बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

    ज्याचा  त्याचा  श्रावण  .                                                             सुरेखा  मोंडकर    

 
.                         काळ  बदलला  , ऋतू  बदलले, माणस  बदलली  . कोणाचा  पायपोस  कोणाच्या  पायात  नाही  , अशी  अवस्था  आली  . नाग पंचमी  होऊन गेली तरी पावसाचा  पत्ता  नाही  . आषाढात  आला  होता ! श्रावण  सुरु  झाला  आणि  त्याने  दडी  मारली . आज  अचानक  कोसळतोय  . मध्येच  उन्ह  पडतंय . उन्ह  पाऊस  असला की लहानपणी  आम्ही  सर्व  मुलं , 'कोल्ह्याचं  लगीन  , कोल्ह्याचं लगीन  ' म्हणून  नाचायचो . जस जसा  मोठा होत  गेलो , तसा  ह्या  श्रावणात , उन्ह्पावसात , उदास , अधिकाधिक  उदास होत गेलो . आज छत्री  आणली  नव्हती  . मी  सुरु केलेल्या  शाळेचाच  मुख्याध्यापक  म्हटल्यावर इतर  काम  भरपूर  असत . पाऊस थांबल्यावर  घरी  जावं  म्हणून , शाळा  सुटल्या नंतरही  कसली , कसली काम  काढून ऑफिसमध्येच पूर्ण  करीत बसलो . कामात  चित्त लागत नव्हतं . 'तिच्या ' आठवणी  उफाळून येत  होत्या .त्या  गेल्या कधी  होत्या ? स्मरणशक्ती  हा माणसाला  मिळालेला  फार मोठा शाप आहे .

                     माझा  जन्म  गोकुळ अष्टमीचा   ! ती  गेली  तेव्हां  नारळी पौर्णिमा  होती . ह्या श्रावणाचा  आणि माझ्या आयुष्याचा  संबंध  काय  ? का त्याने  माझ्याशी  असं वैर  धरलं  होतं ? कधी कधी वाटतं , तिचं माझ्यावर  प्रेम होतं की नव्हतं ? होतं ....  तर  अशी  न  सांगता  सवरता सोडून   कां   गेली  ? माझं ..?  माझं  तिच्यावर प्रेम होतं ? तिच्यावरच्या  प्रेमामुळे मी ह्या गावात  स्वतःला बांधून  घेतलंय  कां ? संधी  असूनही , सर्व  महत्वाकांक्षा  बेचिराख  करून कां राहिलो ह्या गावात  ? त्यात  प्रेम ही भावना वरचढ  होती  ? की  नाकारलेपणाची  खंत , अपमान , दुखः , राग  अशा संमिश्र  भावना  होत्या  ? हताशपणा  ; जगात आपण कुणालाही नको आहोत , आपलं  कोणीही  नाही  , असा  पराभूतपणा  बेड्यांसारखा  पायात  अडकला  होता  कां ? ह्या  सर्व  नकारात्मक  भावनांनी  माझ्या  व्यक्तिमत्वाचा  घास  घेतला  होता  कां ? 

                   गावात  आमचं एकच ब्राह्मण  कुटुंब ! चातुर्मासात  सणवार , व्रतवैकल्य , पूजाअर्चा , लघुरुद्र  , महारुद्र , एकादष्ण्या , महापूजा  यांची रेलचेल  असायची . नानांना  जरा  उसंत नाही मिळायची . त्यात  नित्य  नैमित्यिक  पूजा तर असायच्याच  .दिव्याच्या  अवसेलाच  संध्याकाळी बुवा येऊन ठेपायचे . देवळा  जवळच्या मठीत उतरायचे . चातुर्मासात त्यांचं कीर्तन  , प्रवचन  असायचं . पांढरशुभ्र  करवती काठी  धोतर , तसाच शुभ्र सदरा , डोक्यावर पगडी , खांद्यावरून  मानेभोवती  टाकलेलं  ऐटबाज  उपरणं ! नाना  नेहमी पंचा  नेसतात . पंचाचा  रंग आणि   जानव्याचा  रंग  एकच असतो . मळकट ,पिवळट , लाल  ! अंगभर  कपडे  कधी  त्यांनी  घातलेच  नाहीत . 

