही  रुबाब  डोळ्यात  भरत  होता . सहज  दोन  लाखांचा  असेल . सर्जेराव  डोक्यावर  बुक्या  मारून  घेत  होता . त्याच्या  डोक्यात  घण पडत  होते . बैलांची  व्यवस्था  लावून  , पैसे  घेऊन  माणस  निघून  गेली . ओटीवरच  झोपलेल्या  गणप्याने  आबांना  दार  उघडून  घरात  घेतलं . सगळ  काही  चुपचाप  चालल  होतं . 
         पहाट  व्हायला  आली  होती  .घरात  सामसूम  होती .आबा  गाढ झोपले  होते  .सर्जेराव  बेचैन  मनाने  बाहेर  आला . अस्वस्थपणे अंगणात  फेऱ्या  मारू  लागला  .मघाशी  दिंडी  दरवाजा  उघडा  राहिला  होता  . तो  गोठ्याकडे  गेला  . दार  सताड  उघडलन . त्याला  बघून  चिकू  , गोरा ,आणि  आजचा  नवीन  पाहुणा  , तिघेही  खडबडून  उभे  राहिले . सर्जेरावाने  एकदा  त्यांच्या  पाठीवरून  हात  फिरवला  आणि  दाव  सोडलं . तो  कोपऱ्यात  सरकला . त्या  उमद्या  , तरण्याबांड  , उत्साहाने  मुसमुसलेल्या  बैलांनी  एक  उसळी  मारली आणि  तिघेही   गोठ्यातून   बाहेर  पडले .उघड्या  दिंडी  दारातून सुसाट  वाऱ्यावर  स्वार  होऊन  भन्नाट  धावत  सुटले  .
        ते  दिसेनासे  होई  पर्यंत  सर्जेराव  त्यांच्या  कडे  बघत  होता . मग  एकाएकी  शक्तीपात  झाल्या  सारखा तो  तिथेच  वैरणीच्या  ढिगार्यावर  बसला  . गुढग्यात  तोंड  खुपसून  त्यानं हंबरडा  फोडला  . हमसाहमशी  रडू  लागला  कोणीतरी  मेल्यावर  रडावं  तसा  !त्याचा  टाहो  ऐकायला  कोणीही  जाग  नव्हतं  !!!!
 
 सुरेखा   मोंडकर  
२७/०१/२०१७ 

मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

. हे नक्की काय असतं ... ( माझे ठाणे )
.
.
. . काही म्हणजे काय , बऱ्याच वर्षा पूर्वीची गोष्ट आहे .आमच्या पाचपाखाडी विभागात फुटपाथवर , जागोजागी सिमेंटचे छान , आरामशीर बाक टाकले गेले . मला ही कल्पना खूप आवडली . त्या बाकांचा चांगला उपयोग केला जायचा . बऱ्याचवेळा , चालण्यावर मर्यादा आलेले , घरात बसून बसून कंटाळलेले वृध्द तिथे निवांत बसायचे . एक आहे म्हणून दुसरा पण यायचा , त्यांचा छान वेळ जायचा . माणसात आल्यासारखं त्यांना वाटायचं . एका बाकाच्या जवळच शाळेच्या बस चा थांबा होता . शाळेच्या वेळेला तो बाक दप्तरांनी भरून जायचा . मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या घोळक्याने वेढून जायचा .
.
. . जेमतेम महिना पण झाला असेल , नसेल ; सकाळी फिरायला बाहेर पडले , पाहते तर काय हे सगळे बाक फोडून टाकलेले .आदल्या रात्री तर त्यावर छोटूला गाड्या दाखवायला घेऊन बसले होते मी आणि सकाळी तो मोडून पडलेला !! अगदी छिन्नविछिन्न करून टाकलेला ; त्याचे पाय पण फोडले होते . म्हणजे कोणीही क्षणभर त्यावर टेकू पण शकत नव्हतं . खूप हळहळले ! अगदी आमच्या झोपायच्या खोली समोर रस्त्यावर येणारा तो बाक , .. जी अवस्था झाली होती त्यावरून अवजारांनी , हत्यारांनी , त्याची वासलात लावली होती ; पण आम्हांला कोणाला पत्ता पण लागला नव्हता ! जाग आली नव्हती !बरेच दिवस ते तसेच तिथेच पडलेले होते ; उद्वस्त ! नंतर काही काळाने तिथे त्याहून सुंदर लाकडी बाकडी ठेवली गेली . हिरव्यागार रंगाने रंगवलेली ! लोक त्यांचा उपयोग करताहेत ;अजून तरी ती आहेत ; पण मधल्या काळात माझी नातवंड मोठी झाली . ; गाड्या आणि रिक्षा , डोळे विस्फारून बघायच्या पलीकडे गेली . स्वतःच्या सायकली चालवायला लागली . ह्या नव्या बाकांवर बसायचा योग मला आला नाही .
.
. . माझा लाडका कचराळी तलाव ! खरं म्हणजे हे उदकाचे तळे , एखाद्या कहाणीत शोभावे असे रत्नजडीत आहे . कोणत्याही मोसमात हा तलाव तिलोत्तम असतो .तळ्याच्या भोवती बांध आहे . तलावाची मर्यादा आखण्यासाठी बाहेरूनही रुंद कठडा करून लोखंडी कांबीचं कुंपण घातलं आहे . हे लोखंडी कुंपण जमेल तेवढं आणि तिथे तोडलेलं , वाकवलेलं असतं . बसण्याच्या हेतूने केलेल्या बांधावरच्या फरशा फोडलेल्या असतात . खरं म्हणजे हे बांधच फोडून टाकलेले असतात . तळ्यात प्लास्टिकच्या पिशव्यांसहीत निर्माल्य टाकलेलं असतं ! तरी देखील हा तलाव कमालीचा देखणा दिसतो ! जातीच्या सुंदरा सारखा ! महापालिकेने त्याचे सुशोभीकरण केलं . आखीव रेखीव जागा करून नवीन झाडं लावली . मुलांसाठी भरपूर वाळू आणि खेळाची साधनं असणारा , खास त्यांचा सुरक्षित हिस्सा केला . त्याच्या सभोवती बुटका बांध टाकला . त्यावर पालकांना , मुलांकडे लक्ष देण्यासाठी बसता येतं .चालायच्या रस्त्यावरचे पेव्हर ब्लॉक्स तुटले होते . लक्ष नसलं तर अडकून पडायला व्हायचं. तिथे छान कॉन्क्रीटचा रस्ता केला . व्यायामासाठी जागृत असणाऱ्या लोकांनी हा रस्ता सकाळ संध्याकाळ फुललेला असतो !
.
. . हे काम हळूहळू बरीच वर्षे चाललं आहे . झाडं आता मोठी झाली आहेत . मध्यंतरी शेलाट्या पाम वृक्षांना कलात्मकरित्या रंगविण्यात आलं . इतकी गोड दिसत होती ती ! रंगीबेरंगी वस्त्रं परिधान केलेल्या उदबत्ती सारखी . जी झाडं तोडली होती त्यांनाही रंगांनी सजवलं होतं .विध्वंस क्षणात करून टाकता येतो , पण काही घडवायचं असेल तर त्याला खूप काळ , मेहनत आणि कल्पकता लागते . हे पाम रंगवायचं कामही महिनाभर तरी चाललं होतं . संपूर्ण तळ्याभोवतीचे पाम रंगवून झाले . संध्याकाळी फिरायला गेलेली मी , दिवेलागणी झाल्यावरही तिथेच बसून राहिले . तो शांत तलाव ,; त्यातील रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण करणारं कारंज , दुर्गा विहारच्या जांभळ्या दिव्यांच्या रोषणाईची आणि आजूबाजूच्या उंच इमारतींची त्यात पडलेली प्रतिबिंब .आणि घेराव घालून असणारे समारंभासाठी सजून धजून असणारे ते पाम ! जे वेड मजला लागले .. ते वेड तुज लागेल का !! असच वाटत होतं , तिथून पाय निघत नव्हता .
.
. . दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचलं , पर्यावरणवाद्यांनी हरकत घेतली होती . झाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते रंग म्हणे हानिकारक होते . ते म्हणताहेत म्हणजे असणारच ! अरे ; पण मग इतके दिवस तुम्ही काय करत होता . शेवटच झाड रंगवून होई पर्यंत का थांबला होता ? जे झाड प्रथम रंगवलं , ज्याने इतके दिवस तो रासायनिक रंग अंगावर वागवला , त्याचं काय ! त्याच्या आरोग्याचं काय ! ज्यांना झाडांच्या आरोग्याची काळजी आहे त्यांनी इतके दिवस थांबावं ? आपल्या दिरंगाईमुळे त्या पहिल्या झाडांचा बळी द्यावा ? आता ते रंग उतरवले जाताहेत ! अरे , त्यासाठी पण रसायनेच वापरणार ना ??
.
. . काल वर्तमानपत्रात वाचलं , चार मुलांनी पहाटे बागेत घुसून मोडतोड केली .वस्तूंची वासलात लावली . सौंदर्याची बरबादी केली . आज टीवीवर दाखवलेलं सीसी टीवी फुटेज पाहिलं . ती विध्वंस करणारी मुलं अगदी आरामात फिरत होती , मोड तोड करत होती . गोड हसत होती . क्रौर्य , , दुष्टपणा निदान त्यांच्या चेहऱ्यावर तरी दिसत नव्हता . .कोणतंही हत्यार न वापरता लाथा मारून वस्तू तोडत होती .एवढी शक्ती .. एवढी उर्जा होती त्यांच्यात ? मग त्याचा सकारात्मक उपयोग करावासा त्यांना का वाटत नव्हतं ? किरकोळ शरीरयष्टीची , सर्वसामान्य दिसणारी , अगदी रोज आपल्याला भेटणार्या , आपल्याला स्माईल देणाऱ्या , ओळखीच्या किशोरवयीन मुलांसारखी दिसणारी ही विध्वंसक मुलं होती .कुठून , कशी येते ही विकृती त्यांच्यात ? सौंदर्याला कुरूप बनवणं , नायनाट करणं , हा एखाद्याचा खेळ होऊ शकतो ? सगळंच अचंबित करणारं !
.
. . जर काही चांगल्या , सुशोभिकरणाच्या , उपयुक्त गोष्टी केल्या तर त्या निदान आहेत तशा टिकवणं आपलंच काम नाहीये का ?सगळं सरकारने केलं पाहिजे ! पण जे आपल्याला जमण्यासारखं आहे तेवढंही आपण नाही करणार का ? म्हणजे आहे ते सांभाळणं ...??#सुरेखा_१६ /१ /१७
. वावटळ ( भाग ६ )
.
.
. .बाळासाहेबाच्या सहनशक्तीचा अंत झाला . तो पिसाळलाच !" रांड , साली , छिनाल ..... तुझे धंदे काय मला माहिती नाहीत ! तुला पोर नकोय . कधीच नकोय . एकदा पोर झालं की तुझी किंमत कमी होणार . रस्त्यावरचं काळ कुत्रंही तुला विचारणार नाही . कुणाकुणा बरोबर झोपतेस मला माहिती नाही काय ? " तो गरळ ओकत होता , वर्षानुवर्षे साठलेलं .
.
. . कुसुम पण आता पिसाटली .बाळासाहेबाच्या तोंडचा शिव्यांचा वर्षाव , तिच्या चारित्र्याची केली जाणारी लक्तरं , तिला सहन होत नव्हती . बारा गावाचं पाणी प्यायलेला तिचा मूळ स्वभाव उफाळून आला . लाव्हा उसळला . निखार्यासारखा तिचा चेहरा फुलला होता . नजरेतून ठिणग्या टाकत , तिने शब्दांची आग लावली . " दिलंस काय तू मला ? चार दागिने ... भाड्याचं घर ! तुझ्याहून वरचढ , छप्पन माझ्या पायाशी लोळण घेतात , माझे तळवे चाटतात , माझ्यासमोर कुत्र्यासारखी शेपटी घोळवत , लाळ टपकवत उभे राहतात . माझ्या डोळ्यांच्या एका इशाऱ्यावर लोटांगण घालतात . तुझ्या पेक्षा तरणेबांड रोज माझ्या शेजेवर येतात ........"
.
. . बाळासाहेबाची होळी धडाडून पेटली . आपल्या बाहेरख्यालीपणाचा तिच्याच तोंडून , मोठ्या तोऱ्यात केला गेलेला स्वीकार , समर्थन , त्याच्या जिव्हारी लागलं . शब्दाने शब्द वाढत गेला . आवाज खोलीच्या बाहेर ऐकू येऊ लागले . त्याच्याच जोडीला आदळ आपटीचेही आवाज बाहेर येत होते . लॉज मधल्या , आजूबाजूच्या खोल्यांमधली माणसं धसक्याने बाहेर उभी होती ,नोकरवर्ग जमला होता .संपत बंद दार ठोकत होता . पण कोणीही दार उघडलं नाही . आतून किंकाळ्या , रडणं भेकण ; शिवीगाळ सगळं बाहेर ऐकू येत होतं . मालकाची खोली ! काय करावं कुणाला सुचत नव्हतं. हळूहळू किंकाळ्या थांबल्या . नुसताच , काहीतरी आदळल्याचा आवाज बाहेर येत होता . आणि क्षीण हुंदके ... कण्हण्याचे सुस्कारे .!
.
. , संपतने इतरांच्या मदतीने दार फोडलं . जमिनीवर कुसुम अस्ताव्यस्त पसरली होती . तिच्या छाताडावर बसून , बाळासाहेब तिच्या झिंज्या पकडून , तिचं डोकं जमिनीवर आपटत होता . त्याच्या दुसऱ्या हातात फुटलेली सोड्याची बाटली होती . त्याच्या डोळ्यातून अंगार बरसत होते . सैतानाने त्याचा ताबा घेतला होता . कुसुम मध्ये आता कण्हण्याचे पण त्राण राहिलं नव्हतं . ती निपचित पडली होती , चिंध्यांच्या बाहुली सारखी . .जमिनीवर काचांचा सडा पडला होता . रक्ताचं थारोळ झालं होतं .
.
. . बघ्यांमध्ये एकच हलकल्लोळ माजला . हाहा म्हणता तिथे शुकशुकाट झाला . आपल्याला कसली झळ लागू नये ; पोलिसांचा ससेमिरा सुरु होऊ नये , म्हणून सगळे नाहीसे झाले . तिथे स्मशान शांतता पसरली . पोलीस आले तो पर्यंत संपतने बरेच पुरावे नाहीसे करायची पराकाष्ठा केली होती . शव विच्छेदनात कुसुमचा चेहरा , मान , दोन्ही हात , हातांचे तळवे ,ह्या सर्व निळून त्र्यहात्तर लहान मोठ्या जखमा झाल्या होत्या . सगळ्या धारदार काचे मुळे झालेल्या होत्या .
.
. . कुसुमच्या मग्रुरीचा , तिच्या अर्वाच्य वर्तणुकीचा , तरुण पुरुषांना तिच्याकडे आकृष्ट करून घेणारा तिचा एकमेव आधार , तिचा चेहरा ; तोच बरबाद करायचा निश्चय बाळासाहेबाने केला होता . सर्वात जास्त घाव चेहऱ्यावर होते . स्वतःचा बचाव करण्यासाठी चेहरा झाकताना , तो सांभाळताना , कुसुमच्या हातांवर प्रहार झाले होते . ज्या चेहऱ्याने .. ज्या तिलोत्तमेने बाळासाहेबाला भुरळ घातली होती , जिच्या साठी त्याने आपल्या सामाजिक स्थानाचा , आई वडिलांचा पण विचार केला नव्हता ; " अरे नाचीला कोणी देव्हाऱ्यात बसवतं का ? तिला रखेल ठेव की " अशा व्यवहारी सल्यांना ज्याने धुत्कारलं होतं ; त्याच बाळासाहेबाने राग , क्रोध , अपमान , तिरस्कार अशा भावनांच्या आहारी जाऊन , आपल्या हाताने , आपल्या प्रेमाचा चक्काचूर केला होता .
.
. . आरोपी म्हणून पोलीस त्याला पकडून घेऊन जात होते , तेव्हां त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते . चेहरा पाषाणासारखा थिजला होता .. गारगोटी सारखे डोळे भकास होते , शरीरातील चेतनेची वाताहत झाली होती . उरलं होतं एक शुष्क , विदीर्ण , विवश , निर्माल्य ! मला कळल्यावर खूप हळहळले मी ! एक प्रेमकथा बेचिराख झाली होती . पण कोण काय करू शकणार होतं ? बुडत्याचा पाय खोलातच जाणार होता !#सुरेखामोंडकर
१५/०१/२०१७
समाप्त

. वावटळ ( भाग ५ )
.
.
. . सरत्या पावसात सृष्टी हिरवीगार झाली होती . डोंगरांवर खळाळत्या निर्झरांची , धबधब्यांची नक्षी उमटली होती . बाळासाहेबाच्या विनवणीला यश येतंय असं दिसत होतं . कुसुमचा कल जरा घर , गृहस्थी कडे वळतोय असं वाटत होतं . त्या दिवशी ती खूप खुश होती . प्रसन्न होती . तिने लाडात येऊन बाळासाहेबाला विचारलं , " आपण पन्हाळ्याला जाऊया फिरायला ? "
.
. . खूप दिवसांनी बायकोला प्रफुल्ल पाहून , तिच्या आनंदात त्यानेही डुंबायला सुरुवात केली . पन्हाळ्याला जायला त्याने गाडी काढली . " नको , बाईक वरून जाऊया की ! " त्याच्यावर आपली मधाळ नजर रोखत ती म्हणाली . त्याच्या पाठीमागे , त्याला घट्ट बिलगून ती बसली . वार्याशी स्पर्धा करीत , आपले उडणारे केस सावरत , चेहऱ्यावर आदळणारे थंडगार वार्याचे झोत आसासून शोषून घेत , दोघे पन्हाळ्याला आले . कधीमधी पडणारे पावसाचे थेंब , मध्येच येणारी उन्हाची कोवळी किरणं , शहारे आणणारी वाऱ्याची भिंगरी , गडावरची हिरवीगार वनराई आणि मिठीतली ती मादक मदालसा ! जिच्यावर तो प्रेम करीत होता . बाळासाहेब उत्तेजित झाला होता . स्वप्नपूर्तीच्या इच्छेने व्याकूळ झाला होता .
.
. . संध्याकाळी त्रिनेत्र मधील रूम वर परत आल्यावर तिला मिठीत गोळा करत त्याने तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला . तिच्या घनदाट केसांच्या पिसार्यात गुरफटताना त्याच्यातला तो जुना पिसाट प्रियकर पुन्हा जागा झाला . पण ती सावध होती . ऐन क्षणाला तिने त्याला ढकलून दिलं , " नाही .... इतक्यात नाही ... थांबूया आणखीन दोन तीन वर्ष ! आधी आपला स्वतःचा बंगला होऊ दे , मग बघू या ! "
.
. त्याच्या पौरुशाचा घोर अपमान झाला होता .. बाप व्हायला आसुसलेल्या बाळासाहेबाला तो निषेध सहन झाला नाही . त्याने खूप वाट पाहिली होती . तिच्या कलाने घ्यायचा , तिला न दुखावता सदा प्रसन्न ठेवायचा आटापिटा केला होता . घरच्या सर्व माणसांना लाथाडून त्याने तिला प्रतिष्ठा , मान मरातब दिला होता आणि गृहस्थधर्मातली त्याची एक इच्छा ती पूर्ण करत नव्हती . सबबी सांगत होती . तिला मातृत्व का नकोय हे तो चांगलंच जाणून होता . आईपण हा तिच्या स्वैर आयुष्यातला अडसर ठरला असता . #सुरेखामोंडकर १५/०१/२०१७
क्रमशः
. .वावटळ ( भाग ४ )
.
.
. . नेमक्या त्याचं वेळी कुसुमला एका मराठी सिनेमातल्या दुय्यम भूमिकेसाठी विचारणा झाली . सिनेमा नाटकात काम करणं बिलकुल नामंजूर असणाऱ्या बाळासाहेबाने बायकोच्या कळवळ्याने ; केवळ तिचं मन प्रफुल्लित राहावं , तिच्या आवडीच्या कलाविष्कारात तिने गुंतून राहावं , या हेतूने तिला सिनेमात काम करायला संमती दिली .
.
. . बाळासाहेब आपल्या हॉटेल व्यवसायात व्यग्र झाला . बंधमुक्त झालेल्या कुसुमचा अबलख वारू सुसाट सुटला . दुःखाने पोळलेला बाळासाहेब व्यवसायात स्वतःला अधिकाधिक गुंतवून घेत होता . दुःख विसरायचा हा त्याचा उपाय होता . कुसुमच्या हातात आणखीन एक दोन सिनेमा आले . भूमिका यथातथाच होत्या , पण तिच्या मनोवृत्तीला मानवणारी ही जिंदगी होती .
.
. . हळूहळू बाळासाहेबाच्या कानावर कुसुमच्या एकएक करामती , रंगढंग पोचू लागले . तो घरात नसताना , त्याच्या घरासमोर , मालदार , वतनदारांच्या ; नवश्रीमंतांच्या पोरांच्या , वैभवशाली परदेशी गाड्या तासनतास उभ्या राहू लागल्या . कुसुमचं जडजवाहीर वृद्धिंगत होऊ लागलं . ती बाळासाहेबाला जुमानिशी झाली . आधीच चंचल , ऐयाशी वृत्ती , त्यात तारुण्याचं उधाण ! रोजची भांडण , कलह , हमरीतुमरी , दोषारोप ! बाळासाहेब बेजार झाला होता . एकदिवस वैतागून त्याने बंगल्याला कुलूप ठोकलं आणि सर्व बाडबिस्तरा त्रिनेत्र मधल्या एका आलिशान रूम मध्ये हलवला .
.
. . आता कुसुम सदैव त्याच्या डोळ्यासमोर राहात होती . आपलं उथळ आयुष्य क्षणभंगुर आहे , हे तिला कळत होतं , तरी देखील , स्वैर आयुष्याच्या आठवणी , अनुभव तिला रोमांचित करीत होते . दिल है की मानता नहीं ; अशी तिची अवस्था झाली होती . हे असं बंदिस्त आयुष्य तिला पसंत नव्हतं . इथे ती सतत बाळासाहेबाच्या देखरेखीखाली , पहार्याखाली होती . जवळ जवळ नजर कैदच होती ती ! खूप नाराज होती ती ! तिची मुळची बंडखोर वृत्ती उफाळून आली होती .पहिलं बाळ देवाघरी जाऊन तीन वर्षे होऊन गेली होती . बाळासाहेबाने पुन्हा बाळाची संधी घेण्यासाठी कुसुमची मनधरणी करायला सुरुवात केली होती . आशिकी , फुलपंखी आयुष्याला चटावलेल्या कुसुमला आता आपल्या तारुण्यातली सुंदर वर्षं , गरोदरपण , बाळंतपण , बालसंगोपन ह्यात वाया घालवायची नव्हती . बाळासाहेबाने तिला तिच्या भूतकालासह स्वीकारलं होतं . लग्न झाल्यावर ती सर्वस्वी त्याची , फक्त त्याचीच राहावी अशी त्याची अपेक्षा होती . भूतकाळाच्या भानामातीतून ती कधी बाहेरच येणार नाही ह्याची त्याला कल्पना नव्हती . त्याने तिच्या साठी उच्च , रसिल्या राहणीमानाची कवाडे उघडली होती , स्थैर्य , प्रतिष्ठा , सामाजिक दर्जा दिला होता , पण कोंबडीला माणिक सापडावं तसं झालं होतं . #सुरेखामोंडकर १५/१/२०१७
क्रमशः.
. वावटळ ( भाग ३ )
.
.
. लग्नाचा थाटमाट होणं शक्यच नव्हतं . नरसोबाच्या वाडीला जाऊन त्याने लग्न केलं . बाळासाहेबाच्या घरचं चिटपाखरू पण नव्हतं . हौसाच्या शेजारपाजार पैकी चार जण आली होती . अफाट वैभवाच्या वारसदाराच बिन वाजंत्रीचं लग्न झालं . बातमी कळल्यावर माझ्या संमिश्र भावना होत्या . एका भरकटलेल्या गलबताला बंदरात निवारा मिळाला म्हणून हर्ष होता आणि ही आवळ्या भोपळ्याची मोट किती दिवस , कशी टिकणार ह्याची चिंता पण होती .हे लग्न टिकाव अशी मी मनापासून प्रार्थना केली .
.
. . शाहूपुरीतल्या अलिशान तीनमजली बंगल्याचे उभे दोन भाग झाले . उत्तरेकडचा भाग बाळा साहेबाला मिळाला . दक्षिणेकडच्या भागात आबासाहेब , दादासाहेब आणि पुरा कुटुंब कबिला राहात होता . बाळासाहेबाचा हिस्सा त्याला मिळाला . पण सर्व घराने , भाउबंदानीं त्याला जणू वाळीतच टाकलं होतं .त्याच्या कडे कुणाचं येणं जाणं नव्हतं . सणवार , हौस मौज , कुलाचार , कशाचाच तो हकदार नव्हता . दोन घरांच्या मधले दरवाजे नुसतेच कडी कुलपं लावून बंद केले नव्हते , तर त्यावर लोखंडी पट्यां ठोकून कायमचे बंदिस्त केले होते . केवळ घर तोडलं नव्हतं तर एक नातंच तोडून टाकलं होतं .कुसुम सारखी अक्करमाशी , तमासागीरीण , त्यांनी बाळासाहेबाची बायको म्हणून स्वीकारली हेच खूप होतं . मनात आणलं असतं तर हौसाच्या , कुसुमच्या चिंध्या करून त्यांनी गिधाडांनी खायला घातल्या असत्या आणि ह्या कानाचं त्या कानाला कळलं नसतं .असा त्यांचा गावात वचक होता .
.
. ,कुसुम आयुष्यात आली आणि बाळासाहेब फुलारून आला . त्याच्या पौरुशाचा केवढा मोठा सत्कार झाला होता .इंद्राच्या दरबारातील अप्सरा त्याला मिळाली होती . मधाचा थेंब टाकलेल्या जांभळा सारखे गर्द , टपोरे डोळे . घनदाट झालर लावल्या सारख्या लांबसडक पापण्या , मदनाच्या ताणलेल्या धनुष्यासारख्या भुवया , तपकिरी , तजेलदार केसांच्या महिरपिखाली झाकलं जाणारं थोडं अरुंद कपाळ ., टोकाला किंचित उचलेलं , सर्व जगाला तुच्छ लेखणारं , नाजूक पारदर्शक नाकपुड्या असणारं पिटकुलं नाक . वरचा ओठ अंम्मळ अरुंद , पातळ आणि गावठी गुलाबाची पाकळी थोडी डौलदार पणे दुमडावी असा आव्हान देणारा , दळदार खालचा ओठ . सुरई सारखी , कमळाच्या देठा सारखी नाजूक मान , आंब्याच्या कोयीसारखी सुबक , थोडी टोकदार हनुवटी आणि गालावरची अमृताच्या कुपी सारखी खळी . तिला घडवून विश्वकर्मा आपल्याच कलाकृतीवर खुश झाला असणार . तिच्या यौवनाची बाळासाहेबला नशा चढली होती . सौंदर्याच्या भांडाराचा तो जहागीरदार होता . तिच्यावरून त्याने दुनिया ओवाळून टाकली होती . बेपर्वा , बिनधास्त , ,बेधडक , श्रीमंतीमुळे आलेला निर्धास्तपणा असलेल्या बाळासाहेबाला जगाची पर्वा नव्हती . त्याने कुसुमला सोन्या हिर्यांनी मढवली . तिच्या एका खुशीच्या कटाक्षासाठी अफाट दौलत उधळली . नखशिखांत दागिने आणि उंची निवडक साड्या लेवून , सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ती गावभर मिरवत होती .
.
. . वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेलं अर्ध घरही प्रचंड होतं . बाळासाहेबाने त्यात तळमजल्यावर हॉटेल काढलं . ;" त्रिनेत्र " ! त्याचा विश्वासू , जिगरी दोस्त संपत , व्यवस्थापक म्हणून मिळाला . वरचे मजले दोघे नवरा बायको वापरत होते . हॉटेलला जबरदस्त बरकत आली . प्रत्येक मजल्यावर पांच पांच खोल्या होत्या . बाळासाहेबाने त्याचं रुपांतर लॉज मध्ये केलं . तिथून जवळच , ताराबाई पार्क मध्ये त्याने टुमदार , देखणा बंगला भाड्याने घेतला . दोघे तिथं राहू लागले . हा बंगला त्यांना लाभला पण आणि नाही पण लाभला !
.
. .ह्या बंगल्यातच त्यांच्या चिमुकल्याने जन्म घेतला . पण त्याने तीन सूर्योदय पण नाही पाहिले . कुसुमच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं .बाळासाहेब मुळापासून हादरला होता . खूप दुखावला होता . आपण सर्वांच्या मनाविरुद्ध लग्न केलं , त्यांचे तळतळाटच आपल्याला बाधताहेत अशी त्याची भावना झाली होती . पोराचं नाव तो ' राजा ' ठेवणार होता . ' राजासाहेब ! ' पण त्याची इछ्या अपुरीच राहिली . . कुसुम दिसामासी खंगत होती . कुढत होती , कोमेजत होती . तिला कशातही रस राहिला नव्हता . एका रसरशीत फुलवेलीच चिपाड झालं होतं .#सुरेखामोंडकर १४/०१/२०१७
.
. क्रमशः
. वावटळ ( भाग २ )
. . सडसडीत , सुकुमार बांधा . हवी तिथे गच्च भरलेली . अटकर कंबर , बन न घालता होणारा नारळा एवढा अंबाडा . आणि दृष्टी खिळेल असं लावण्य ! तमाशाच्या फडाबरोबर ती गावोगावी फिरत होती . तमाशा नृत्यांगनांना तेव्हां सुगीचे दिवस आले होते . अलौकिक सौंदर्य , बेफाम नृत्य , जुजबी अभिनय , कच्या तारुण्यातले स्वैर वर्तन ! कुसुमचं नाव सगळीकडे गाजत होतं . तिचं गावच मुळी मराठी सिनेमाची पंढरी . एका सिनेमात तिला काम मिळालं . एका मराठी नाटकात तिला प्रमुख भूमिका मिळाली . सिनेमा फारसा चालला नाही . नाटक मात्र धोधो चाललं .मी पाहिलं होतं ते नाटक . इतकं जुनं नाटक ! मला तर आता नाटकाचं नाव पण नाही आठवत . पण ती आठवतेय ! स्त्री असून मी तिच्या देखणेपणावर भाळले होते ,एखादी स्त्री इतकी विलोभनीय असू शकते ! शहारले होते !, तर पुरुषाची काय स्थिती होत असेल ! तिची कीर्ती मुंबई , पुण्या सारख्या शहरातून पसरली . त्याच बरोबर कुसुम म्हणजे गुलबकावलीच फुल नाही ; योग्य किंमत मोजल्यावर सहज मिळू शकते , ही बातमी देखील कर्णोकर्णी झाली .
. . तिच्याच गावातला बाळासाहेब तिच्या प्रेमात पडला होता . हा पेहलवान गडी तिच्यासाठी वेडा झाला होता . तिचा एकही कार्यक्रम तो चुकवत नव्हता . जिथे तिचा कार्यक्रम असेल , त्या त्या गावी सर्व खेळांना तो हजेरी लावायचा . लालमातीतली मेहनत , काम धंदा सर्व त्याने सोडून दिलं होतं . मोठं तालेवार घराणं होतं त्याचं . गावात त्यांना मोठी प्रतिष्ठा होती .शाहूपुरीत टोलेजंग तीनमजली घर , औरसचौरस जमीन , उसाचे मळे , अनेक एकर शेती , शेत घरं , हिरवेगार भाजीचे मळे , साखर कारखाना ; ओघाने असणारी मद्य निर्मिती ! खूप मोठा बारदाना होता त्यांचा . मोठा भाऊ दादासाहेब ! त्यांची बायको राजघराण्यातली होती . डोक्यावरचा भरजरी पदर कधी ढळला नाही तिचा . दागदागिन्यांनी लहडलेल्या त्या मोठ्या सुनेचं नखही कुणाला दिसणं अशक्य होतं . आबासाहेब खमकेपणाने अजून सर्व व्यवहार बघत होते . घरातल्या मुली देखील नावाजलेल्या , संपन्न घरात सुखाने नांदत होत्या . आबासाहेबांच्या आज्ञे बाहेर जायची कुणाची शामत नव्हती . पण बाळासाहेबांच्या ह्या नसत्या थेरांनी त्यांची मान गावात खाली गेली होती . नाक कापल गेलं होतं . पत राहिली नव्हती .
.
. . बाळासाहेब कुणाला जुमानणारा नव्हता . एक दिवस त्या गलिच्छ वस्तीतल्या , शेणामुताचा वास दरवळणाऱ्या , हौसाबाईच्या झोपडीत तो स्वतः गेला आणि त्याने कुसुमला मागणी घातली . हौसाबाई हादरली . त्या प्रतिष्ठित घराण्याशी सोयरिक जुळवायची म्हणजे , आकाशातील तारे तोडण्यासारख होतं ; सुळावरची पोळी होती , हे अनुभवी हौसा जाणून होती . पण बाळासाहेब ठाम होता . हौसालाही हे प्रलोभन टाळण्या पलीकडचं होतं . तिचे हात प्रत्यक्ष स्वर्गाला पोचले होते .कुसुमला मात्र हे लग्न पसंत नव्हतं . अवघी पंधरा वर्षांची होती ती ! तमाशातील , नाटकासिनेमातील , मुक्त आयुष्य तिला मोह घालत होतं . भोवती रुंजी घालणारे पुरुष , तिची थुंकी झेलणारे मजनू , तिच्यावर होणारी पैशांची उधळण , कौतुकाचा वर्षाव , तिच्या सौंदर्याची आतषबाजी ! ह्या सर्वांचा तिला ध्यास होता . बेधुंद आयुष्याची तिला भुरळ पडली होती .
.
. . हौसाने दुनिया अनुभवली होती . नाचणारणीचं आयुष्य , लवकर उतरणीला लागतं हे ती जाणून होती . तिची उर्जितावस्था , तिचा थाटमाट आणि आमदनी ; एकदा तिचं तारुण्य ढळलं की संपणार ! स्थैर्य , इज्जत , मान मरातब , स्वतःच्या पायाने चालत तिच्या झोपडीच्या दारात आला होता . साक्षात कुबेराशी सोयरिक जुळत होती . भीती होती फक्त आबासाहेब आणि दादासाहेबांची ! पण घरातल्या या राजबिंडया पोरावर सगळ्यांचा जीव होता . त्याच्या समोर सगळे नांगी टाकून गपगार होते . बाळासाहेबाची एकच अट होती , ' कुसुमनं बारीत नाचायचं नाही , सिनेमा नाटकात काम करायचं नाही . ' एकदा ती त्याची झाल्यावर तिच्या भूतकाळाची सावलीही त्याला तिच्यावर नको होती #सुरेखामोंडकर . १४/०१/२०१७
.
.क्रमशः
वावटळ ( भाग १ )
. पहाटे फटफटलं पण नव्हतं . झुंजूमुंजू होण्याच्या आधी , माणसांची वर्दळ सुरु होण्याच्या खूप आधी ; वस्तीवरच्या सर्व बाया आपले प्रातर्विधी आटोपून घ्यायच्या . त्यानंतर बाप्येलोक ! पोरंबाळ कधीही , कुठेही ; नालीशी , गटाराच्या काठाशी , शेताच्या बांधाशी ! अलिखित नियम होता तो ! हौसा नेहमीप्रमाणे , एका बोटाने दाताला मिसरी लावत , दुसऱ्या हातात टमरेल धरून शेताच्या कडेने चालली होती . गुरांसाठी रचलेल्या चाऱ्याच्या गंजी पाशी . तिला काहीतरी वळवळताना दिसलं . स्वाभाविक उत्सुकतेने , तिने जवळ जाऊन निरखून पाहिलं . पटकूरावर एक पोर हातपाय उडवत पडलं होतं . काही दिवसांचं असेल . कोणीतरी बाई , पोराला इथे निवाऱ्याला ठेवून शेतापलीकडे गेली असेल , असं वाटून हौसा थोडावेळ तिथेच थांबली . वस्तीवर तर कोणीच ओली बाळंतीण नव्हती . म्हणजे ही जी कोणी बाई होती ती बाहेरून आली असणार !
. विझत चाललेल्या चांदण्यांच्या मंद प्रकाशात ते पोर मजेत होतं . हौसा निरखून पाह्यला लागल्यावर पोर हातपाय उडवायचं थांबलं आणि टुकूर टुकूर तिच्याकडे पाह्यला लागलं . बोळकं वासून हसायला लागलं . थोडावेळ वाट पाह्यल्यावर हौसाने अस्वस्थ होऊन हाळी दिली , " कोन हाय रं ? कुनाच प्वार हाय हितं ? " तो पर्यंत आणखीन चार दोन बाया बाजूला गोळा झाल्या होत्या . हौसानं पोर उचललं . पोरगी होती . बिलगलीच तिला . वाट पाहून तिथंच चार जणांना सांगून , हौसा तिला आपल्या झोपडीत घेऊन आली .
. गावकुसाबाहेर असलेलं हे महात्मा नगर . पत्र्याच्या , गवताच्या , कामटयांच्या झोपड्या . समोर गोठे . तिथली बहुतेक माणसं त्या गोठ्यातच काम करणारी होती . शेणामुताचा वास , शेणपाण्याचे चर ! काही गवताच्या पेंढ्या , गोठ्यातच पोटमाळ्यावर टाकलेल्या . तर उरलेल्यांच्या बाहेर गंजी रचलेल्या . एका बाजूला उसाचे मळे , भाज्यांचे वाफे , शेतं पसरलेली . त्याच गोरगरिबांच्या वस्तीत , हौसाच्या रिकाम्या झोपडीत , ही नखा एवढी पोर आली आणि त्या झोपडीचं नंदनवन झालं . हौसाने आपलं सर्व अतृप्त मातृत्व तिच्यावर उधळलं . तिला शोधत कोणी येऊ नये अशीच हौसाची तीव्र इछ्या होती . तिने नवस केलेले सर्व देव तिला पावले . तिच्या हाकेला ओ देऊन धावत आले . पोरीला शोधायला कधीही , कोणीही आलं नाही . जणू काही ती पोर आकाशातूनच पडली होती .
. ती अशक्त पोर हळूहळू वाढू लागली . स्वप्नातही कल्पना करता येणार नाही असं रूप होतं तिचं . कुणाची पोर होती कोण जाणे , पण विलक्षण देखणी होती . लहानपणापासून नाचायची आवड . हौसानेपण स्वतःचं पोट भरेल आणि म्हातारपणी आपली काठी होईल म्हणून सर्व शक्य होत्या त्या तर्हांनी तिची -- कुसुमची -- नृत्याची हौस भागवली . गावातलीच एक कलावंतीण तिला नाच शिकवत होती .गावात तमासगीरांची पालं पडली की दिवस रात्र कुसुम त्यांच्यातच वावरायची . उपजत आवडीने मिळेत ते शिकत होती . उफाड्याच्या कुसुमने दहाव्यावर्शीच मंचावर ठसक्यात लावणी जिवंत केली होती . तेव्हां तिच्या ब्लाउजमध्ये कापूस , चिंध्या , स्पंज भरून तिला उभारी दिली होती . पण हा हा म्हणता तिला असल्या कृत्रिम उपायांची गरज भासेनाशी झाली .#सुरेखामोंडकर १४/०१/२०१७
क्रमशः

शनिवार, १४ जानेवारी, २०१७

कमलदलांचा पाश (९)
. . आयुष्याच्या संध्याकाळी , आज अचानक त्याची आठवण आली . ह्या आठवणी पण अजब असतात .एवढ्याश्या मेंदूत , कानाकोपऱ्यात कुठेतरी अंग चोरून निपचित पडलेल्या असतात . कुठचातरी निमित्ताचा दगड लागतो आणि मोहोळ उठते . आठवणी घोंघावत येतात . रोज संध्याकाळी बंगल्यासमोरच्या पार्कमध्ये ती येऊन बसते . लहान मुलांना खेळायला राखून ठेवलेल्या भागाच्या समोर . त्या छोट्यांना खेळताना बघून तिचा सगळा शीण नाहीसा होतो .त्या मुलांमध्येच होता एक छोटू .सावळा , बुटुक , फुगीर गालात चेपलेलं नाक आणि डोक्यावर भरगच्च , काळे कुरळे केस .
. तिला लहूची आठवण आली . कोण असेल हे पिल्लू ? लहूचा मुलगा ? छे, काहीतरीच काय ! तिची दोन्ही मुलं , मिळालेल्या पाहिल्या संधीला परदेशी निघून गेली होती . इकडच्या सर्व ऐश्वर्याकडे पाठ फिरवून . धाकटी लेक एका फ्रेंच मुलाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होती ." आई , तुला काय मिळालं , लग्न करून ? " तिने एकदा विचारलं होतं . मोठ्याला तर लग्नच करायचं नव्हतं .तिला वाटत होतं , परदेशात कां होईना , आपला वंश चालावा .पण मुलगा आपल्या घनदाट पिंग्या केसांची झुलपं उडवत म्हणायचा , " त्या साठी लग्न नाही करावं लागत , मुल अडोप्ट करता येतं ! " दोघांनी वेळच्यावेळी लग्न केलं असतं तर आज आपल्याला नातवंड झाली असती . त्यातील एखादं ह्या छोट्या एवढं असतं . मग हा छोटू लहूचा नातू असेल ?
. इतक्यात तिच्या जवळ येऊन पडलेला आपला बॉल घ्यायला तो छोटू आला . त्याला बॉल देता देता तिने विचारलं , " नाव काय बेटा तुझं ? "मुलगा लाजत , हसत उभा राहिला . त्याच्या बरोवर आलेली त्याची आई म्हणाली , " मराटी नय समजता ! " म्हणजे हा मुलगा अमराठी होता .
. . कुठे असेल लहू ? कसा असेल ? दारूत बुडून जीवनयात्रा संपवली असेल की बायको बरोबर नव्या आयुष्याची सुरुवात केली असेल ?" लहू , कां तू असा आगंतुकासारखा माझ्या आयुष्यात घुसलास ?कां तू तुझ्या लग्नाच्या रात्री मला फोन केलास ? का अपराधीपणाची भावना मला दिलीस ? विनापरवाना अशी कोणाच्या आठवणीतील जागा व्यापून टाकणं बरोबर आहे काय रे ? '
. . अंधार पडायला लागला होता . आज घरी त्यांचे आर्थिक सल्लागार येणार होते . परदेशातून मुलं इकडे येणार नव्हती . तिथलं नागरिकत्व त्यांनी घेतलं होतं . अंगात शक्ती आहे , बुद्धी चालतेय , तो पर्यंत इथल्या सगळ्या प्रोपरटीची कायदेशीर व्यवस्था करायला हवी . त्या बरोबरच ह्या आठवणींचा पण काहीतरी पक्का बंदोबस्त करायला हवा . राजीव घरी होता ; पार्किन्सनने आजारी ! एकटा ! त्याचे ते रोज संध्याकाळी बरोब्बर हजर होणारे मित्र आता कुठे होते कोण जाणे ? त्याला मदतनिसावर सोपवून रोज काही वेळ ती पार्क मधल्या उत्साहाने सळसळत्या जगात शिरून बसायची . हा वेळ खास तिचा होता . तिच्यासाठी प्यारोलचा मिळालेला काळ ! पण प्यारोल कधीतरी संपणारच !
. . तो छोटू दंगा करत होता , त्याला घरी जायचं नव्हतं . अंधार दाटत होता . आता मात्र तिला घरी परतायला हवं होतं . सुस्कारा सोडून ती हळूहळू उठली . घराकडे वळली . कुरळ्या केसांच्या त्या छोटुकडे पूर्णपणे पाठ फिरवून ! आठवणीची कवाड घट्ट बंद करून ! #सुरेखामोंडकर २/१/२०१६
.........समाप्त !
कमलदलांचा पाश (८)
. . तिने फोन ठेवून दिला .हुंदक्यांनी ती गदगदत होती . नेहमी प्रमाणे मुलं झोपली होती. राजीव अजून घरी आला नव्हता . " लहू , अपयशाचा कोणी वाली नसतो . तू अपयशी म्हणून एकटा , एकाकी ! दिसायला मी यशस्वी ! शिक्षण , बहरलेला संसार , संपत्ती -- सगळं आहे . पण मी देखील एकाकीच रे ! तू माझ्यामध्ये आधार , आपुलकी शोधतो आहेस . मी पण असाच कुठे कुठे आधार , जिव्हाळा शोधत होते रे . माझा पण विश्वासघात झाला . प्रत्येकाचे हेतू वेगळे असतात लहू . मी वेळेवर सावरले . नाहीतर कपाळमोक्षच झाला असता . तू पण सावर स्वतःला . आधार , बळ दुसरे कोणी नाही आपल्याला देऊ शकत ; आपला आपल्याला मिळवावा लागतो , द्यावा लागतो .एकाकीपणा आणि एकटेपणा ह्यातला फरक समजून घेण्याचा मी प्रयत्न करतेय . सगळ्या माणसांत असतानाही कां असा एकटेपणा आपल्याला ग्रासून टाकतो ; भरल्या संसारी का असे एकटे असतो आपण -- शोधतेय मी ! तू ही शोध ! हा शोध न संपणारा आहे ; पण त्या वाटेवर चालायला सुरुवात करणं महत्वाचं आहे . मी तुझा आधार नाही होऊ शकत . स्वतः स्वतःचा आधार बन ! '
. अकरा वाजून गेले होते . पुन्हा फोन ठणठणायला लागला . ती एकटक फोनकडे बघत बसली . तिने फोन उचलला नाही .वाजला वाजला आणि मग आपसूकच थांबला . पुन्हा नाही वाजला . तिला खूप वाईट वाटलं . लहूची एकुलती एक आशेची दोरीही तुटली होती . त्याच्या शब्दाला मान देऊन , खास त्याच्यासाठी ; फक्त त्याच्यासाठी आलेल्या त्याच्या म्याडम ; त्याच्या आनंदी , स्वच्छंदी आयुष्याशी जोडणारा -- त्या काळाचा साक्षीदार असणारा एकमात्र दुआ , त्याच्या म्याडम ! त्याचा आत्मसन्मान ,मान , प्रतिष्ठा , सर्व काही लग्नाला असणाऱ्या तिच्या उपस्थितीवर अवलंबून होतं .
.रिसीवर खाली काढून ठेवावा असं तिला कधीपासून वाटत होतं. पण एवढं निष्ठुर होणं तिला जमत नव्हतं . फोन पुन्हा वाजला नाही . बुडत्याने जीवाच्या आकांताने शेवटची धडपड करावी तशी ती त्याची शेवटची धडपड होती .#सुरेखामोंडकर ०२/०१/२०१६
क्रमशः
कमलदलांचा पाश ( ७ )
. दहाच्या सुमारास त्याचा पुन्हा फोन आला . आवाज रडवेला होता ." या ना म्याडम ; मी वाट पाहतोय तुमची . उशीर झालाय . मी स्टेशनवर तुम्हांला आणायला कोणालातरी पाठवतो . घरी पोचवायला पण माणूस देईन . सगळा हॉल रिकामा होत आलाय .पण भरलेला होता , तेव्हां पण माझं इथे कोणीच नव्हतं हो ! शांता , कुश शिकले . माझ्यासाठी सगळ्यांनी खूप प्रयत्न केले . पण नाही शिकलो मी . बाबांनी आपल्या ओळखीचा वापर करून नोकऱ्या मिळवून दिल्या . पण कुठेही टिकलो नाही .मला शेवटची संधी म्हणून , सर्वांनी मिळून वर्कशोप टाकून दिलं . पण तिथेही यश नाही आलं , म्याडम ,, मी त्या दिवशी तुम्हांला जेवायला बोलावलं , तेव्हां सगळं सांगणार होतो . तो माझा तिथला शेवटचा दिवस होता . वर्कशोप विकलं .कशीबशी सर्व देणी फेडली . घरच्यांनी लग्न लावून दिलंय .मी आता गावीं जायचंय आणि तिथलं घर , शेती सांभाळायचीय .तिथेच राहायचंय . पुन्हा कधी इकडे यायला मिळेल की नाही ..... माहित नाही !....... तुम्हीं पुन्हा भेटाल की नाही .... माहित नाही ! या ना म्याडम ...... मी सगळ्यांना सांगितलंय; तुम्ही माझ्यासाठी नक्की येणार ! .....सगळ्यांचे , सगळे नातेवाईक येऊन गेले . माझ्या सारख्या हरलेल्या माणसाचे कोण मित्र असणार आणि कोण नातेवाईक असणार ! मी जसा होतो तसा , माझे लाड करणाऱ्या , तुम्ही एकट्याच होता . मला वर्गात तुम्ही किती सांभाळून घ्यायच्या , हे मी विसरलेलो नाही . तुमच्या घरी आलो होतो , तेव्हांही तुम्ही मला किती मान दिलात ! तुमची मुलं , ' मामा .. मामा ' म्हणून माझ्या भोवती नाचत होती . या ना म्याडम ...... माझ्यासाठी या ! '
. . ती सुन्न झाली होती . डोळ्यातून अश्रू वाहात होते .एक अपयशी --- अयशस्वी मुलगा .... भावनिक आधार शोधत होता . त्याला वाटणारा .. त्याचा एकुलता एक आधार ; जीवापलीकडे पकडून ठेवायला बघत होता . शाळेत कधी तिने त्याचा अपमान केला नव्हता . त्याची कुवत जाणून , त्याच्यावर कधी अधिक अपेक्षा लादल्या नव्हत्या . काही गोष्टी त्याच्या समजशक्तीच्या पलीकडच्या आहेत हे लक्षात ठेवून, कधी थोडं फार मार्गदर्शन केलं होतं ; कधी दुर्लक्ष केलं होतं .पण हे एकट्या लहूच्या बाबतीत नव्हतं .त्याच्या सारख्या अनेक सर्वसामान्य बुद्धीमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तिने असंच धोरण ठेवलं होतं .बिचारे आधीच घरी दारी लज्जित होत असतात , त्यांना आणखीन काय खिजवायचं ! कदाचित भविष्यात , त्यांना झेपणारा एखादा मार्ग सापडेलही ------ मग त्यांचं आयुष्य सुंदर होईल . निदान आपला एक तास तरी त्यांना तणावरहित मिळूदे . वर्ग शिक्षिका असल्याने , पाहिला तास तिचा असायचा . त्यांची दिवसाची सुरुवात छान , अपमान विरहित व्हावी , इतकाच तिचा उद्देश असायचा .
. . पण न कळत पणे दिलेल्या वागणुकीच श्रेय लहूने तिला दिलं होतं . तिचं ऋण मानलं होतं . आपल्या आयुष्यात तिला मानाचं स्थान दिलं होतं .त्याचा माज , बेफिकीरपणा , ओढूनताणून आणलेलं उसनं अवसान होतं .आपण कोणीतरी आहोत ; आपल्याला पण एक दर्जा आहे , हे दाखवण्याचा तो केविलवाणा प्रयत्न होता .#सुरेखामोंडकर ०१/०१/२०१७

कमलदलांचा पाश (६)
. . जेवणाचं आमंत्रण नाकारल्यानंतर लहू दिसायचा बंद झाला होता . एक दिवस अचानक तो घरी आला . त्याच्या सारख्या माणसाने घरी येणं , तिला अजिबात आवडलं नव्हतं . ' काय म्हणाले असतील बिल्डींगमधील माणस त्याला बघून ! ' ती अवघडली होती . मनाविरुद्ध तिनं त्याचं आगतस्वागत केलं . चेहऱ्यावर नाराजी न दाखवता ! लग्नपत्रिका घेऊन आला होता तो !
. . " म्याडम , यायचं हं नक्की ! बघा कसा थाट उडवून देतो ते ! शांताच्या , कुशच्या लाग्नापेक्षाही दणक्यात होणार आहे . बघाच तुम्ही , साल्यांचे डोळे फाटणार आहेत . सगळ्यांनी यायचं हं ! "
. संभाषण वाढू नये ; त्याने लवकर घरातून जावं , म्हणून ती नुसती ' हं ! हं ! ' करीत होती . तो मात्र भल्यामोठ्या बाता मारत आरामशीर बसला होता . जायचा तेव्हांच गेला !
. अशी आमंत्रणं बहुतेक मानाची असतात ; बातमी देणं एवढाच उद्देश असतो . देणाऱ्याच्या पण फारशा अपेक्षा नसतात . लग्नाच्या दिवशी सक्काळी सक्काळी लहूचा फोन आला . " म्याडम , लक्षात आहे ना ? यायचं हं लग्नाला ! " ती चपापली . लग्नाला न जायचं तिने कधीच नक्की केलं होतं . तिला कळेचना , स्वतःच्या लग्नाच्या दिवशी , सर्व विधी चालू असताना , तिच्या सारख्या अल्प परिचिताला फोन करण्या एवढा वेळ , नवरदेवाला मिळतो कसा ? एवढा बहुमान ? तिच्या उपस्थितीच एवढं महत्व त्याच्या दृष्टीने का होतं ? तिने स्पष्टपणे सांगून टाकलं ,
. " मला यायला नाही जमणार लहू ! तुझं वैवाहिक आयुष्य सुखाचं जाओ! खूप खूप आशीर्वाद ! "
......... . तो एकदम गडबडला. त्याच्या आवाजातली गुर्मी कमी झाली . " म्याडम प्लीज या ना ! बर रिसेप्शनला या ! "
. पुन्हा पुन्हा विनवणी करू लागला . शेवटी तिने ठाम पणे , कठोर स्वरात सांगितलं , " लहू विधिंकडे लक्ष दे ! ते सर्व महत्वाचं असतं . मला यायला जमणार नाही . माझी वाट पाहू नकोस ! " तिने फोन ठेवून दिला .
.रात्री आठच्या सुमारास पुन्हा त्याचा फोन आला . " म्याडम , येताहात ना ? "
' लहू , तुला सांगितलं ना ? नाहीरे मला जमण्यासारखं . "
" प्लीज ..... प्लीज , या ना म्याडम ! "
" सॉरी लहू , मुलं लहान आहेत . त्यांना घेऊन नाही येता येणार . , त्यांच्या उद्या सकाळी शाळा आहेत . पहाटे उठावं लागतं त्यांना . ठेवूनही नाही येता येणार . त्यांची काळजी घ्यायला घरी कोणी नाही . "
. पण पंधरा पंधरा ; वीस वीस मिनिटांनी त्याचे फोन येतच राहिले . ती गोंधळून गेली होती . तो एवढा आग्रह का करत होता तिला ? रात्र वाढत चालली होती . त्याच्या आग्रहाचं तिच्यावर दडपण येत होतं .पण आता विचार बदलला असता तरी जाता येणं शक्य नव्हतं . तिला कळत नव्हतं , शांताच्या , कुशच्या लग्नाचं तिला आमंत्रण नव्हतं . शाळेतला विद्यार्थी ! तेव्हां पण कौटुंबिक मैत्री होती , असं नाही . मध्ये खूप काळ निघून गेला होता . कसलाही संपर्क नव्हता .. तो भेटला योगायोगाने .ती भेट सुद्धा नंतर मैत्रीत रुपांतरीत झाली नव्हती . होण्याची शक्यताही नव्हती . बौद्धिक , सामाजिक , आर्थिक , वयाचा -- केवढा मोठा फरक होता दोघांमध्ये ; आणि हा आज अस काय करतोय ? ' नाही ' म्हणायला अवघड वाटेल , एवढा आग्रह का करतोय ? " #सुरेखामोंडकर ०१/०१/२०१६
क्रमशः
कमलदलांचा पाश (5)
. . प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात आणणं सोपं नसतं . काही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक निर्लज्ज धाडस अंगी असावं लागतं , जे तिच्यात नव्हत . काही स्वप्नांशी , मनातल्यामनात खेळणं वेगळ आणि ती प्रत्यक्षात येणं वेगळ ; हे लवकरच तिला कळणार होतं .एकदिवस ती बाल्कनीत कपडे वाळत घालत होती . नेहमी प्रमाणे तिने समोरच्या फ्ल्याट कडे दृष्टिक्षेप टाकला . त्याचं पण बाल्कानिचं दार उघडं होतं .दारासमोरच्या भिंतीला टेकून असलेल्या बेडवर तो बसला होता . डावा पाय लांब सोडलेला , उजवा पाय गुढग्यात दुमडून शरीरापासून दूर ठेवलेला . त्या गुढग्यावर उजवा हात ठेवून , तो पंजाने तिला खुणा करत होता . बोटांच्या हालचाली करून 'ये ! ये ! ' सांगत होता .
. . ती भयचकित झाली . वाळत टाकायचा ओला कपडा हातात घेऊन ताठ झाली . डोक्यापासून पायापर्यंत पसरलेल्या जबरदस्त दहशतीनं ती गोठून गेली . तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता .अभावितपणे तिची नजर त्याच्यावर खिळली होती . हो ! तिला दिसलं तो भास नव्हता . खरोखरच तो तिला एका हाताने बोलवत होता . दुसरा हात , फाकवलेल्या दोन्ही मांड्यांच्या मध्ये हालचाल करीत होता . तिला पाहत तो मास्टरबेशन करीत होता . तिला घृणा आली , त्याची .... स्वतःची !गर्रकन वळून ती घरात गेली . बाल्कानिचं दार तिनं लावून घेतलं .
. मांजर डोळे मिटून दूध पित , पण जगाला ते कळत असतं . त्याच्यातील शिकारी नरान , मादीचा कमकुवतपणा हेरला होता . तिची अभिलाषा कधीच जोखली होती . मग त्याच्या उत्साहाची , खेळकर वृत्तीची , सौष्ठवाची जी झलक तिला मधून मधून दिसायची , ती त्याने मुद्दामहून तिला आकर्षित करण्यासाठी केलेली खेळी होती की काय ? एक शरीराने पूर्ण भरलेली प्रौढा ; अनुभवी , विवाहित ; म्हणजे पुढे काही जबाबदारी अंगावर पडणार नाही . तिने अभिसारिका बनून , त्याच्या इशाऱ्या बरोबर , लपत छपत त्याच्याकडे यावं , अशी त्याची अपेक्षा ? नव्हे ; ती येईलच ही खात्री ? कुठून येतो हा विश्वास ? युगानुयुगे , आपल्यामधील सर्वोत्कृष्ट जे असेल त्याचं प्रदर्शन मांडून , त्याचे विविध विभ्रम दाखवून मादीला आकर्षित करण्याचा , नराचा हा अहंकार की तिचाच दुर्बलपणा ?
. . खेळ तिनेच सुरु केला होता . कां बघत होती ती आसासून त्याच्याकडे ? पुरुषासारखीच स्त्रीलाही शारीरिक भूक असतेच . पण तिला ती भूक वाटेलत्या खानावळीत ; रस्त्यावरच्या ठेल्यावर भागवायची नव्हती . तिच्यावर प्रेम करत , हळुवारपणे , नजाकतीने , एक एक पाकळी फुलवत केलेला उत्सव तिला हवा होता , तो देखील तिच्या नवऱ्याकडून . इतक्या गलिच्छ इशाऱ्यावर त्याच्याकडे धावत जाण्या एवढी ती याचक नव्हती .तिला खूप अपमानास्पद वाटलं .
. पुरुष जर स्त्री कडे टक लावून बघत असेल , तर ती पण वेळ साधून त्याला अशा सूचक खुणा करत असेल कां ? ... करते की ! पण मग तिला एक नाव बहाल केलेलं असतं ! .....' वेश्या , छिनाल ..रांड ' .. अशा खुणा करणाऱ्या पुरुषाला पण , अशी काही खास नावं बहाल केलेली असतात का ? तिला तरी आठवत नव्हती .
. पुरुषाला असं कां वाटतं , की एखादी स्त्री आपल्याकडे बघतेय म्हणजे ती शरीरसंग मागतेय ! ही आपल्या पौरुषाची शान आहे ! तिची आग फक्त आपणच विझवू शकणार आहोत ! मुळात तिच्या शरीरात वणवा पेटला आहे ; हे तोच ठरवून मोकळा होतो . दुसऱ्या कोणत्याही शक्यता त्याच्या मनात येत नाहीत . होताच तो देखणा ; पुन्हा पुन्हा बघण्यासारखा . आवडायचा तिला !त्याच्याकडे नुसत्या बघण्यानेही तिला आनंदाच्या कारंज्यात भिजल्याच सुख मिळत होतं ! मानलेला भाऊ वगैरे कृत्रिम नाती तिला जोडायची नव्हती . मनातून तिला पक्कं माहित होतं की तो तिला ,' पुरुष ' म्हणूनच आवडत होता . पण ती आगीशी खेळतेय हे तिच्या लक्षात नव्हतं आलं . भावनांच्या आहारी जाऊन , त्यांच्या बरोबर वाहवत जाऊन , तिने काही गटांगळ्या खाल्या होत्या .थोडा पाय घसरला होता , थोडा तोल गेला होता . पण वास्तवात तरी , एकदा पाय घसरल्यावर कोणी चालायचं थांबतं का ? की उठून , उभे राहून , कपडे झटकून , झालेल्या जखमेला मलमपट्टी करून , पुन्हा नव्या उमेदीने चालायला सुरुवात करतं ? तेच करायला हवं ना ? अनुभवातून धडे घ्यायचे , चुका सुधारायच्या आणि मार्गक्रमणा चालू ठेवायची !
. रस्त्यावरून जाताना , शोकेसमध्ये लावलेली एखादी साडी आवडली ; रोज येता जाताना त्या साडीकडे मनभरून पाहिलं , तिच्या नजाकतीचा आनंद लुटला , म्हणजे ती साडी विकतच घ्यायची असते किंवा घ्यायलाच हवी ; आपल्या मालकीची - हक्काची करायला हवी , अंगावर लपेटायला हवी , असं थोडंच असतं . ती आपल्याला परवडणारी नाही , हे मनातून आपल्याला माहिती असतं ना ? एखाद्या सुंदर वस्तूला , व्यक्तीला पाहून -- नुसता दर्शनाचा आनंद नाहीका आपण घेऊ शकत ? त्या दिवशी तिच्या बाल्कनीचं दार बंद झालं , ते त्या नंतर , त्या घरात राही पर्यंत कधीच पुन्हा उघडलं नाही .#सुरेखामोंडकर ३१/१२/२०१६
क्रमशः
. कमलदलांचा पाश (४)
. . लग्न झाल्यावर नक्की काय झालं ? दुर्लभ गोष्ट एकदा मिळवली , आपलं यश साजरं केलं , की त्या वस्तूच मोल कमी होतं का ? हल्ली त्यांच्यात फक्त वाद होते ; संवाद नव्हताच . आधी यशस्वी होण्यासाठी तो धडपडत होता . यशाबरोबर समृद्धी आली आणि तो बदलतच गेला . पैशाने मिळणाऱ्या सर्व सुखांची त्याला चटक लागली . परदेशी उंची दारू , त्याच्या नसामधून वाहायला लागली . कधीही माहिती नसणारे , एक एक मित्र संध्याकाळी साडेपाच सहा पासूनच त्याच्या भोवती गोळा व्हायला लागले .गुळाच्या ढेपेला चिकटणार्या मुंगळयांसारखे . त्या नशा चढवणाऱ्या पाण्यासाठी , पाण्यासारखा पैसा वाहायला लागला . आरोग्याचा बळी गेला . घरातला विसंवाद वाढला . खुशमस्कर्यानी केलेल्या जयजयकाराची नशा ; जोपासल्या जाणाऱ्या आणि फुलवल्या जाणाऱ्या अहंकाराची नशा !
. कधीतरी रात्री तीन चारला तो घरी यायचा . नाना विचारांनी , अशुभाच्या कल्पनेनं , नशेत तो करीत असलेल्या ड्रायविंगच्या धसक्याने तिचा डोळ्याला डोळा लागायचा नाही . दाराचा आवाज आल्यावर अंगाची जुडी करून , डोळे घट्ट मिटून , ती , झोपेचं सोंग करायची . पण त्याला हवी तेव्हां , स्त्री देहाची मादक नशा तो तिच्या कडून वसूल करायचा .
. सिगारेटच्या धुराचा , घामाचा , बंद पब मधल्या हवेचा , अन्नपदार्थांचा संमिश्र वास त्याच्या अंगाला यायचा . तोंडाला दारूचा , तंबाखूचा उग्र वास ! तिला ते प्रेम कधी रुचलं नाही . फक्त वासना , शरीराची तीव्र मागणी -- भूक भागवायची एक कृती !हा म्हणे वैवाहिक हक्कच असतो , प्रत्येक विवाहित पुरुषाचा . ह्याला बलात्कार नाही म्हणत . प्रेम म्हणतात . पत्नीने जर नकार दिला , तर तो त्या पुरुषाप्रती कौटुंबिक हिंसाचार असतो .. मग अशा वेळेला , त्या आडदांड , नशेमुळे अधिकच आक्रमक बनलेल्या पुरुषाच्या स्वाधीन त्याचं हक्काचं शरीर करताना ; त्या स्त्रीच्या मनात , तिच्या आवडीचा पुरुष आला तर ? तो समोरचा स्पोर्ट्समन ? त्याचं चालणं , बोलणं , मोठ्याने हा --हा -- करून हसणं ; लांबूनच निरीक्षण केलेली त्याची प्रत्येक हालचाल ... !!
.
. . काय हरकत आहे ? खरंच , काय हरकत आहे !मन कुठे कुणाला दिसतंय ? मनात काय चाललंय ते कुणालाही कधीच कळणार नाही . शरीर तर त्याच्या मालकाच्या स्वाधीन आहे ना !त्या मालकाला तरी धुंदीत कळतंय का , आज आपल्या मिठीत कोण आहे ? पातिव्रत्य ..एक पतीव्र्त ; मनाने खुशाल पहावीत वेगळी स्वप्नं..... आणावीत ती प्रत्यक्षात .... मनातल्या मनात ! ह्याला व्यभिचार नाही म्हणत ! महत्व आहे ते फक्त योनी शुचितेला ; मनाच्या शुचितेला नाही --आणि असलं तरी त्याच्यावर कुठे कुणाचा पाहारा आहे ?
#सुरेखामोंडकर ३०/१२/२०१६
कमलदलांचा पाश ( ३)
. . त्या नंतर पुन्हा तो तिला तिथे दिसला नाही . सुरवातीला काही दिवस तिला चुकल्या सारखं वाटलं , तिने सुटकेचा निश्वास टाकला . सुंठी वाचून खोकला गेला . हळूहळू ती लहूला विसरून गेली . .
. . हल्ली तिला घरी जायची एक वेगळीच ओढ वाटायची . समोरच्या बिल्डिंगमध्ये एक तरुण राहायला आला होता . सध्यातरी एकटाच होता .सत्तावीस अठ्ठावीस चा असेल . लग्नाची पूर्वतयारी म्हणून फ्ल्याट घेतला असणार . दणकट शरीराचा , रांगडा ; बहुतेक स्पोर्टस् मन असणार . कधी कधी खांद्यावर भलीमोठी कीट लटकावून , येता जाता दिसायचा . तिला आवडायचा तो . त्याचं तारुण्य ,जोश ,उत्साह ,लोभस धांदरटपणा , मर्दानगी , चालण्यातला डौल -- सर्वच तिला खूप आकर्षक वाटायचं .तिच्या बाल्कनीचं दार ती नेहमी उघडं ठेवायची . घरात वावरताना , त्याच्या घराकडे नजर टाकायची .तो दिसला की नवथर तारुण्यातली अजब सळसळ तिच्या देहभर पसरायची .
. . थकल्या भागल्या ,हताश , हरलेल्या , प्रौढ शरीरात ह्या मोरपंखी भावना येतात कुठून ? त्या देखील , कुणातरी अनोळखी , परपुरुषा बद्दल ? तिचा प्रेमविवाह होता . सुरुवातीच्या एका हळूवार क्षणाला , तिने राजीवला विचारलं होतं , " काय आवडलं तुला माझ्यात ? '
. त्याने तिचे केस मोकळे करत म्हटलं होतं , " तुझे हे लांबसडक घनदाट केस ! तुला माहिती आहे ? तुझे केस पिंगे आहेत ; आणि डोळे पण तसेच पिंगे आहेत . पिंगट ... तपकिरी . तुझ्या केसांचं प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात पडलं आहे ! "
. . आपल्या चेहऱ्यावर तिचे रेशमी केस पसरवत , त्याने तिला घट्ट जवळ घेतली होती . तिच्या शरीराच्या कणाकणातून विजेच्या असंख्य ठिणग्या उडाल्या होत्या .पण त्याने तिला कधीच विचारलं नव्हतं , " तुला काय आवडलं माझ्यात ? " त्याने गृहीतच धरलं होतं का ; की स्त्रीला आवडणारं सर्व काही त्याच्यात आहे . नावडण्या सारखं काही नाहीच .
. .तिला कळत नव्हतं ; हे प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? कुठे असतं ? कसं असतं ? कसं दिसतं ? रूप , रंग कसा असतो त्याचा ? राजीवच तिच्यावर प्रेम होतं ? शाळा कॉलेजात त्याला मिळालेली अनेक मेडल्स , सर्टिफिकेटस , व्यवसायातील मान सन्मान , अवार्डस ; हे सर्व जसं त्याचं समाजातील स्थान उंचावर , अधिक उंचावर नेत होतं ; तसच तिचं पण त्याच्या आयुष्यातील स्थान होतं का ? देखणी , उच्य शिक्षित , उठावदार व्यक्तिमत्वाची एक स्त्री ! कुठेही बरोबर नेण्यासारखी , मिरवण्यासारखी ! पण तिचं तरी त्याच्यावर प्रेम होत का ? की तिने पण त्याला हो म्हणताना सुरक्षितता पाहिली होती ? आर्थिक , सामाजिक , वैयक्तिक !
. . राजीवने हर प्रयत्नाने तिला मिळवलं होतं . दोन वर्ष तो तिची प्रणयाराधना करत होता .तेव्हां कधीही , कुठेही , सहज आल्यासारखा भेटायचा . शब्दातून , डोळ्यातून , स्पर्शातून , आसक्ती व्यक्त करायचा . ती त्याला मिळणारच , ह्याची त्याला खात्री होती . आज पर्यंत त्यानं हवं ते मिळवलंचं होतं . मनात येईल ते मिळवणारा एक यशस्वी पुरुष ! #सुरेखामोंडकर ३०/१२/२०१६
कमलदलांचा पाश ( २ )
. . तिने इकडे तिकडे बघून घेतलं . वेळच आली , बोंबाबोंब केली , तर येतील ना लोक मदतीला ह्याचा अंदाज घेतला . कपाळाला आठ्या घालून , त्याच्याकडे बघत तिने स्मरणशक्तीचा रबर ताणायचा प्रयत्न केला .
" मी वर्गात होतो म्याडम तुमच्या ! "
.
. लग्नाच्या आधी ती शिक्षिका होती . मुलं होई पर्यंत नोकरी करत होती . दुसरं बाळ झाल्यावर मात्र तिला झेपेनासं झालं . दोन लहान मुलांचं संगोपन करायचं ; शाळेतली कामं उपसायची ; राजीवला कसलीही फिकीर नव्हती . त्याचं काम आणि त्याची महत्वाकांक्षा , ह्या पलीकडील त्याला काही दिसतच नव्हतं . तिची दमछाक व्हायला लागली . मुलांची ओढाताण व्हायला लागली .एकदिवस राजीनामा देऊन ती घरी आली ; घराच्या सेवेला रुजू झाली .
. . नोकरी सोडूनही आता काही वर्षं ओलांडली होती .एकदा सोडल्यानंतर शाळेशी संबंधच राहिला नव्हता . आयुष्य एवढं धावपळीच झालं होतं की कसल्या मैत्रिणी आणि कसल्या जुन्या आठवणी .झापडं लावलेल्या घोड्यासारख नुसतं पुढे धावायचं झालं! तिला काहीही आठवत नव्हतं .आताचा हा समोर असणारा राबस , प्रौढ पुरुष , किशोर वयात , विद्यार्थीदशेत कसा दिसत असेल , ह्याची कल्पनापण करता येत नव्हती . मुलं बदलत जातात . बालक - किशोर -तरुण - प्रौढ - कसं ओळखणार त्यांना ?
. तोच म्हणाला , " म्याडम , मी लहू ! आठवीत तुम्ही माझ्या वर्ग शिक्षिका होता ! "
. तरीही तिला आठवेना . मग तो एक एक संदर्भ द्यायला लागला . " आह्मी जुळे भाऊ होतो . मी आणि कुश . कुश नव्हता आपल्या वर्गात . मी नापास झाल्यामुळे मागे पडलो होतो . "
. ती नुसती "'हं ! हं ! " करत होती . मुलांची शाळा सुटायच्या आत घरी पोचायचं होतं . दाराला कुलूप बघून ती गोंधळली असती .
.
. " म्याडम ,माझी मोठी बहीण होती शांता ! आधी तुमच्या वर्गात होती .तुमची लाडकी होती . "
. शांताच नाव निघालं आणि तिला सणकन सगळं आठवलं . मोठी शांता आणि तिच्या पाठी ही जुळी . लहू आणि कुश .
. तिला लहू आठवला .साधारण बुद्धीमत्ता , सर्वसामान्य कुवत असणाऱ्या विद्यार्थ्याकडे शिक्षकांचं जेवढं लक्ष असतं , तेवढंच तिचं लहूकडे होतं . त्याच्यात खास काहीच नव्हतं . पण अंगात मस्ती पण नव्हती . शांत , समजुतदार मुलगा . पण आता हा असा काय दिसतोय ? माजोरडा ! तो रोजच त्या कोपऱ्यावर दिसायचा . एकदिवस तो पुढे आला , त्याचं बेफिकिरीने म्हणाला , " म्याडम , जेवायला येता ? मी रोज इथे हॉटेलात जेवतो . चांगलं आहे जेवण . इथे रस्त्याच्या पलीकडे आपलं वर्कशोप आहे . चला आज बरोबर जेवूया ! "
. त्याच्या धाडसाने ती थक्कच झाली . ह्याच्या बरोबर जेवायला जायचं ? घाईघाईने म्हणाली , " नाही रे ! घरी मुलं वाट पाहतील . "
" गाडी आहे आपल्याकडे . चला तुमच्या घरी जाऊन बच्चेकंपनीला पण घेऊन येऊ ! "
.पटकन तिच्या तोंडून गेलं ," गाडी तर माझी पण आहे . व्यायाम व्हावा म्हणून मी चालत येते . "
. बोलली आणि तिचं तिलाच समजेना , ' संबंध काय हे आता सांगण्याचा ? मी तुझ्यापेक्षा कमी नाही , आर्थिक कुवतीच द्योतक असणारी गाडी माझ्याकडे पण आहे , हे त्या पोराला सांगून , काय दर्शवयाच होतं तिला ? नेहमी तर ती म्हणायची , ' सर्व काही नवर्याचं आहे ,' मग वेळप्रसंगी हे ,' माझं ' कसं काय होतं ? त्या दिवशी ती त्याच्या बरोबर जेवायला गेली नाही .#सुरेखामोंडकर
२९/१२/२०१६
,कमलदलांचा पाश . ( १ )
.
. झोप पुरी होते की नाही , माहित नाही ! पण घड्याळाच्या गजराप्रमाणे उठायचं ! चुरचुरणाऱ्या डोळ्यांवर गार पाण्याचे हबके मारून , वाघ मागे लागल्यासारखं कामाला जुंपून घ्यायचं ! नाश्ता , डबे करून ; मुलांची तयारी करून , त्यांना शाळेत सोडून यायचं . घरी आल्या बरोबर दुपारचं जेवण बनवून ; स्वतःची तयारी करून ऑफिसात जायचं . हो ; 'त्याच्या ' ऑफिसात . तिचं होतंच काय ? घर , मुलं ,-बाळ , पैसा -अडका , वाहन ,ऑफिस , सगळं काही ' त्याचं ' होतं . तिच्या नवर्याचं ! राजीवचं ! मुलांची शाळा सुटून ,ती दोघं घरी यायच्या आत धावत पळत घर गाठायचं ! मुलं आल्याबरोबर त्यांच्या तैनातीला लागायचं . त्यांचं धुणं - पुसणं ; जेवण , अभ्यास , त्यांचं पोहणं , खेळ , आणखीन काय काय ! जेव्हां कधी बिछ्यान्याला पाठ टेकून , डोळे मिटतील तेव्हां ' रात्र झाली ' म्हणायचं आणि गजर झाल्यावर ' दिवस उजाडला ! ' ह्या सर्व शर्यतीत आजूबाजूला बघायला वेळ कुठे होता ?
.
. तरीपण एक दिवस , अचानक तिच्या लक्षात आलं ; ऑफिसमधून घरी परत येताना , रस्त्याच्या वळणावर , दिव्याच्या खांबाला टेकून , पायाची अढई घालून , एकजण उभा असतो , तिच्याकडे बघत ! आधीतर तिचा विश्वासच बसला नव्हता . तिच्या सारख्या पस्तिशीच्या बाईकडे कोण कशाला बघत राहणार आहे ? पण रोज त्या कोपऱ्यावर आल्यावर , तिची नजर तिकडे वळायचीच आणि ' तो ' तिथेच उभा असायचा , पायाला तिढा देऊन . बुटका , काळा , निब्बर , जाड ओठ , आत गेलेली हनुवटी . डोक्यावर गच्च बसलेले , काळेभोर कुरळे केस . तोंडात पानाचा तोबरा . त्याच्या चेहऱ्यावर माज . प्यांटच्या बाहेर उतू जाणारी ढेरी . बिअर बेली ..
.
. . एक दिवस त्याने बरोब्बर तिची नजर पकडली . उभ्या जागीच , पानाची पिचकारी मारून , लगबगीने तो पुढे आला . गुर्मीतच म्हणाला , " ओळखलंत का म्याडम ? " ती उभी शहारली ! #सुरेखामोंडकर २८/१२/१६
.
क्रमशः

सोमवार, ९ जानेवारी, २०१७

#चित्रपट_परीक्षण
#अर्धसत्य
. अख्या मुंबईवर ज्याची हुकुमत चालते . सर्व रंगाच्या दिव्यांच्या गाड्या ज्याच्या इशार्यावर चालतात किंवा थांबतात अशा ; मुंबईच्या गुन्हेगारी राज्याच्या अनभिषिक्त बादशहाच्या गुहेत ,दोन्ही हात कंबरेवर ठेवून 'तो ' उभा असतो . सब इन्स्पेक्टर अनंत वेलणकर ! संपूर्ण गणवेशात . ताठ ! रामा शेट्टीच्या डोळ्याला डोळा भिडवून , निडर , निर्भय !
. . आज पर्यंत गुन्हेगारी विश्वावर प्रकाश टाकणारे अनेक चित्रपट निघाले . खूप गाजले . नामवंत कलाकारांनी त्यात भूमिका केल्या . पण आजही , गोविंद निहालानिनी दिग्दर्शित केलेला , १९८३ मध्ये पडद्यावर आलेला ' अर्धसत्य ' गुन्हेगार आणि पोलीस यांच्या कथेवरील एकमेवाद्वितीय , चित्रपट मानला जातो . ओम पुरीच्या ' अनंत वेलणकर ने त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक आणि ह्या कचकड्याच्या चित्रपट सृष्टीच्या इतिहासात , कधीही पुसलं न जाणार नाव मिळवून दिलं .एका मुलाखतीत ओम पुरींनी , अमिताभ बच्चन यांचे आभार मानले होते .ही भूमिका आधी त्यांना देण्यात आली होती , त्यांनी नाकारल्या नंतर ते दान ओम पुरींच्या झोळीत पडलं ; आणि त्यांची चित्रपट कारकीर्द नावारूपाला आली .ते अनंत वेलणकर म्हणून अजरामर झाले .
. पूर्ण सत्य .. संपूर्ण सत्य कधी कोणाला कळत का ? किंबहुना आपल्यापर्यंत पोचतं ते किती टक्के सत्य असतं .जीवनाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ , मलपृष्ठ किंवा काही पानं आपल्याला दिसतात .त्यातही कितीतरी गोष्टी असतात , ज्या आपल्यापर्यंत पोचतच नाहीत ; मग संपूर्ण पुस्तकात तर किती गोष्टी लपलेल्या असतील , ज्या आपल्याला कधीच ज्ञात होत नसतील . आपल्या पर्यंत पोचतं ते अर्धसत्यच असतं का ?
.
. . अनंत वेलणकर , एक सौम्य प्रकृतीचा , संवेदनशील तरुण . बी ए झाल्यावर पुढे शिकून त्याला प्रोफेसर बनायचं असतं. . आक्रस्ताळी , निष्ठुर , उग्र बापाच्या दहशतीमुळे तो पोलीस खात्यात प्रवेश करतो . बापाने ,(अमरीश पुरी ) आईला कायम उठता लाथ , बसता बुक्की घातलेली असते ( माधुरी पुरंदरे ) . मनात अत्यंत संताप आणि बापाबद्दल घृणा असूनही कधी त्याला बापाला रोखता आलं नव्हतं , आईचा बचाव करता आला नव्हता . पोलिसांच्या निर्दयी दुनियेत तो रमत नाही . अकल्पनीयरित्या त्याच्या आयुष्यात ज्योत्स्ना गोखले ( स्मिता पाटील ) येते . ती कॉलेजात लेक्चरर असते . तिच्याच हातात तो ' अर्धसत्य ' हा कवितासंग्रह पाहतो , त्यातील तिची आवडती ,'चक्रव्यूह ' ही कविता वाचताना तो अंतर्मुख होत जातो .
. मानवी स्वभावाचा , एक एक पापुद्रा दृश्य चित्रातून , संवादातून , अलवार उलगडत जायचं , त्यावर कोणतही भाष्य , टीका टिप्पणी न करता , प्रेक्षकाच्या विश्लेषणात्मक वृत्तीवर निष्कर्ष सोडून द्यायचा ,हे ह्या सिनेमाचं वैशिट्य आहे .
सिद्धहस्त लेखक श्री. दा . पानवलकर यांच्या गाजलेल्या ' सूर्य ' ह्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे ( सर्वोत्कृष्ट कथेच पारितोषिक ) त्याची पटकथा केली आहे , नामवंत लेखक विजय तेंडुलकर यांनी ( त्यांनाही पारितोषिक मिळालंय ) वसंत देव यांनी संवाद लेखन केलं आहे . त्यातील चक्रव्यूह ही , कविता आहे दिलीप चित्रे यांची . ह्यातील छोट्या छोट्या ,दोन तीन मिनिटांच्या भूमिकाही , रंगभूमी वरील गाजलेल्या कलाकारांनी केल्या आहेत . ह्या चित्रपटाने पारितोषिकांची लयलूट केली आणि रसिकांच्या मनावर राज्य केलं .
. मनाविरुद्ध पोलिसात भरती झालेला अनंत वेलणकर आदर्शवादी होता . अडल्या नाडलेल्याना पोलिसांकडून मदत मिळाली पाहिजे ह्यावर त्याची श्रध्दा होती एका पांढरपेशा विवाहित स्त्रीशी भर रस्त्यात , गुंडांकडून असभ्य वर्तन केलं जातं . तिच्या पतीच्या तक्रारीवरून वेलणकर गुंडांना मोठ्या शिताफीने पकडतो . कोठडीत टाकतो . पण वरून आलेल्या एका फोनने त्यांची चुटकीसरशी सुटका होते . त्याला अपमानित केलं जातं .रामा शेट्टीच्या एका माणसाला , त्याच्याच आदेशावरून जबरदस्त मारहाण करून , जाळून टाकलं जातं . त्याच्या मृत्युपूर्व जबानी प्रमाणे वेलणकर शेट्टीला अटक करायला जातो . तेव्हां पण सर्व पुरावे हातात असूनही वेलणकरला केवळ एक फोन हतबल करून टाकतो . तोच रामा शेट्टी , निवडणुकीत निवडून येतो ; त्याच्या शक्ती प्रदर्शनाच्या मोर्चाला संरक्षण देण्यासाठी वेलणकरचीच नेमणूक करण्यात येते .
. असा कर्तव्यदक्ष अधिकारी कुणालाच नको असतो . त्याचा बॉस ( शफी इनामदार ) त्याला सावध करतो . तडजोड करायचा सल्ला देतो . एकदा आपल्या ओळखीचा उपयोग करून दिल्ली हून मदत मिळवून त्याला सस्पेन्शन पासून वाचवतो . सस्पेन्शन झाल्यावर , लोबोची ( नसिरुद्दीन शहा ) काय हालत झालेली असते आणि बेवारस कुत्र्यासारखा तो रस्त्यावर कसा मरून पडतो हे वेलणकरने पाहिलेलं असतं . पण शेपूट घालून नपुंसक जिण त्याला जगायचं नसतं.
एका मुलीला खोलीत डांबून तिच्यावर रेप केल्याच्या गुन्ह्यात तो , रामा शेट्टीच्या मुलालाच जेरबंद करतो . तो देखील ताठ मानेने , छाती पुढे काढून वेलणकरच्या समोरून निघून जातो .निराशेच्या गर्तेत गेलेला वेलणकर हळूहळू दारूच्या आहारी जातो . ज्योत्स्ना त्याला समजून घेते , पण तिने त्याचं आयुष्य पाहिलेलं असतं . एका मिल मधील संप , अन्यायकारक रीतीने , बेफाट मारपीट करीत संपवताना , तिने त्याला पाहिलेलं असतं . ती त्याला नोकरी बदलायला सांगते . " एक पुलीसवाला मेरा पती नहीं हो सकता ! " , हे अत्यंत संयमाने , वस्तुनिष्ठपणे समजावून देते . पण तेव्हां त्याला अवार्ड मिळण्याची शक्यता असते , वरची श्रेणी मिळण्याची खात्री असते .
. . त्याचं श्रेय हिरावून घेतलं जातं . ते अवार्ड त्याच्या नाकावर टिच्चून दुसर्याला दिलं जातं . बढती पण त्याच्यापासून दूर जाते . त्या दिवशी तो चिक्कार पितो . त्याचा स्वतः वरचा ताबा जातो . एका मामुली भुरट्या चोराला तो थर्ड डिग्री वापरतो " दुसरोंका हक चुराता है ... कीडे , कुत्ते " आपला सगळा अपमान , निराशा , व्यथा , हतबलता तो त्या बिचार्यावर काढतो .आरोपी मरतो . नोकरी वाचवण्यासाठी त्याच्यावर रामा शेट्टीचे पाय धरायची नामुष्की ओढवते . रामा शेट्टी दिलदारपणे त्याचे सर्व ' गुन्हे ' माफ करायला , विसरायला तयार होतो . अट एकच असते , वेलणकर
ने ह्यापुढे कायम त्याच्या आज्ञेत राहायचं . त्याची हांजी हांजी करायची .
. एकदा चक्रव्यूहात शिरल्यावर बाहेर पडायला दुसरा कोणीही मदत करू शकत नाही . ज्याचा त्यालाच , आंतरिक बळावर सुटकेचा मार्ग शोधून काढायचा असतो . नपुंसक पोलीस ऑफिसर पेक्षा , मर्दपणे जगण्याचं वेलणकर ठरवतो .
,. . एक पलडे में नपुंसकता
. एक पलडे में पौरुष
.और ठीक तराजू के कांटे पर
. अर्धसत्य !
Image result for अर्धसत्य  ( हिंदी  सिनेमा )Image result for अर्धसत्य  ( हिंदी  सिनेमा ). .ओबडधोबड , देवीच्या व्रणांनी भरलेला चेहरा , ढोबळ नाक . खोल गेलेले डोळे आणि किडकिडीत शरीरयष्टी .सिनेमात मुख्य भूमिका करण्यासारखं काहीही गाठीला नसताना . प्रचंड आत्मविश्वास , अभिनयातील कौशल्य आणि आवाजावरची हुकुमत ह्यांच्या सहायाने ही गुंतागुंतीची , मनोविश्लेषणात्मक भूमिका ओम पुरीने पडद्यावर जिवंत केली . आज टेक्नोलॉजीतील प्रगतीने ; गुन्हेगारी , राजकारण , पोलीस , कर्तव्य , न्याय . सर्व समानता ह्या सर्व विषयात आपल्याला ज्ञानी करून टाकलंय . ८३ साली मी जितकी अज्ञ होते तेवढी आज नक्कीच नाही . तरीही आज पुन्हा पाहताना हा चित्रपट मला विषण्ण करतो . इतके वर्षात आपण कुठे मार्गक्रमणा केली ह्या कोड्यात मला टाकतो .#सुरेखामोंडकर ९/१/२०१६