                 नारळी  पौर्णिमेला  भरपूर  काजू  घालून  तिने नारळीभात  केला  होता . बेसनाचे  लाडू , खोबऱ्याच्या वड्या  केल्या  होत्या . मी  फस्त  करून  टाकतो  म्हणून नेहमी  ती  खाऊचे  डबे  उंच  फडताळात  ठेवायची . पण  त्या दिवशी मात्र लाडू , वड्यांचे  डबे तिने  घडवंची वर ; माझा  हात  पोचेल अशा  जागी ठेवले  होते  . सणाला  हिरवगार , रेशमी लुगडं ती नेसली  होती . अंगभर  दागीने  घातलेली  ती, देवी  सारखीच  दिसत  होती  . त्या रात्री  कीर्तन  संपल्यावर माणस  बत्तासा , खडीसाखरेचा  प्रसाद घेऊन  घरी  गेली . नंदादिपात  तेल घालून  ; गाभारा , सभागार  बंद करून , सर्व  व्यवस्था  लावून  नाना  घरी आले . पण  ती आली  नाही  . पाऊस  पडत होता  . छत्री न घेताच , भिजत  भिजतच  नाना  तिला  शोधायला पुन्हा  देवळाकडे  गेले . पण ती आलीच  नाही . बुरशी  आल्यावर  लाडू , वड्या  उकिरड्यावर  टाकून दिल्या . दुसऱ्या  दिवसापासून  कीर्तन  पण  बंद  झालं . त्या नंतर  गावात  चातुर्मासात  कधी  कीर्तन  झालंच  नाही  .
 
            चौथीत  होतो  मी  तेव्हां . शाळेतली  मुलं  , " किश्न्याची  माय  पलाली  " असं  बोंबलत  माझी पाठ  धरायची  . ओठ  गच्च आवळून , डोळ्यातून  पाण्याचं ठीपूसही गळू  न देता मी घरी  यायचो . नानांना  मी  कधीच  , काही  सांगितलं नाही . . ते पूजेला  देवळात  जाताना  पण त्यांच्या मागे , " बामनाची  बाईल  पलाली ... भट्टीन  काकू  पलाली ..  "असं  ओरडलेल  मी  खूप  वेळा  ऐकलं  होतं . ते  गावातून  मान खाली  घालून  जायचे .त्यांचं  दुखः माझं काळीज  चिरत  जायचं . त्या  नंतर  ते  कधी  बोललेच नाहीत .मुके  झाले  . 

            चातुर्मास  संपत  आला  . नानांनी  एकएक  सामान बांधायला  सुरुवात केली . गाव सोडून जायचं  , एवढं  मला  कळल .कुठे ? कधी ? काही  माहित  नव्हतं . एक दिवस  शाळेतून  घरी आलो तर ओटीवर  गावातली सगळी  मोठी  मोठी  माणस बसली  होती . वच्छी  भावीण मला  तिच्या  अंगणात  खेळायला  घेऊन गेली . दुसऱ्या  दिवसापासून  पोरांचं  चिडवणं  बंद झालं . नानांनी  एकएक गाठोडं सोडायला  सुरुवात  केली . गावाला  भटजींची  गरज होती .गावात  पाचवी  पर्यंत  शाळा  असूनही नानांनी  मला  चौथी  झाल्यावर  जिल्ह्याच्या  शाळेत  घातलं .

            सुट्टीत  मी  घरी  यायचो . पण ती कधीच  दिसली नाही . माझ्या  शाळेत   देखील   चमचा  लिंबू , लंगडी , पळण्याच्या  शर्यती  असायच्या .  जिथून  पळायला  सुरुवात  केली  , तिथे परत  आल्याशिवाय  शर्यत  संपायची  नाही ! मग , ती अशी कुठे  पळाली होती की परतच  आली नाही ? ती शर्यत  पूर्ण  करणार ; परत  इथेच  येणार  , ह्या  आशेने  मी  प्रत्येक  सुट्टीत  घरी येत  राहिलो . अनेक  प्रश्न  माझ्या  मेंदूचा  भुगा  करायचे . मला  तिला  जाब  विचारायचा  होता . उत्तर  हवं  होतं  मला  . शिक्षण  पूर्ण  करून  मी  गावातच  परत  आलो . तिची  वाट  बघत  दिवस  ढकलत  राहिलो  , काळजात  सल  घेऊन !

        आज  पाऊस  थांबायची  वाट  पाहता पाहता मी जवळ जवळ  वीस  वर्षा पूर्वीच्या  काळात जाऊन आलो .दर वर्षी  नारळी पौर्णिमा जवळ आली की माझी अशीच सैरभैर अवस्था होते .  पाऊस  कधीतरी  थांबला . विषण्ण मनस्थितीत  मी  घरी आलो . गडी  ,    वैरण  हालवून गोठ्याचा  एक  कोपरा  रिकामा  करीत  होता  . नाना  त्याच्यावर  देखरेख  करीत  होते  . काय  चाललंय  मला  समजलं  नाही . नाना तर  काही  बोलले  नसतेच .ते कधीच काही बोलत नसत ! पण आज   माझ्याकडे  बघून  ते  म्हणाले  , "" आलास ? उशीर झाला ! भिजलास  काय  रे  ? अंग  कोरडं  करून  घे  हो  ! "" एवढी  वाक्यं? एकदम  ? मी  आश्चर्यचकित  झालो . नेहमी  असहाय , विझल्या सारख्या  दिसणाऱ्या त्यांच्या  डोळ्यात  , मला  एक वेगळीच  चमक  दिसली . चेहऱ्यावर  सतत  दिसणारं अपयश  , दूर  झाल्यासारखं  वाटलं . 

        डोणीत  पाय  धुऊन  मी पायऱ्या  चढून  ओटीवर  आलो . कोपऱ्यात  एक  वृद्ध , कृश  बाई बसली  होती . दात  पडल्याने  गाल बसले  होते  .कपाळावर  मेणावर  लावलेली  पिंजर ; ठसठशीत  अधेली  एवढी ! कोनाड्यातील ; वर्षोनुवर्ष  तिथेच  असणारी , फणेरीची पेटी  तिच्या समोर  होती . शरयूलाही मी कधी  त्या फणेरीला हात  लावू दिला  नव्हता .ती ह्या बाईने  घेतली  होती ? मी थिजल्या सारखा  तिथे , खिळ्याने ठोकून  ठेवावा  तसा  उभा  होतो . 

            सात  महिन्यांचं , गर्भारपणाने  रसरसलेल  आपलं शरीर  सावरत शरयू माजघरातून  बाहेर  आली . अंग  पुसायला  पंचा  देत , खालमानेने  म्हणाली  , 

"अहो  ! त्या  आल्यात ! " अधिक  काही न बोलता , मला अंतर्मनातून सगळं काही  न सांगताच  समजलं ! ती आली  होती  ! माझी आई ! परत  आली  होती ! तिची  शर्यत  खरी खुरी  संपली  होती . पण  नेमकी कशी  आली; शरयूच  बाळंतपण जवळ आल्यावर ? लक्ष  ठेवून  होती  का आमच्यावर ? माझा  वंश  सुरु  करून द्यायला  आली होती  का ? .... काही काही   प्रश्नां पेक्षा  त्यांची उत्तरं कठीण  असतात  प्रत्येक  प्रश्नाचं  उत्तर  मिळालंच पाहिजे  असं  कुठं आहे ? माझ्या  डोळ्यातून  अश्रू  वाहत होते . आज मात्र मी ओठ  आवळले  नाहीत . त्यांना  रोखलं  नाही ; वाहू  दिले .

            अंग  मोहरवून  टाकणारा  ; चित्त  प्रफुल्लीत  करणारा  श्रावण ; प्रत्येकाच्या  आयुष्यात  कधी ना कधी येतोच ! त्याला  ओळखायचा  असतो . पकडून ठेवायचा  असतो . त्या  श्रावणानेच  नानांच्या  डोळ्यात चमक आणली , ओठावर शब्द आणले . बाहेर  पुन्हा  पावसाची  सर  आली होती . मला  माहित  होतं ; माझाही मेघ  येईल , मला भिजवून  जाईल . भिजत भिजतच अंगणातून  मी गोठ्यापाशी  गेलो , नानांना  म्हणालो , " गोठा रिकामा नका करू  नाना , घरात खूप  जागा  आहे  ! " .. नानांच्या  डोळ्यात  फुललेला श्रावण मी तृप्त मनाने  , डोळे  भरून  बघत राहिलो  !!
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा