सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

कवितेचा जन्म ( प्राथमिक )

कवितेचा  जन्म  ( प्राथमिक )
.
.फार फार वर्षांपूर्वी, हजारों वर्षांपूर्वी, प्राचीन काली, तुडूंब भरून दुथडी वाहणाऱ्या नद्या होत्या, घनदाट अरण्यं, फळाफुलांनी लहडलेली जंगले होती
. ह्या नद्यांच्या काठी मनुष्य वस्ती फुलत होती. राज्यं उदयाला येत होती, अस्ताला जात होती, नामशेष होत होती, ऐश्वर्य संपन्न होत होती
.
घनदाट अरण्यांतून ॠषी मुनींचं वास्तव्य होतं. त्यांचे यज्ञ याग, होम हवन चालू असायचं, तपश्चरण -साधना सुरू असायची. गुरूकुलामधून विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. विद्यासंपन्न होऊन आपल्या गुरूचे आणि कुलाचे पांग फेडायचे.
.
कारण परत्वे ॠषी मुनी पौरजनी मिसळायचे , राजे महाराजे पण आश्रमात भेट द्यायचे. असा तो काळ! एकदा वाल्मिकी ॠषी घनगर्द अरण्यातून मार्गक्रमणा करीत होते. त्यांनी एका शिकार्याला क्रौंचपक्षाची शिकार करताना पाहिलं.
.
बाण लागून तडफडणारा , रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, तो मरणोन्मुख, विद्ध पक्षी बघून, दु:खाने कळवळून, रागाने लाल होत, वाल्मिकी गरजले,
.
मा निषाद, प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा :
यत् क्रौंच मिथुनादेकमवधी काम मोहितं
( हे निषादा, चिरंतन काळ पर्यंत तुला प्रतिष्ठा मिळणार नाही कारण की कामेच्छा झालेल्या क्रौंच जोडप्यामधील एकाला तू ठार केले आहेस.)
.
.इसवी सना पूर्वी, दहा हजार वर्षांपूर्वी #जगातील_पहिली कविता #भारतातील एका #महर्षींच्या_वाल्मिकींच्या मुखातून व्यक्त झाली!
.
असं म्हणतात ते काव्य ऐकून ब्रह्मदेव मुग्ध झाले. प्रगट होऊन त्यांनी वाल्मिकींना #रामायण लिहायला सांगितलं आणि मग रामायण हे अजरामर महाकाव्य निर्माण झालं! ह्या विश्वातील पहिलं महाकाव्य!

कवितेचा जन्म ( ३ )

कवितेचा  जन्म  ( ३ )
.
.
कविता हा असा प्रांत आहे की , आवडो न आवडो तिचा उल्लेख नेहमीच होत राहतो . प्राचीनकाळी कवींना राजाश्रय असे . कालिदासा सारखे अनेक कवी राजदरबारी असत . राजाश्रयामुळे त्यांच्या चरितार्थाची सोय व्हायची आणि काव्य निर्मितीला त्यांना स्वस्थता लाभायची . तेव्हांही आणि आताही केवळ लेखनावर उचित अर्थार्जन अशक्यच . लेखन हा एक हौसेचा भाग होता आणि आहे . पैसे मिळवण्यासाठी काहीतरी निराळा उद्योग , धंदा करावा लागतो .
.
मोंगल बदशाहानी , राजस्थानातील राजांनी प्रतिभावान कवींना पदरी ठेवलं होतं . त्यांना भाट , चारण असं ही म्हटलं जायचं . हे कवी प्रामुख्याने आपल्या आश्रयदात्याच्या स्तुतीपर गीत रचायचे . त्यांना मानाचं स्थान होतं . राजे जेव्हां मोहिमेवर निघायचे तेव्हां वीर रसयुक्त , शौर्याला पोषक अशी गीतं गात हे भाट , चारण सैन्याच्या सर्वात पुढे असत . पण हळूहळू ह्या आश्रित कवींचं लांगुलचालन इतकं वाढलं की भाटगिरी करणं हा एक वाकप्रचारच तयार झाला . थोडक्यात मस्का मारणं .
.
तरी देखील अनेक राज कवींनी आपल्या प्रतिभेने काव्य सृष्टीत मानाचं स्थान मिळवलं . बडोदा संस्थानाने अनेक कवींना राजाश्रय दिला . यशवंत दिनकर पेंढारकर ( कवी यशवंत ) , भा . रा . तांबे , चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे हे राजकवी होते . गोपाळ नरहर नातू ( कवी मनमोहन ) यांनी मात्र स्वतःला राजकवी म्हणवून घेण्या पेक्षा लोककवी म्हणवून घेणे अधिक पसंत केलं .
.
कविता म्हणजे गागरमें सागर ! थोड्या शब्दात बरंच काही आपल्याला सांगून जाते . काही शब्दात जीवनाचं सार सांगते . आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन तयार करते . .प्रेरणा देते . कविता हा आपल्या भावविश्वाचा आधार असतो . अनुभव कवीचा असतो , पण त्याचं व्यक्तीकरण , काव्यरूप स्थलकालातीत असतं . म्हणूनच कधीही डफोडील ची फुले पाहिलेली नसली तरी ती कविता आपल्याला आवडते . कवी डाफोडील्स ची कुरणं आपल्या डोळ्यासमोर फुलवतो .
.
तरी देखील आजतागायत कवी हा टवाळकीचा विषय झाला आहे " जे न देखे रवी ,ते देखे कवी , ' असं अभिमानाने म्हणायचं ! प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे ' असं त्याचं कौतुक करायचं ! त्याच्या कवितांना , ' सृजनशील आत्म्याचा उच्चार ' म्हणायचं ! ' भावनांचा उत्स्फूर्त आणि उत्कट आविष्कार म्हणजे कविता ' असं मानायचं आणि त्याच कवीला कवडा म्हणायचं , त्याची टर उडवायची ; हे परंपरेने चालत आलंय .
.
नारायण मुरलीधर गुप्ते , ( कवी बी , १८७२ /१९४७ ) हे आधीपण कविता करत होते , पण त्यांची ' ट ला ट , री ला री | जन म्हणती काव्य करणारी " ही कविता प्रसिद्ध झाली आणि त्यांना अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली . म्हणजे काय जे स्वतः काव्य करीत होते त्यांनी पण कवींची खिल्ली उडवली आहे .
.
राम गणेश गडकरी ! कवी , नाटककार , विनोदी लेखक ! बाळकराम ह्या नावाने ते विनोदी लेखन करायचे . " कवीचा कारखाना " ह्या आपल्या विनोदी लेखात , त्यांनी कवींची विनोदी दृष्टीकोनातून मांडणी केली आहे . आपली कविता छंदोबद्ध , वृत्तबद्ध व्हावी ह्या साठी कवी शब्दांची किती ओढाताण करीत हे सांगताना त्यांनी एक वानगीदाखल रचना दिली आहे ,
"उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेंद्र मुखं प्रक्षालयस्व ट : |
प्रभाते रोदिती कुक्कु : चवैतुहि चवैतुहि |
निरर्थक शब्दांचा भरणा , शब्दांची ओढाताण , नको तिथे शब्द तोडणे ,मोडणे ; कवींच्या ह्या सवयीचा त्यांनी मोढ्या खुमासदारपणे आढावा घेतला आहे . पुढे ते म्हणतात , " ऐशी काव्ये कराया ; इकडून तिकडून आणलेली बुद्धी दे चक्रपाणी ! "
.
केशवसुत हे मराठी कवितेचे युगप्रवर्तक ! आद्य क्रांतिकारी कवी . व्यक्ती स्वातंत्र्याची , समतेची , क्रांतीची त्यांनी द्वाही फिरवली . आधुनिक मराठी कवितेचे ते पहिल्या मानाचे मानकरी .कवी आणि काव्य ह्या बद्दल त्यांना उचित अभिमान होता . ह्या टिंगल टवाळी वर त्यांनी प्रथम सणसणीत प्रहार केला . अभिमानाने मान उंचावून , त्यांनी टेचात , खणखणीत जाब विचारला , .
आम्ही कोण म्हणुनी काय पुससी
आम्ही असू लाडके देवाचे
आम्हांला वगळा ,गतप्रभ झणी होतील तारांगणे
आम्हांला वगळा , विकेल कवडीमोलावरी हे जिणे
दिक्कालांतुनी आरपार आमुची दृष्टी पहाया शके
फोले पाखडिता तुम्ही , निवडितो ते सत्व आम्ही निके '
..
ही गर्वोक्ती मुकाट्याने ऐकून घेतील तर ते आचार्य अत्रे कसले . आता कसं आहे अत्रे स्वतः सुद्धा समर्थ साहित्यिक , सिद्धहस्त लेखक , साहित्याच्या ..कलेच्या अनेक प्रांतातून त्यांनी मुशाफिरी केली . ते स्वतः एक चांगले कवी . त्यांनी केशवकुमार ह्या नावाने काव्य निर्मिती केली आहे . त्यांनी विडंबनात्मक उत्तर दिलंय ..,
आम्ही कोण ? म्हणून काय पुसता दात वेंगाडूनि
फोटो मासिक पुस्तकात ना तुम्ही का आमुचा पहिला ?
किंवा 'गुच्छ तरंग ' 'अंजली ' कसा अद्यापि न वाचला ?
चाले ज्यावरी अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रांतुनी ?
ते आम्ही -पर वाग्मयातील करू चोरून भाषांतरे
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी
डोळ्यां देखत घालुनी दरवडा आम्ही कुबेरा घरी
त्यांचे वाग्धन वापरून लपवूनही आमुची लक्तरे
काव्याची भरगच्च घेउनी सदा काखोटीला पोतडी
दाऊ गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे
दोस्तांचे घट बैसवून करूया आम्ही तयांचा उदे
दुष्मनावर एकजात तुटुनी का लोंबवू चामडी
आम्हांला वगळा -गतप्रभ झणी होतील साप्ताहिके
आम्हांला वगळा - खलास सगळी होतील ना मासिके
.
आचार्य अत्रे यांनी विडंबन काव्य केली . त्या नंतर आजतागायत अनेक विडंबन काव्य लिहिली गेली . पण त्यांच्या ' झेंडूची फुले ' ह्या विडंबन काव्य संग्रहाच्या तोडीचा , केवळ विडंबन काव्य असणारा एकही संग्रह आजतागायत नाही . ती व्यक्तीच अफाट होती !
.
प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी कविता करतो असं म्हणतात . मी मात्र अपवाद होते . पण फेसबुक वर माझी 'हायकू ' चारोळ्या ' ह्या काव्य प्रकारांशी ओळख झाली . खूप पूर्वी मी शिरीष पै ( आचार्य अत्रे , यांच्या प्रतिभावान कन्या ) यांच्या हायकू वाचल्या होत्या ,पण फेसबुकवर आल्यानंतर मी प्रथम कविता केल्या . एका समूहाच्या चारोळी स्पर्धेत मला काही वेळा बक्षीसही मिळालं . पण ते तेवढंच , मला कवितेची प्रतिभा नाही हे माझं मलाच लक्षात आलं
.
आजही कवितांची आणि कवीची टिंगलटवाळी होते . काहीजण दुखावतात , त्यांच्या साठी केशवसुत सांगून गेले आहेत , ते त्यांनी कायम लक्षात ठेवावं ,
.
अशी असावी कविता फिरून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहांत मोठे , पुसतो तुम्हांला .....

कवितेचा जन्म (२)

कवितेचा  जन्म  ( २ )
.
.
#साहित्याचे , गद्य आणि पद्य असे दोन विभाग केले तर त्यातील पद्य विभाग अधिक समृद्ध आहे . अगदी लहानपणापासून आपला संबंध काव्याशी , लय , तालाशी येतो . बाळाला पाळण्यात ठेवताना ' कुणी गोविंद घ्या .. कुणी गोपाल घ्या .. कुणी माधव घ्या ...' अशी नावं लयीत घेतली जातात . ( मुलीला पाळण्यात घालताना पण असंच म्हटलं जातं का ? की " कुणी लक्ष्मी घ्या .. कुणी सरस्वती घ्या ... " असा काही बदल करतात ? )
.
.नंतर मुल मोठं होत जातं तेव्हांही त्याच्या वाढी बरोबर , 'इथे इथे , इथे इथे नाचरे मोरा ... ; एक पाय नाचीवरे गोविंदा ...; बाळ उभं राहिलं , आम्ही नाही पाहिलं ......, ,चाल चाल बाळा , तुझ्या पायात वाळा .., , अशी कितीतरी सहज सुंदर बडबडगीते म्हटली जातात .
.
इसविसनपूर्व दहा हजार वर्षापूर्वी , " मा निषाद...." ही आद्य कविता , वाल्मिकी आद्य कवी आणि रामायण हे आद्य महाकाव्य मानलं जातं . गद्याच्या आधी पद्याचा जन्म झाला असं मानतात . प्राचीनकाळी सर्वच साहित्य निर्मिती पद्यामध्ये होत होती . गणिता वरील ' लीलावती ' हा ग्रंथ काव्यात आहे . त्या काळातील ज्योतिष शास्त्र , खगोलशास्त्र. , असे दुर्मिळ ; माहितीपूर्ण ग्रंथ पण काव्यात आहेत . पूर्वी यज्ञ करताना आदी मानव ऋचा म्हणत असतं . कवितेचा जन्म इतका प्राचीन आहे .
.
अभ्यासकांनी संत कवी , पंत कवी , तंत कवी असे ढोबळमानाने विभाग केले आहेत . कवितेचे विविध प्रकार आहेत . निसर्ग वर्णनात्मक ( कालिदासाचं , मेघदूत .. सर्वांनाच माहीत असलेलं काव्य ) , खंड काव्य , महा काव्य , दिंडी , लावणी , भलरी ( शेतकरी गीत ) , कोळी गीत , भूपाळी , फटका , भारुड , दशपदी , कणिका अशा विविध कविता . त्यात नंतर चित्रपट गीते , नाट्य गीते यांची भर पडली . शिवाय प्रासंगिक कविता पण होत्या . लग्नाच्या वेळी पारंपरिक मंगलाष्टका ! त्या संपल्यावर हौस म्हणून केलेल्या कविता . डोहाळतुली साठी , बारशाच्या वेळी , विहीणबाईसाठी केलेल्या कविता . मंगळागौर , भोंडला अशा खास प्रसंगासाठी रचलेल्या कविता !
.
मराठीने पर भाषेतील कविता पण आपल्याशा केल्या . हायकू ( जपानी ) सुनीत ( सोनेट ) गझल , रुबाया अशा काव्यामुळे मराठी कविता समृद्ध होत गेली . आधी कविता छंदोबद्ध होती . त्यावेळी कवितेचे नियम पाळण्याच्या प्रयत्नात , अनेक वेळा कविता जटील व्हायच्या . काव्यात मुक्तछंद आला , आणि कविता अधिकाधिक फुलत गेली .
.
.कविता इतकी प्रिय असते की त्यातील अनेक प्रकार आपण नामकरणासाठी स्वीकारले . ओवी , अभंग , श्लोक , कविता , काव्या ,ऋचा , अशी नावे , हौसेने आपण आपल्या मुलांची ठेवतो . पण प्रबंध , नाटक , नाट्यछटा , चरित्र अशी गद्य प्रकारांची नावे सहसा मुलांना ठेवलेली आढळत नाहीत . त्यातल्या त्यात कादंबरी नाव असतं , कथा सुद्धा कदाचित असू शकेल . पण बाकी गद्य प्रकार आपण मुलांच्या नामकरणात टाळतोच .
.
चालीवर म्हटलेलं , गद्यापेक्षा कवितारुपात सांगितलेलं , छंदात लिहीलेलं अधिक चांगलं लक्षात राहत . देवाची स्तुती स्तोत्रात केली आहे , आरती , भजन , कीर्तन हे काव्यात असतं आणि म्हणूनच अनेक वर्ष ते लक्षात राहून एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे अलगद हस्तांतरित होतं .आयुर्वेदाच्या कारिका वृत्तां मधे लिहिल्या आहेत . शास्त्रातील , गणितातील महत्वाची सूत्रे लक्षात ठेवण्यासाठी आपण त्यांना छोटंसं काव्यरूप देतो . लहानपणी झोपाळ्यावर झोके घेत तालावर म्हटलेले पाढे , आठवीत असताना पित्रे सरांनी सुरावर पाठ करून घेतलेलं ' देव: देवौ देवा : ' आणि संस्कृत मधील इतर शब्द , भिडे बाईनी पाठ करून घेतलेलं अलंकारांच गीत .." जाणा वसंततिलका तभजाजगागी ... भुजंगप्रयाती य हे चार येती ' आजही चांगलंच लक्षात आहे .
.
कवितेचा महिमा इतका अगाध असून सुद्धा एकंदरीतच कविता आणि कवी ह्यांची टिंगलटवाळी करण्याकडे एकंदरीत कल असतो #सुरेखा_मोंडकर २७/०८/२०१७
Add photos
#कविता ( २ )
.
कविता हा असा प्रांत आहे की , आवडो न आवडो तिचा उल्लेख नेहमीच होत राहतो . प्राचीनकाळी कवींना राजाश्रय असे . कालिदासा सारखे अनेक कवी राजदरबारी असत . राजाश्रयामुळे त्यांच्या चरितार्थाची सोय व्हायची आणि काव्य निर्मितीला त्यांना स्वस्थता लाभायची . तेव्हांही आणि आताही केवळ लेखनावर उचित अर्थार्जन अशक्यच . लेखन हा एक हौसेचा भाग होता आणि आहे . पैसे मिळवण्यासाठी काहीतरी निराळा उद्योग , धंदा करावा लागतो .
.
मोंगल बदशाहानी , राजस्थानातील राजांनी प्रतिभावान कवींना पदरी ठेवलं होतं . त्यांना भाट , चारण असं ही म्हटलं जायचं . हे कवी प्रामुख्याने आपल्या आश्रयदात्याच्या स्तुतीपर गीत रचायचे . त्यांना मानाचं स्थान होतं . राजे जेव्हां मोहिमेवर निघायचे तेव्हां वीर रसयुक्त , शौर्याला पोषक अशी गीतं गात हे भाट , चारण सैन्याच्या सर्वात पुढे असत . पण हळूहळू ह्या आश्रित कवींचं लांगुलचालन इतकं वाढलं की भाटगिरी करणं हा एक वाकप्रचारच तयार झाला . थोडक्यात मस्का मारणं .
.
तरी देखील अनेक राज कवींनी आपल्या प्रतिभेने काव्य सृष्टीत मानाचं स्थान मिळवलं . बडोदा संस्थानाने अनेक कवींना राजाश्रय दिला . यशवंत दिनकर पेंढारकर ( कवी यशवंत ) , भा . रा . तांबे , चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे हे राजकवी होते . गोपाळ नरहर नातू ( कवी मनमोहन ) यांनी मात्र स्वतःला राजकवी म्हणवून घेण्या पेक्षा लोककवी म्हणवून घेणे अधिक पसंत केलं .
.
कविता म्हणजे गागरमें सागर ! थोड्या शब्दात बरंच काही आपल्याला सांगून जाते . काही शब्दात जीवनाचं सार सांगते . आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन तयार करते . .प्रेरणा देते . कविता हा आपल्या भावविश्वाचा आधार असतो . अनुभव कवीचा असतो , पण त्याचं व्यक्तीकरण , काव्यरूप स्थलकालातीत असतं . म्हणूनच कधीही डफोडील ची फुले पाहिलेली नसली तरी ती कविता आपल्याला आवडते . कवी डाफोडील्स ची कुरणं आपल्या डोळ्यासमोर फुलवतो .
.
तरी देखील आजतागायत कवी हा टवाळकीचा विषय झाला आहे " जे न देखे रवी ,ते देखे कवी , ' असं अभिमानाने म्हणायचं ! प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे ' असं त्याचं कौतुक करायचं ! त्याच्या कवितांना , ' सृजनशील आत्म्याचा उच्चार ' म्हणायचं ! ' भावनांचा उत्स्फूर्त आणि उत्कट आविष्कार म्हणजे कविता ' असं मानायचं आणि त्याच कवीला कवडा म्हणायचं , त्याची टर उडवायची ; हे परंपरेने चालत आलंय .
.
नारायण मुरलीधर गुप्ते , ( कवी बी , १८७२ /१९४७ ) हे आधीपण कविता करत होते , पण त्यांची ' ट ला ट , री ला री | जन म्हणती काव्य करणारी " ही कविता प्रसिद्ध झाली आणि त्यांना अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली . म्हणजे काय जे स्वतः काव्य करीत होते त्यांनी पण कवींची खिल्ली उडवली आहे .
.
राम गणेश गडकरी ! कवी , नाटककार , विनोदी लेखक ! बाळकराम ह्या नावाने ते विनोदी लेखन करायचे . " कवीचा कारखाना " ह्या आपल्या विनोदी लेखात , त्यांनी कवींची विनोदी दृष्टीकोनातून मांडणी केली आहे . आपली कविता छंदोबद्ध , वृत्तबद्ध व्हावी ह्या साठी कवी शब्दांची किती ओढाताण करीत हे सांगताना त्यांनी एक वानगीदाखल रचना दिली आहे ,
"उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेंद्र मुखं प्रक्षालयस्व ट : |
प्रभाते रोदिती कुक्कु : चवैतुहि चवैतुहि |
निरर्थक शब्दांचा भरणा , शब्दांची ओढाताण , नको तिथे शब्द तोडणे ,मोडणे ; कवींच्या ह्या सवयीचा त्यांनी मोढ्या खुमासदारपणे आढावा घेतला आहे . पुढे ते म्हणतात , " ऐशी काव्ये कराया ; इकडून तिकडून आणलेली बुद्धी दे चक्रपाणी ! "
.
केशवसुत हे मराठी कवितेचे युगप्रवर्तक ! आद्य क्रांतिकारी कवी . व्यक्ती स्वातंत्र्याची , समतेची , क्रांतीची त्यांनी द्वाही फिरवली . आधुनिक मराठी कवितेचे ते पहिल्या मानाचे मानकरी .कवी आणि काव्य ह्या बद्दल त्यांना उचित अभिमान होता . ह्या टिंगल टवाळी वर त्यांनी प्रथम सणसणीत प्रहार केला . अभिमानाने मान उंचावून , त्यांनी टेचात , खणखणीत जाब विचारला , .
आम्ही कोण म्हणुनी काय पुससी
आम्ही असू लाडके देवाचे
आम्हांला वगळा ,गतप्रभ झणी होतील तारांगणे
आम्हांला वगळा , विकेल कवडीमोलावरी हे जिणे
दिक्कालांतुनी आरपार आमुची दृष्टी पहाया शके
फोले पाखडिता तुम्ही , निवडितो ते सत्व आम्ही निके '
..
ही गर्वोक्ती मुकाट्याने ऐकून घेतील तर ते आचार्य अत्रे कसले . आता कसं आहे अत्रे स्वतः सुद्धा समर्थ साहित्यिक , सिद्धहस्त लेखक , साहित्याच्या ..कलेच्या अनेक प्रांतातून त्यांनी मुशाफिरी केली . ते स्वतः एक चांगले कवी . त्यांनी केशवकुमार ह्या नावाने काव्य निर्मिती केली आहे . त्यांनी विडंबनात्मक उत्तर दिलंय ..,
आम्ही कोण ? म्हणून काय पुसता दात वेंगाडूनि
फोटो मासिक पुस्तकात ना तुम्ही का आमुचा पहिला ?
किंवा 'गुच्छ तरंग ' 'अंजली ' कसा अद्यापि न वाचला ?
चाले ज्यावरी अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रांतुनी ?
ते आम्ही -पर वाग्मयातील करू चोरून भाषांतरे
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी
डोळ्यां देखत घालुनी दरवडा आम्ही कुबेरा घरी
त्यांचे वाग्धन वापरून लपवूनही आमुची लक्तरे
काव्याची भरगच्च घेउनी सदा काखोटीला पोतडी
दाऊ गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे
दोस्तांचे घट बैसवून करूया आम्ही तयांचा उदे
दुष्मनावर एकजात तुटुनी का लोंबवू चामडी
आम्हांला वगळा -गतप्रभ झणी होतील साप्ताहिके
आम्हांला वगळा - खलास सगळी होतील ना मासिके
.
आचार्य अत्रे यांनी विडंबन काव्य केली . त्या नंतर आजतागायत अनेक विडंबन काव्य लिहिली गेली . पण त्यांच्या ' झेंडूची फुले ' ह्या विडंबन काव्य संग्रहाच्या तोडीचा , केवळ विडंबन काव्य असणारा एकही संग्रह आजतागायत नाही . ती व्यक्तीच अफाट होती !
.
प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी कविता करतो असं म्हणतात . मी मात्र अपवाद होते . पण फेसबुक वर माझी 'हायकू ' चारोळ्या ' ह्या काव्य प्रकारांशी ओळख झाली . खूप पूर्वी मी शिरीष पै ( आचार्य अत्रे , यांच्या प्रतिभावान कन्या ) यांच्या हायकू वाचल्या होत्या ,पण फेसबुकवर आल्यानंतर मी प्रथम कविता केल्या . एका समूहाच्या चारोळी स्पर्धेत मला काही वेळा बक्षीसही मिळालं . पण ते तेवढंच , मला कवितेची प्रतिभा नाही हे माझं मलाच लक्षात आलं
.
आजही कवितांची आणि कवीची टिंगलटवाळी होते . काहीजण दुखावतात , त्यांच्या साठी केशवसुत सांगून गेले आहेत , ते त्यांनी कायम लक्षात ठेवावं ,
.
अशी असावी कविता फिरून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहांत मोठे , पुसतो तुम्हांला ......#सुरेखा_मोंडकर . २८/०८/२०१७

रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

कविता

Add photos

गुरुवार, ९ मार्च, २०१७

#बाप्पाचा_गणपती_(भाग३ )

#बाप्पाचा_गणपती_(भाग ३ )
.
.
. . तयार मूर्तीला बॉडी कलर देऊन झाल्यानंतर , बाप्पाला गणरायाला सजवायला खूप आवडायचं . उत्तम रंगसंगती साधून शेला , कद तो नयनरम्य करायचा . मुकुट , कंठी , गळ्यातले इतर दागिने , दंडावरचे , हातातले दागिने ,सोंडेवरचं नक्षीकाम , कोरीव प्रभावळ --महिरप ; सगळं बाप्पा मनापासून करायचा . लाल , हिरवे , डाळिंबी , हिऱ्यासारखे चमकदार खडे वापरून तो गणपतीबाप्पाचं सौंदर्य चमकवून टाकायचा .
.
. . मधल्याकाळात पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागला . पीओपी च्या मूर्ती विरूद्ध जनजागृती व्हायला लागली .पर्यावरण स्नेही मूर्तींची गरज आणि मागणी वाढली . पण पर्यावरण ऱ्हासाने सगळ्यांचाच घास घेतला होता . गणपतीसाठी लागणारी शाडूची माती दुर्मिळ व्हायला लागली . ही मूर्ती बनवायला खास कारागीर , कलाकार लागतो . साचा वापरून पीओपीची मूर्ती कोणीही , साधारण कसब असणारा बनवू शकतो . पण मातीचा गणपती बनवायला , मूर्तीकला अवगत असणारा खास कारागीरच लागतो . असे मूर्तिकार आता कमी झाले आहेत . शाडूच्या मूर्तीच्या काही मर्यादा पण आहेत . तीन फुटापेक्षा उंच मूर्ती बनवता येत नाहीत .त्या तडकू शकतात . त्यांचं वजन जास्त असतं . वाहतूक अवघड असते . ह्या सर्व समस्यांचं निराकरण करता करता मूर्तीची किंमतही वाढते . सर्वसामान्य गणपती कारखान्यांना ते परवडत नाहीत . त्यांच्या आवाक्या बाहेर जातात .
.
. . बाप्पाच्या घरी पीओपीच्याच साच्यातील मूर्ती हमरापूरहून आणल्या जायच्या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी रंगकामाचा मुहूर्त व्हायचा . एका वर्षी घरापासून काही अंतरावरचं जुनं , पडीक ग्यारेज त्यांना काही महिन्या पुरतं भाड्याने मिळालं होतं . ताडपत्र्या , जाड प्लास्टिकचे तागे लावून पाण्याचा थेंब आत येणार नाही ह्याचा बंदोबस्त केला होता . कडेने सर्व मजलेवाल्या घडवंच्या लावल्या होत्या . त्यावर पांढऱ्या रंगहीन मूर्ती हारीने मांडल्या होत्या . रंग , वर्ख , निरनिराळ्या आकाराचे ब्रश , स्प्रे , मूर्ती रंगवताना लागणारा गोल फिरणारा पाट , सर्व जय्यत तयारी होती .
.
. . अपरात्री गाढ झोपेत असताना , खोल विवरातून आल्या सारखा आवाज त्याच्या कानावर आदळला . " बाप्पा , उठ ! उठ ! अरे घुसमटतोय . नाकातोंडात पाणी शिरतंय . उठ , बाप्पा उठ ! " बाप्पा खडबडून जागा झाला . सगळं घर गाढ झोपलं होतं . बाहेर आडवा तिडवा पाऊस पडत होता . चाळीचे पत्रे थाडथाड उडत होते .त्यावर पावसाच्या धारांचा अक्राळविक्राळ थयथयाट चालला होता . बाप्पा हडबडला . " अशी कशी कळीकाळासारखी झोप लागली ? " त्याच्या डोक्यात क्षणार्धात विजा चमकल्या . तो ताडकन उठला . " देवा , देवा , अरे काय करून ठेवलंस हे ! माझा बाप्पा ... माझा बाप्पा ! " दिवा देखील न लावता त्याने दार उघडलं . ओट्यावर उंबरठ्यामुळे थोपलेलं पाणी भसकन आत शिरलं . तो पर्यंत गोंधळामुळे अख्खं घर जागं झालं होतं . घरातले दिवे लागले . अंधारातच , अनवाणी , ग्यारेज कडे धावत सुटलेल्या बाप्पाच्या मागे सगळं घर धावलं . धावता धावता शेजाऱ्या पाजार्यांच्या घराची दारं बडवत , हाकारे घालत सगळे धावत होते .
.
. . जमिनीवर फक्त सिमेंट ओतून तयार केलेल्या ग्यारेज मध्ये तळातून पाणी घुसलं होतं . घडवंचीच्या तळाच्या कप्यातील गणपतीच्या सर्व मूर्ती भिजल्या होत्या .सगळे चाळकरी मदतीला आले . उरीपोटी उचलून , मिळतील ती आच्छादनं घालून सर्व मूर्ती सुरक्षित जागी आणल्या .मिळतील त्या निवाऱ्याच्या जागी ठेवल्या . वाचवता येईल तेवढं इतर सामान वाचवलं . त्या वर्षी आलेला तो अवकाळी पाऊस दोन दिवस कोसळत होता . सर्वांच्या तोंडचं पाणी त्याने पळवलं .
.
. गणपतीच्याच कृपेने काम सुरु झालं . मुहूर्त गाठता आला . पण त्या दिवशी पाण्यात भिजल्यामुळे आई आजारी पडली . तिच्या प्रकृतीच्या काळजीपेक्षा सर्वांच्या मनात पहिली धास्ती उभी राहिली , ' आता स्वयंपाक कोण करेल ? चुली समोरच वेळ द्यावा लागला , तर वेळेवर गिर्हाईकांच्या मागण्या पूर्ण कशा करणार ? " आई बरी होतेय तोंवर नेमका मन्याला अपघात झाला . कळल्यावर ; कुठे , कसा , कितपत लागलंय ; हे सर्व मनात येण्याच्या आत , प्रथम डोक्यात विचार आला , " मरतोय की काय ? आता डोळे कोण रंगवणार ? " बाप्पाला मेल्याहून मेल्या सारखं झालं होतं . गणपती आपलं सर्वस्व आहे हे खरं आहे ; पण त्याच्या समोर मायेच्या माणसांची काळजी पण आपल्याला वाटू नये ? त्यांच्या प्राणापेक्षा आपल्याला आधी आपलं काम आठवावं ? एवढे आपण अमानुष , स्वार्थी कधी .. कसे झालो / बाप्पा शरमिंदा झाला ! देवाच्ग्या दयेनं सर्व व्यवस्थित झालं . आई स्वयंपाक करू शकली . डोळे मन्यानेच रंगवले , गिर्हाईकांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या . सगळ्यांना संतोष झाला . .पण बाप्पा स्वतःच्या नजरेतून उतरला . त्या नंतर तो पुन्हा कधी हमरापुरला गेला नाही . तिरीमिरीत त्याने निर्णय घेऊन टाकला . नकोच तो दरवर्षीचा ताप ! गणपतीचा कारखाना बंद झाला . #सुरेखामोंडकर ०९/०३ /२०१७
*क्रमशः

#बाप्पाचा_गणपती_(भाग २ )

#बाप्पाचा_गणपती_(भाग २ )
.
.
. . बाप्पाच्या आजोबांची थेट खाडीपर्यंत पोचलेली भलीमोठी जमीन होती .आजोबांचा उदार , सर्वांना मदत करण्याचा स्वभाव आणि बदलत्या काळाचा न आलेला अंदाज ; ह्यामुळे त्या जमिनीवर त्यांच्या अनेक नातेवाईकांची , सोयर्याधायऱ्यांची , मित्र परिवाराची घरं झाली ; आणि ती ती जमीन , त्या त्या घरमालकाच्या घशात गेली . बाप्पाचे बाबा माळकरी ; व्यवहार त्यांच्याही ध्यानात आला नाही आणि आता त्यांच्या कुटुंबाकडे ते राहात असलेली एक लांबलचक चाळ आणि त्याच्यापुढचं आटोपशीर अंगण एवढंच राहिलं .
.
. . आजोबां पासून त्यांचा गणपतीचा कारखाना होता . भल्यामोठ्या बंदिस्त जागेत जवळ जवळ वर्षभर , नावाला काही महिन्यांची विश्रांती घेऊन कारखाना सुरूच असायचा . भाद्रपदात , गणेश चतुर्थीला सगळा कारखाना रिकामा व्हायचा . पण पूर्ण रिकामा नाही . भयाण , एकाकी वाटू नये म्हणून आजोबा पाच न रंगवलेल्या मूर्ती , निरनिराळ्या घडवंचीवर विखरून ठेवायचे . त्यांच्या घरच्या गणपतीला सोबत म्हणून , सवंगडी म्हणून ! अनंत चतुर्दशीला विसर्जन झाल्यावर कारखाना काही काळ शांत व्हायचा . मग पुन्हा माघी गणपतीचं काम सुरु व्हायचं . हे थोडंच असायचं . ते संपतंय तोवर पुन्हा भाद्रपदातील गणपती !
.
. . आजोबांचा हात कलाकाराचा होता . सगळं नाजूक , कौशल्याचं काम ते स्वतः करायचे . गणपतीचे डोळे ते असे काही रंगवायचे की कोणत्याही कोनातून पाहिलं तरी तो आपल्याकडेच पाहतोय असं वाटायचं . त्याच्या नजरेतील प्रेम , माया , ममता , कृपा , दिलासा , कणव , सर्व भाव वंदन करणाऱ्याच्या हृदया पर्यंत पोचायचे .
.
. . छोटा असल्यापासून बाप्पा आजोबांच्या हाताखाली कारखान्यात लुडबुड करायचा . जमेल ते , झेपेल ते काम करायचा . ओल्या मातीत लडबडायचा , रंगांनी बरबटायचा . बाबापण नोकरीवरून आल्यावर कारखान्यातच घुसायचे . हळू हळू मोठ्या , अवाढव्य मूर्ती बनवण्याचं वेड समाजात आलं . मूर्तिकारांची त्या शर्यतीत दमछाक व्हायला लागली . त्यासाठी लागणारी मोठी , बंदिस्त , सुरक्षित जागा ; त्यात गुंतवायला लागणारा पैसा ! छोट्या व्यावसायिकांची ससेहोलपट व्हायला लागली . जे तगले ते तगले , बाकीच्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं .
.
. . स्वतःची हक्काची जागा अतिक्रमणाने गिळंकृत केली होती . ह्याच्या त्याच्या हातापाया पडून , दरवर्षी कुठेना कुठे भाड्याने जागा मिळायची .पण स्थैर्य नव्हतं . डोक्यावर टांगती तलवार होती . पैसा अडकवायचा म्हणजे धास्ती वाटायची .; मूर्ती ठेवायला , रंगवायला पुरेशी जागा मिळेल की नाही !गणपती उत्सवात सार्वजनिक गणपतींच्या स्पर्धा असायच्या . त्यांनी पण मोठ्या मूर्ती बनवल्या . पहिली घाबरत घाबरत आठ फुटी , दुसऱ्या वर्षी थोड्या आत्मविश्वासाने दहा फुटी , त्याच्या पुढल्या वर्षी आणखीन हुरूप येऊन बारा फुटी . दोन रौप्य आणि एक सुवर्ण पदक त्यांना मिळालं . तेव्हां आजोबा नव्हते . त्यांनी याची देही , याची डोळा हा सोहळा पाहिला असता , तर ते धन्य धन्य झाले असते .गणपतीचे वत्सल , भावदर्शी डोळे रंगवायचं कौशल्य बाप्पाच्या बोटात आलं नव्हतं . आजोबा रंगकाम करायचे तेव्हां तो खूप छोटा होता . पण त्याच्या चुलत भावाच्या , मन्याच्या बोटात मात्र ती जादू आली होती . डोळे रंगवायचं काम तोच इमाने इतबारे करायचा ! लोक साधारण किती अंतरावरून बघतील ह्याचा अंदाज घेऊन तो आपल्या कुंचल्याने मूर्ती मनोहारी करायचा , जीवंत करायचा #सुरेखामोंडकर ९/३/२०१७
*क्रमशः .

#बाप्पाचा_गणपती_(भाग १ )

#बाप्पाचा_गणपती_(भाग १ )
.
.
. ..... . सकाळी लवकर येऊन बाप्पाने टेम्पो कंपनीच्या स्टोअर रुमच्या समोर लावला . आज सामानाची डिलिव्हरी होती .आज चतुर्थी होती . बाप्पाचा कडकडीत उपास असतो . पण त्याच्या उपासाचा त्याच्या कामावर कधीच परिणाम होत नाही . व्यवस्थीत प्याक केलेली खोकी त्याने क्रमवार लावून घेतली . सगळ्यात शेवटी असणारी , लांबच्या डिलिव्हरीची खोकी आधी रचून , त्याच्यापुढे एकेक खोकं रचत , त्याने चटाचट काम उरकलं . सर्व व्यवस्थीत आहेना , ह्याची त्याने एका नजरेत खात्री करून घेतली . योग्य ती कागदपत्रं घेतली . एखादा कलाकार जसा रंगभूमीला वंदन करून त्यावर पाय ठेवतो , त्या प्रमाणे गाडीत चढण्याच्या आधी त्याने गाडीला नमस्कार करून , उजवा पाय प्रथम आत टाकला .डयाश बोर्डवर चिकटवलेल्या गणपतीच्या छोट्या संगमरवरी मूर्तीला , कंपनीच्याच आवारातून आणलेलं लाल जास्वंदीचं फूल वाहिलं . हात जोडून पुटपुटला
.
. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा
.
.स्टीअरिंग व्हील ला नमस्कार करून त्याने गाडी सुरु केली .

. . आवारा बाहेर गाडी येऊन रस्त्याला लागल्यावर त्याने रेडीओ सुरु केला . .कुठचं तरी स्टेशन सुरु झालं .
मै रंग शरबतोंका
तू मीठे घाटका पानी
त्याच्या आवडीचं गाणं . तो तल्लीन होऊन ऐकत होता . डोळे रस्त्यावर खिळले होते . अतिशय सतर्क राहून तो गाडी चालवायचा .गाणं संपलं . दुसरं गाणं सुरु झालं . " चार बोटल वोडका " , त्याने वैतागून स्टेशन बदललं . अशीच कोणती कोणती , ट्रकर्सची , ठेक्याची , उडत्या चालीची , ज्याने झोप उडेल , डुलकी लागणार नाही अशी छचोर गाणी सुरु होती . रस्त्यावर डोळे ठामपणे भिडवून , एका हाताने व्हील सांभाळत , दुसऱ्या हाताने तो स्टेशन बदलत होता .आणि सटकन त्याच्या कानांनी एक गाणं पकडलं , ' गजानना तू गणराया ; आधी वंदू तुज मोरया !! '
.
. . तो खुश झाला . त्याचा गाण्यांचा शोध थांबला . तो तल्लीनतेने गाणं ऐकू लागला . फक्त बाप्पाच नाही , तर त्याचं संपूर्ण कुटुंब गणपती बाप्पाचे भक्त होते . त्याचं नाव सुद्धा गणपतीचाच प्रसाद म्हणून गणेश ठेवलं होतं . लहानपणी खेळताना सर्व पोरं त्याला गण्या म्हणायचे . खरं म्हणजे त्यात विशेष काहीच नव्हतं . नावांचे अपभ्रंश करणं पोरांमध्ये चालतंच . सगळीच मुलं पक्या , पम्या , बाळ्या अशाच नावाची होती . त्यांची खरी नावं पण कुणाला आठवत नव्हती . फक्त रवींद्र नावाच्या मुलाला रव्या न म्हणता , ' रवळनाथ ' म्हटलं जायचं . पोरंच ती , काहीही चालायचं ! पण गणेशला मात्र आपल्या नावाचं ' गण्या ' रूप केलेलं चालायचं नाही " अरे , देवबाप्पाचं नाव आहे चांगलं , असं तोडू मोडू नका रे !" तो नेहमी सांगायचा . एकदा पोरं म्हणाली , " मग काय तुला गणपतीबाप्पा म्हणू कां ? " काही दिवस गण्याच्या ऐवजी गणपतीबाप्पा हाक मारली जाऊ लागली . त्याचंच संक्षिप्त रूप बाप्पा केलं गेलं . आणि मग गणेश सर्वासाठी बाप्पाच झाला . #सुरेखामोंडकर ९/३/२०१७
क्रमशः

रविवार, ५ मार्च, २०१७

पंख होते तो ......... ( भाग २ , अंतिम ) लघुकथा समाप्त

... . पंख होते तो ..........! ( भाग २ )
.
.
. . तिने सुगृहिणी प्रमाणे मग , नीट धुऊन पुन्हा ट्रे मध्ये ठेवला . ब्याग उघडून त्यातले झोपताना घालायचे कपडे बाहेर काढले . " मी आलेच रे ! " कॉफी पिता पिता मी मुंडी हालवली .ती बाथरूम मध्ये गेली .
.
. . किती साधी , सरळ , निष्कपट आहे ही ! व्यवसायानिमित्ताने माझं जग फिरून झालं . कधीच बरोबर येण्याचा हट्ट केलान नाही . मी पण कसा कधीच तिला आग्रह केला नाही ? आत्ता सुद्धा , " लांब कशाला जायचं ? तुझा वेळ फुकट जाईल ! इथेच कुठेतरी इगतपुरी , लोणावळा , महाबळेश्वर, असं जाऊया ना ! कशाला इतके कामाचे दिवस वाया घालवायचे ? " अशी माझीच समजून घालत होती . किती अल्पसंतुष्ट आहे . हिच्या आर्थिक गरजा काहीच नाहीत . आज तिचा नवरा अशा स्थानावर आहे की ती जगभर बिझनेस क्लासने फिरू शकते , उंची वस्त्रं , सॉलीटेअर वापरू शकते . पण पाय जमिनीवर घट्ट रोवून ती तळागाळातील लोकांसाठी , समाजकार्य करतेय ! तेच आयुष्याचं उद्दिष्ट ठरवलंन आहे . आजवर खूप अन्याय केलाय मी तिच्यावर ! आता सनी अमेरिकेला शिकायला गेलाय . त्याच्या पदवीदान समारंभाला जाऊ , तेव्हां महिन्याभराची ट्रीप करूया ! अमेरिका फिरुया . जाताना येताना ब्रेक जर्नी करून युके , युरोप कुठेतरी फिरून येऊया . मी मनाशी पक्कं केलं !
.
. . ती बाथरूममध्ये गेल्याची खात्री झाल्यावर मी पटकन उठून माझी ब्याग उघडली . आजच्या साठी , तिच्यासाठी खास खरेदी केलेला , पीच कलरचा , सळसळता , मृदू मुलायम नाईट गाऊन बाहेर काढून ठेवला . समोर पाहिलं तर माझ्यापण आत्ताच लक्षात आलं ; बाथरूमची बेडरूम कडील विभाजक भिंत पूर्ण काचेची होती . त्याला नक्षीदार पडदा होता . पण ते तिच्या देखील लक्ष्यात आलेलं नव्हतं . तिने पडदा सारला नव्हता . मी अनिमिषपणे तिच्या सहज , डौलदार हालचाली बघत होतो . टब मध्ये तिने नळ सोडून ठेवले होते . बाजूच्या छोट्या कप्यात ठेवलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या रंगीबेरंगी कुप्या ती न्याहाळून बघत होती . डोळे बारीक करून , त्यावर लिहीलेलं वाचायचा प्रयत्न करीत होती .ती चष्मा बाहेर केटलच्या जवळ विसरली होती . चष्मा घेण्यासाठी तिने बाथरूमचं दार उघडलं आणि मी चपळाई करून , अलगद तिला मिठीत गोळा केलं . तिने सुटकेची थोडी धडपड केली , लटकी नापसंती दाखवली . पण तिच्या दळदार ओठांवर ओठ रोवून मी तिला गप्प केलं , तिचा विरोध मोडून काढला . तिच्या बरोबरच मी पाण्याने भरलेल्या टब मध्ये शिरलो . तिने वरची लेबलं न वाचताच , भराभर एकूण एक कुप्या टब मध्ये रिकाम्या करून टाकल्या , पाण्यात खळखळून हा थोरला फेस करून टाकलान ; त्या फेसाखाली स्वतःला झाकून टाकलंन . त्या शुभ्र धवल फेसात ती अलवार पणे हळूहळू माझ्या मिठीत विरघळत गेली .
.
. . अंगाला अलगद लपेटून बसलेल्या गाऊन मध्ये ती ताज्या टवटवीत फुलांच्या छडी सारखी दिसत होती .रूमवर मागवलेली , चांदीचा मुलामा असलेल्या छोट्या बादलीतली श्यांपेन घेताना आधी तिने खूप आढेवेढे घेतलेन , नाराजी दाखवलीन ," ए , मी कधी दारू पिते का ? " .." श्यांपेन म्हणजे दारू नसते ! " असे थोडे सौम्य संवाद झाले . पण तिचा विरोधही तीव्र नव्हता . हळूहळू श्यांपेन संपत गेली . रात्र फुलत गेली . स्पर्श बहरत गेले . शरीर रोमांचानी शहारत गेलं . सुखाची मखमल पसरत गेली . आजपर्यंत आम्ही फक्त एकत्र आयुष्य जगत होतो , आता एकरूप झालो होतो . ध्येयाच्या मागे बेफाम धावताना मी किती किती ..काय काय गमावलं होतं , ते मला आता कळत होतं . अजुनही फार उशीर झाला नव्हता . उरलेल्या आयुष्यात सर्व भरपाई करायची ! आता तिच्या बरोबर , तिच्या साठी , तिच्या जगात जगायचं ! उरलेल्या आयुष्यात तिला खूप खूप सुख द्यायचं ! मी अनावर झालो होतो .
.
. . रात्र गहिरी होत गेली . उत्तर रात्री कधीतरी मला जाग आली . माझ्या कुशीत ती गाढ झोपली होती , अत्यंत विश्वासाने ! तिच्या बद्दल अपार माया माझ्या मनात दाटून आली . मी तळहातावर हनुवटी तोलत तिच्या श्रांत चेहऱ्याकडे एकटक बघत होतो . न राहवून मी हलकेच वाकलो ; तिच्या गालावर अलगद ओठ टेकले . तेवढ्याही स्पर्शाने ती थरारली . तिच्या गालावरच्या खळीतील अमृत टिपायला मी जिभेने स्पर्श केला . हुंकार देत , तिने हात उभारले , माझ्या मानेभोवती टाकले आणि अतीव तृप्तपणे म्हणाली ......." विश्वनाथ .... ! "
.
. . मी चरकलो . माझं संपूर्ण शरीर लाकडासारखं ताठरलं होतं . दगडासारखं निष्ठूर , निश्चल झालं होतं . माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता . प्रयासाने , सर्व बळ एकवटून मी आणखीन वाकलो ; तिच्या ओठांजवळ कान नेला .. ती पुटपुटत होती , " विश्वनाथ ... विशू .. विशू !! "
.
. . तिचे ओठ आंधळ्यासारखे माझ्या चेहऱ्यावर , मानेवर , इथून , तिथून फिरत होते . तृप्ती , समाधान तिच्या अंगोपांगी ओथंबलं होतं . श्यांपेनच्या नशेने तिला बंधमुक्त केलं होतं .... आणि मी .... अनेक शंका कुशंकांच्या कोळिष्टकात अडकलो होतो . कोण होता हा विश्वनाथ ? तिचा लग्ना आधीचा प्रियकर ? .. अधुरी राहिलेली , पण हृदयात रुजलेली प्रेम कहाणी ? .. की आताच्या समाजकार्यातला कोणी सहकारी ? म्हणजे ते , " पंख होते तो उड आती रे " हे गाणं चुकून नव्हतं सुचलेलं ? मनाच्या तळाची वेदना व्यक्त करण्यासाठी होतं ?
.
. . मी हळूहळू तिच्या अंगाखालचा माझा हात सोडवून घेतला . निर्जीवपणे खिडकीपाशी येऊन , खाली पेटून उठलेल्या निखार्यांसारख्या हॉंगकॉंग वर विमनस्कपणे सिगरेटचा धूर सोडीत राहिलो . ती तशीच , मदिर धुंदीत , हसऱ्या , प्रसन्न चेहऱ्याने ; एकाच खोलीत पण कोसों दूर गाढ झोपली होती . #सुरेखामोंडकर २८/०२/२०१७
समाप्त !

भास आभास ( भाग ५ ) अंतिम

#भास_आभास_भाग५_अंतिम
.
. . श्रीची दुसरी सेमिस्टर संपली . आम्ही त्याच्याकडे जाऊन आलो . त्याचं कॉलेज , मित्र मंडळ , एकंदर सर्वच वातावरण मस्तच होतं . छान रमला होता तो .त्यामुळे मी पण खुश होते . सलोनीचा विषय मी काढला नाही . त्याच्या दृष्टीने तर त्यावर कधीच पडदा पडला होता . आम्हांला परत येऊन दोन दिवस पण झाले नाहीत आणि दोघी दारात हजर झाल्या . नेहमी जोडीनेच फिरतात की काय कोण जाणे ! एकदम घरातच घुसल्या .
.
. घायकुतीला आल्यासारखं सलोनीच्या आईने विचारलं , " श्री आलाय ? "
.
. " नाही हो ! "
.
." कुठे लपवून ठेवलात त्याला ? "
.
." अहो , लपवून कशाला ठेवेन ? "
.
. त्या शोधक नजरेने इकडे तिकडे बघत होत्या . " दाराला कुलूप लावून मला टाळायला बघत होता का ? "
.
. " नव्हतो आम्ही काही दिवस , म्हणून कुलूप होतं . "
.
. " श्री नक्की आलाय . तुम्हांला सांगायचं नसेल तर नका सांगू . मला पक्की माहिती आहे . त्या शिवाय का तो सलोनीला भेटायला बोलावतो ? "
.
.आता मात्र मी चरकले . ह्या सुंदर मुलीला कोणीतरी फसवतंय का ? श्रीच्या नावाचा उपयोग करून तिला गोत्यात तर नाही आणणार ? मी सावध झाले . " श्री तिला भेटायला बोलावतो ? "
.
. " हो ना ! "
.
." कसा बोलावतो ? फोन करतो ? कसा बोलावतो कसा ? "
.
." अहो एक का आहे ? प्रेमात पागल झालेल्याला हजार मार्ग सापडतात . कधी एस एम एस करतो . कधी ईमेल करतो . कधी पत्रपेटीत चिट्ठी टाकून जातो . कधी खुणेचा विशिष्ट प्रकारे , गाडीचा हॉर्न वाजवत रस्त्यावरून जातो ."
.
." कुठे बोलावतो ? "
.
. " कधी गावाबाहेरच्या तलावाच्या काठी , कधी टेकडीवर , कधी शंकराच्या देवळापाशी .ही आपली वेड्यासारखी प्रत्येक ठिकाणी तो सांगेल त्या वेळेला भेटायला जाते . "
.
. . भीतीने माझ्या अंगावर शहारा आला . नक्कीच कोणीतरी ह्या भाबड्या पोरीला फसवतंय . तिचा गैरफायदा घेतंय . " अहो तुम्हांला माहीत आहे तर तुम्ही का नाही जात तिच्या बरोबर ? तिला एकटीला का पाठवता अशा आडजागी ? "मी कळवळून विचारलं .
.
. " गेले होते ना , एकदा मी गेले होते तिच्याबरोबर . पण बहुतेक मी सोबत आहे हे त्याला कळलं होतं . त्या दिवशी तो आलाच नाही . तिथल्या कट्यावर चार टारगट पोरं बसली होती . आमच्याकडे बघून फिदी फिदी हसत होती . सगळ्यांनी सारखाच टी शर्ट घातला होता . काळ्या रंगाचा . श्रीचा आहे ना , तसाच . "
.
. . मला खूप हळहळ वाटली . इतका वेळ त्या उभ्याच होत्या . मी त्यांना कोचावर बसवलं . कळसूत्री बाहुलीप्रमाणे सलोनीपण बसली . त्यांचा हात हातात घेतला ." सलोनीच्या आई , माझ्यावर विश्वास ठेवा . खरोखरीच श्री भारतात आलेला नाही . तो त्याच्या अभ्यासात गर्क आहे . त्याला ईमेल्स करायला पण वेळ नाहीये .कोणीतरी सलोनीला फसवत तर नाहीये ना ? "
.
. त्यांनी डोळे विस्फारून माझ्याकडे पाहिलं . त्यांच्या मनात बहुधा ही कल्पनाच आली नव्हती . पण इतके दिवस गप्प असलेली सलोनी आज जोरात ओरडली , " नाही , कोणी फसवत नाहीये मला . श्रीच बोलावतो मला भेटायला . ईमेल्स करतो . त्याचं प्रेम आहे माझ्यावर . तुम्ही रागवाल म्हणून तो तुम्हांला सांगत नाहीये . पण तो लग्न करणार आहे माझ्याशी .मला पळवून अमेरिकेला घेऊन जाणार आहे . तुमच्या हाती मग आम्ही कधीच लागणार नाही .आमच्या जगात तुम्हांला प्रवेश नाही . '
.
.इतक्या दिवसांत सलोनीचा आवाज मी प्रथमच ऐकला होता . शब्दांतील जळजळीत भाव तिच्या स्वरात नव्हते . चेहऱ्यावर नव्हते . वाक्यांना न शोभणारा अगदी एकसुरी , सपाट आवाज होता तिचा . भावरहित चेहरा होता .
.
.नकळतपणे मी त्या निष्पाप पोरीला जवळ घेतलं . पाठीवर थोपटत राहिले . माझी जबाबदारी माझ्या लक्षात आली होती .थोडावेळ तिला शांत व्हायला देऊन म्हणाले , " अगं , माझा मुलगा मला खूप प्रिय आहे . मग त्याला आवडणारी प्रत्येक व्यक्ती मला प्रिय असणारच ना ! तुझ्याशी लग्न केलं तर मला राग का येईल ? त्याचा गैरसमज झाला आहे .आता पुढच्या वेळेला जेव्हां तो तुला बोलावेल तेव्हां मला बरोबर नेशील ? मी त्याला समजावते . "
.
.सलोनीची आई घाईघाईने म्हणाली , " अहो आजच बोलावलंय त्याने टेकडीवर . आम्ही तिकडेच चाललोय . "
.
. मी पटकन पायात चपला सरकवल्या .. ही संधी मला सोडायची नव्हती . जो कोणी तो गुंड आहे त्याला आज चांगली अद्दल घडवते . असा धडा शिकवते की पुन्हा म्हणून सलोनीच्याच काय , कोणत्याही मुलीच्या वाटेला जाणार नाही .
.
. . आम्ही तिघी टेकडीवर आलो .खूप वेळ वाट पाहिली . हळूहळू अंधार पडायला लागला . तरीही तो आला नाही . " मला माहीत होतं तो येणार नाही . त्याला बरोबर समजलं असणार आज तुम्ही आला आहात ते ! सलोनीला एकटीला गाठायला बघतो तो ." सलोनीची आई म्हणाली .
.
. आणखीन थोडावेळ वाट बघून निघावं , असा मी विचार करत होते . कुठे कोणी संशयास्पद व्यक्ती दिसतेय का , हे शोधक नजरेने चौफेर बघत होते . इतक्यात सलोनीची आई हलक्या आवाजात कुजबुजली , " ते बघा , ते चौघे टवाळखोर ! "
.
." कुठे ? "
.
." ते काय तिथे कट्ट्यावर बसलेत . आज पण चौघांनी सारखे शर्ट घातले आहेत . निळ्या चौकडीचे . श्रीसारखेच ! '
.
.त्या दाखवत होत्या त्या दिशेला मी न्याहाळून बघत होते . मला कोणीच दिसत नव्हतं . कट्टा दिसत होता , पण त्यावर कोणीच बसलं नव्हतं ..कट्टा पूर्ण रिकामा होता . रस्त्यावर दिवे लागले होते . त्यांच्या मंद पिवळ्या प्रकाशात झाडांच्या सावल्या कट्ट्यावर पडल्या होत्या . वाऱ्याच्या झोताबरोबर चित्रविचित्र रूपं घेत होत्या .
.
." नालायक , हलकट . ' सलोनीच्या आईचा आवाज चढायला लागला होता . " ह्यांनीच , ह्यांनीच श्रीला अडवलं असणार .त्याला ते सलोनीबद्दल खोटंनाट सांगतात . श्री मूर्ख नाहीये . तो फसणार नाही . तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही . मवाली , गुंड . माझ्या मुलीची टिंगल करता ? बघा , बघा कसे फिदी फिदी हसताहेत . अरे , बघून घेईन एकेकाला . पोलिसांत देईन . ' त्यांनी बोलता बोलता सलोनीचा हात पकडला . तिला खेचत टेकडी उतरायला सुरुवात केली . चालता चालता त्यांच्या तोंडाचा पट्टा अविरत चालू होता . मी त्यांच्या बरोबर आले आहे , हे त्या पूर्णपणे विसरून गेल्या होत्या . माझ्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही . हळूहळू दोघी दिसेनाशा झाल्या .
.
. मी तिथे एकटीच उभी होते आणि होता तो रिकामा कट्टा ! मी पाहिलेला 'देवराई ' सिनेमा मला आठवला . वाचलेलं ' देवराईच्या सावलीत ' हे पुस्तक आठवलं .हा सर्व प्रकार मला परिचित वाटू लागला . ह्या दोघींपैकी कुणातरी एकीला पराकोटीचे भास होत होते . अतीव प्रेम आणि सतत असणारी जवळीक , ह्यामुळे दुसरीला ते सगळं खरंच वाटत होतं . देह दोन , दोन मनं , पण स्वप्नं मात्र एकचं बघत होत्या . दोघी मिळून एकच चित्र रंगवत होत्या . अगदी मनापासून . त्या भ्रामक चित्रालाच सत्य मानत होत्या . त्यातच पूर्ण गुराफटल्या होत्या . मला ते आता कळत होतं . त्यावर उपाय आहे हे देखील माहीत होतं . पण आत्ता ह्या क्षणाला तरी कळवळून अश्रू ढाळण्याखेरीज माझ्या हातात काहीच नव्हतं #सुरेखामोंडकर -- ०६ /०३ /२०१७
*समाप्त .

भास आभास ( भाग ४ )

#भास_आभास_भाग४
.
.
. . श्री अमेरिकेला गेल्यावर घर एकदम रिकामं झालं . थोडे दिवस खूप उदास , बेचैन वाटत राहिलं . पण त्याचा कॉम्प्यूटर घरात होता , आधुनिक काळातल्या जलद संपर्काच्या सर्व गोष्टी मी हळू हळू शिकले . सगळं जगच जवळ आलं . श्री खूप दूर आहे असं वाटेनासं झालं . काही काळ रेंगाळलेलं आयुष्य पुन्हा धावायला लागलं . आता मी सकाळी टेकडीवर जायचं बंद केलं होतं . लांब पडलं तरी चालायला उद्यानात जात होते .
.
. . एकदा बाजारातून घरी येत होते , तर ह्या दोघी फाटकाशी उभ्या . माझीच वाट पहात होत्या . खरं सांगते , मला एकदम भीतीच वाटली .आता काय आणखीन ? वळून जाणंही शक्य नव्हतं . त्यांनी मला येताना पाहिलं होतं . घरात कोणीच नव्हतं . आईपण तिच्या घरी गेली होती . मी सगळं बळ एकवटून पुढे आले .फाटक उघडलं . माझ्या पाठोपाठ त्या दोघी आत आल्या . मी घराच्या पायरीवरच पिशव्या ठेवल्या . सलोनीच्या आईकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं .
.
. . त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वहात होते . दाटलेल्या आवाजात म्हणाल्या , " का ? का , छळतोय हा आम्हांला असा ? "
.
." कोण ? "
..
." तुमचा मुलगा . तुम्ही सांगितलंत ते सर्व आम्ही मान्य केलं ना ? त्यानंतर एकदाही सलोनी श्रीला भेटली नाही . आता तर तो अमेरिकेला गेलाय . तिकडे मजा करत असणार . जगू दे की आम्हांला पण शांतपणे . किती छळणार ? अजून किती छळणार ? "
.
." काय झालं काय ? " मी घाबरूनच गेले .
.
." हा पोरगा सलोनीला रोज ईमेल करतोय . प्रेमाने ओथंबलेल्या . आणाभाका घेतोय . माफी मागतोय . पण मी तुम्हांला साफ सांगते , माझी मुलगी काही रस्त्यावर नाही पडलेली . इतका अपमान झाल्यावर ती त्याच्याकडे पुन्हा ढुंकूनही नाही पाहणार . असे हजार श्री तिच्या पायावर लोळण घेतील असं रूप आहे तिचं . "
.
. . ह्या वेळेला मला त्यांचा राग नाही आला .एकही हिंस्र विचार मनात नाही आला . मी जरा सावध झाले होते . " हो सलोनी ,? श्री तुला ईमेल करतो ? "
.
. तिने नेहमीप्रमाणे नजर नसलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं . नेहमीप्रमाणेच काही बोलली नाही . मला तिची खूप खूप कणव आली . मी पुढे काही बोलणार इतक्यात तिची आई गरजली , " तिला कशाला विचारता , मी सांगतेय ना ? "
.
. " तुम्ही पाहिली ती ईमेल ? "
.
." पाहिल्याशिवाय सांगतेय का? "
.
." वाचली होती ? "
.
.आता त्या गडबडल्या . प्रामाणिकपणे म्हणाल्या ," मी चष्मा नव्हता लावला ."
.
." पण तुम्हांला वाटलं नाही का , की चष्मा लावून एकदा त्या ईमेल्स वाचाव्यात ? " आता त्या सावरल्या होत्या . " अहो मेल वाचून ही इतकी रडते , कासावीस होते . तिला सावरणार की मेल्स वाचणार ? "
.
."बरं , एका इमेलचा प्रिंट आउट आणून द्या . "
.
." आमच्या कडे प्रिंटर नाही " त्यांनी खालच्या स्वरात सांगितलं .
.
." ठीक आहे . निवडक ईमेल्स मला फॉरवर्ड करा ." मला माझा ईमेल आय डी त्यांना द्यायचा नव्हता , पण नाईलाजाने द्यावा लागला .
.
" त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाला चांगली समज द्या ना . म्हणावं , झालं ना तुझ्या मनासारखं , मग आता माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही . ती तुझ्यापेक्षा हुशार मुलाशी लग्न करून , तुझ्या नाकावर टिच्चून येईल की नाही बघ अमेरिकेला . "
.
. " सगळं सांगते त्याला . आधी त्या मेल्स मी स्वतः वाचेन . फॉरवर्ड करा मला .".
.
.त्या पुन्हा आल्याच नाहीत . ईमेल्स पण फॉरवर्ड केल्या नाहीत .#सुरेखामोंडकर
०५/०३/२०१७ ....... * क्रमशः

भास आभास ( भाग ३ )

#भास_आभास_भाग३
.
.
. . आम्ही उठलो . आई पण येणार म्हणाली . मला देखील श्री अमेरिकेला जाण्याच्या आत सर्व समज - गैरसमज दूर करायचे होते . कोणत्याही शंका , संशय उरायला नको होते . अवेळ होती , पण इलाज नव्हता . श्रीने जितूला फोन करून बोलावलं .
.
." तो कशाला आणखीन ? जगजाहीर करायचंय का ? "
.
. ' असू दे बरोबर . जुनिअर केजी पासून आम्ही बरोबर आहोत . किती वर्षांची दोस्ती आहे आमची . एकमेकांपासून आम्ही काही लपवत नाही .बघू त्याला ती आठवतेय का ! उपयोगच होईल आपल्याला त्याचा ."
.
. . पत्ता माहीत नव्हता . आडनाव माहीत नव्हतं . ' सलोनी 'ह्याखेरीज काहीच माहीत नव्हत . पण एकदा त्यांनी बोलता बोलता घराजवळच्या मारुतीच्या देवळाचा उल्लेख केला होता . गावातला एक अत्यंत लोकप्रिय चाटवाला त्यांच्या बिल्डींगच्या तळमजल्यावर आहे , हे पण त्या बोलल्या होत्या .तेवढ्या खुणांवर पत्ता शोधायचं ठरवलं . सुदैवाने पत्ता बरोबर मिळाला . चाटवाल्याने तर फ्ल्याट नंबरही सांगितला .पण सलोनीची आई म्हणाल्या प्रमाणे , रस्त्यावर गर्दी खूप होती . तऱ्हेतर्हेची वाहनं उभी होती . पार्किंगला जागा मिळेना . शेवटी श्री म्हणाला , " तुम्ही सगळे वरती जा . आजी किती वेळ उभी राहणार ! मी बाजूच्या एखाद्या गल्लीत गाडी लावून येतो ."
.
. . मी फ्ल्याटची बेल दाबली . सलोनीच्या आईनेच दार उघडलं . आम्हांला सर्वाना पाहून प्रथम चकितच झाल्या . मग खूप खुश झाल्या . आम्हांला बसायला सांगितलं . फ्यान सुरु केला . जितुकडे बघून म्हणाल्या , ' श्री , मला खात्री होती , तू नक्की येशील ! "
.
.त्यांची एकाच गडबड उडाली होती . तिथूनच हाक मारून त्या म्हणाल्या , " सलोनी , अगं बघ कोण आलंय ! श्री आलाय श्री ! मी तुला म्हटलं नव्हतं ? असा कसा विसरेल तो तुला ? "
.
. ,. आम्ही सर्वांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिलं . ' हा श्री नाहीये ' हे माझ्या जिभेवर आलेलं वाक्य मी गिळलं . सलोनी बाहेर आली . समोर बसली . रात्रीच्या पोशाखात , झोपेच्या अवतारात पण ती खूप छान दिसत होती . तिचे बाबा बाहेर येऊन बसले . जितूलाच श्री समजून सलोनीची आई खूप बोलत होती . अत्यानंदाने तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं. सलोनी गप्पच बसली होती . तशीच पापण्या लववून , शांतपणे . तिचे बाबा अस्वस्थपणे चुळबुळ करीत होते . पण काहीच बोलत नव्हते . बायकोला गप्प करीत नव्हते , संभाषणाला दिशा देत नव्हते .
.
. . इतक्यात पुन्हा बेल वाजली . श्री आला . पार्किंग साठी बरंच लांब जावं लागलं असणार . आता ह्यांनी तोंड उघडलं , " हा आमचा मुलगा , श्री ! "
.
. . हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली . सलोनीच्या आईचा चेहरा उतरला . पण लगेच त्यांनी सुरु केलं , " तरी मला वाटलंच , श्री इतका वेगळा कसा दिसतोय . एवढा कसा बदलला , मी म्हणतच होते ............"
.
. . त्यांचं वाक्य तोडत ह्यांनी खालच्या पण धारदार स्वरात विचारलं , " सलोनी , तू श्री ला ओळखतेस ? "
.
. . . तिने मान वर केली . समोर पाहिलं . काहीच बोलली नाही . ' हो ' पण नाही आणि ' नाही ' पण नाही . तिची दृष्टी भिरभिरत होती . ती कोणाकडेच पहात नव्हती . .त्या डोळ्यांत ओळखच नव्हती . ज्याला मी तिचा शांतपणा मानत होते , तो निर्विकारपणा तर नव्हता ना !
.
.ह्यांनी पुन्हा विचारलं , ' श्रीने तुला लग्नाचं वचन कधी दिलं होतं ? "
.
. ती तशीच गप्प बसली होती . चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते . नाक , डोळे सुंदर असलेला एक चेहरा , बस ! भावना विरहित !
.
. . ह्यांनी खूप समंजसपणे तिच्या बाबांना सर्व समजावून सांगितलं .तिच्या आईला समजावलं .होते ते दोघे एका कॉलेजमध्ये दोन वर्ष . पण त्या शैक्षणिक संस्थेच्या आर्टस सायन्स , कॉमर्स , म्यानेजमेंट , डिप्लोमा इंजिनिअरिंग अशा बऱ्याच शाखा होत्या . प्रत्येक इमारत स्वतंत्र होती . मुद्दाम प्रयत्न केल्या शिवाय कुणाला भेटणं सहज शक्य नव्हतं . श्री तर तिला ओळखतही नव्हता . जितूलाही ती माहीत नव्हती . मग सलोनीचा , तिच्या आईचा , असा गैरसमज का झाला होता कळत नव्हतं . तिचे बाबा तर काहीच बोलत नव्हते . एकाएकी ते उभे राहिले . हात जोडून म्हणाले , " माफ करा . तुम्हां सर्वाना खूप त्रास झाला . विसरून जाऊया सगळं! "
.
. . विसरणं इतकं सोपं नव्हतं . त्यांना तर नव्हतंच , पण आम्हांलाही नव्हतं . पण एक बरं झालं . श्री जायच्या आत सगळा सोक्षमोक्ष लागला होता . डोक्यावरचं ओझं उतरलं होतं . माझं मन स्वच्छ झालं होतं .
#सुरेखामोंडकर .. ०५/०३/२०१७ .... *क्रमशः
. "

भास आभास ( भाग २ )

#भास_आभास_भाग
.
.
. . श्री तर सारखा घाईतच असायचा . अमेरिकेला शिक्षणासाठी जायचं म्हणजे पूर्वतयारी पण खूप होतीच , पण सारखे काही ना काही कार्यक्रम पण असायचे .. कधी कौटुंबिक , कधी मित्रपरिवाराबरोबर . एकदा त्याच्या सर्व मित्रांना घरी जेवायला बोलवायचं ठरवलं . मला एकदम आठवण झाली , " ए सलोनीला पण बोलाव हं ! "
.
." कोण सोनाली ? '
.
. " सोनाली नाही रे , सलोनी ! स -लो - नी .. ! "
.
." अशी कोणी माझी मैत्रीण नाहीये ! "
.
." अरे , नाही कशी ? ती आणि तिची आई आपल्या घरी पण आल्या होत्या . ती तुझ्याच बरोबर शिकत होती ."
.
." सलोनी ? नाही , आठवत नाही ! माझ्याबरोबर शिकत होती का ? कधी ? शाळेत ? कॉलेजात ? की जुनिअर कॉलेजमध्ये ? मला कशी आठवत नाही ? "
.
.अरेच्या ! हे तर मला पण माहीत नव्हतं . आता पुन्हा भेटल्या की नक्की विचारायचं . पण हल्ली माझं पण वेळापत्रक बदललं होतं . टेकडीवरच्या फेऱ्या कमी झाल्या होत्या . श्री ची तयारी , खरेदी , ब्यागा , त्यांची मापं , वजनं , त्याच्यासाठी करायचे आवडीचे पदार्थ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे , त्याचा जास्तीत जास्त सहवास लुटण . मी त्यातच गुंतून गेले होते . दिवस भराभर सरकत होते . सलोनी आणि तिची आई , दोघीही विस्मरणाच्या कप्प्यात गेल्या होत्या .
.
. . एक दिवस दुपारी दोघी घरी आल्या . नेमका श्री घरी नव्हता . एकदा त्यांना भेटला असता म्हणजे बरं झालं असतं . चेहरा बघून कदाचित त्यालाही ती आठवली असती . त्यांचं चहापाणी करता करतानाच मी विचारलं , " सलोनी कधी होती श्रीच्या बरोबर शिकायला ? शाळेत होती का ? एका वर्गात होते ? "
.
. . सलोनीची आई भडाभडा बोलतच गेली . माझ्या डोळ्यासमोर भर दिवसा काजवे चमकायला लागले . ती जे सांगत होती ते धक्कादायक होतं . सलोनी श्री बरोबर जुनिअर कॉलेज मध्ये होती . श्री सायन्सला आणि ती कॉमर्सला ! तेव्हां म्हणे श्रीने तिला लग्नाचं वचन दिलं होतं . नंतर तो आय . आय .टी. ला गेला . होस्टेलमध्ये राहायला लागला . त्यांची भेट होईना . सलोनी सैरभैर झाली . तिच्या अभ्यासावर परिणाम झाला . बारावीला ती नापास झाली . पुन्हा दोनदा परीक्षेला बसली , पण पुन्हा तिला अपयश आलं . सध्या ती कॉम्प्यूटर कोर्स करतेय . सलोनीची आई कळवळून सांगत होती , " सलोनी खरंच खूप हुशार आहे . प्रेमभंगामुळे तिच्या अभ्यासावर परिणाम झाला . खूप प्रेम आहे तिचं श्री वर . त्यांचं दोघांचं लग्न होऊदे . मी वचन देते तुम्हांला , ती त्याच्या तोडीस तोड शिकेल . त्याच्या सारखीच इंजिनिअर होईल . त्याला अभिमान वाटेल असं शिक्षण घेईल . " त्या रडत होत्या .
.
. . श्रीने तिला फसवलं होतं . तिचा विश्वासघात केला होता . तिच्या बरबादीला तो कारण होता . मी हादरून गेले होते . एकदा वाटलं , ह्या बाईच्या झिंज्या उपटाव्यात . एकदा वाटलं श्रीला कानफटावं . एका निष्पाप मुलीच्या आयुष्याचं असं मातेरं करायचा त्याला काय अधिकार ? श्री जाणार म्हणून आई आलेली होती . आमचा आवाज ऐकून ती हॉलमध्ये आली . माझा हात धरून , माझ्या शेजारी बसली . केवळ तिच्या आधाराने मी खूप प्रयत्नाने स्वतःवर काबू मिळवला . " बोलते श्री बरोबर ! " एवढं कसं बसं बोलून मी आतल्या घरात गेले . त्या कधी गेल्या , आई बरोबर काय बोलल्या , काही माहीत नाही . डोकं ठणकत होतं, डोळ्यातून पाणी येत होतं, हातापायांना कंप सुटला होता . एका क्षणाला खाडकन जाणवलं , हे सर्व बोलणं चाललेलं असताना सलोनी हातांची बोटं एकमेकांत गुंफून शांतपणे बसली होती . पापण्या खाली झुकवून . जणू काही हे सर्व बोलणं दुसऱ्याच कोणाबद्दल तरी चाललं होतं .
.
. . थोड्या वेळाने आई थंडगार सरबत घेऊन आली . शेजारी बसली . पाठीवर हात ठेवला आणि माझा बांध फुटला . उरी फुटून , हंबरडा फोडून मी ढसाढसा रडायला लागले . एकही शब्द न बोलता आई मला कुशीत घेऊन बसली होती . थोड्या वेळाने माझी मीच शांत झाले .. आईने माझ्या हातात सरबताचा ग्लास दिला आणि हळूच म्हणाली , " ती मुलगी कॉमर्सला होती ना , मग इंजिनिअर कशी होणार ? शिवाय जर ते दोघे बरोबरीचे असतील तर ती जेव्हां पहिल्यांदा बारावी नापास झाली तेव्हां श्री कुठे आय . आय. टी . ला गेला होता ? तो पण बारावीलाच होता ना ? सध्या तरी शिक्षण अकरावी पास इतकंच आहे , आणि वय श्री इतकंच ........ जर त्या सर्व खरं सांगत असतील तर हं ! मग .... हे सगळं .... '
.
. . मी डोळे पुसत आईकडे पाहिलं . तिचा चेहरा आश्वासक होता . मी प्रथमच विचार करायला सुरुवात केली . सलोनीच्या आईशी ओळख झाल्यापासून एक एक प्रसंग पडताळून पाहायला लागले . आई पुन्हा माझा अंदाज घेत , माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखत म्हणाली , " अगं , चांगल्या घरचा , शिकला सवरलेला , अमेरिकेला जाणारा , एकुलता एक मुलगा म्हणजे ...'
.
. . आईची ही सवयच होती . ती शक्यतो संघर्ष , वादविवाद टाळायची . आपली मत ठामपणे न सांगता अशी नेमक्या शब्दाला , वाक्य पूर्ण न करता सोडून द्यायची . तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा .तिने फक्त एक दिशा दाखवली आहे एवढंच ! " हे बघ , आल्या आल्या त्याला फैलावर नको घेऊस . आधी तुम्ही दोघे मिळून विचार करा . एखादा दिवस गेला मधे तरी हरकत नाही . " हे मात्र तिने ठामपणे सांगितलं .
.
. . . रात्री जेवणं झाल्यावर ह्यांना सर्व सांगितलं . कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता , दोघांनीही आपापल्या पध्दतीने पूर्ण विचार करायचा हे आधीच ठरलं होतं . त्यामुळे क्रोध , हताशपणा , निराशा असं काही निदान व्यक्त तरी नाही झालं . दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रयासाने मी संयम बाळगून होते . पण श्रीच्या लक्षात आला होता माझ्यातला बदल . इतका व्यग्र असूनही म्हणाला , " बरं नाहिए का ? ए आईय , मी परत येणार आहे ." त्याही स्थितीत मला हसू आलं . अमेरिकेतल्या अलीबाबाच्या गुहेत जाणाऱ्या बहुतेक प्रत्येक मुलाचं हे वाक्य आणि त्यावर विश्वास ठेवल्यासारखं दाखवणारे माझ्यासारखे पालक ! पण मी हसल्यामुळे श्री मात्र खूश झाला .
.
. . रात्री जेवणं झाल्यावर मीच विषय काढला . " श्री , ती सलोनी .....'
.
. " झालं का पुन्हा तुझं सोनालीपुराण सुरु ? "
.
. " सोनाली नाही . सलोनी ! " बहुतेक नकळत माझा आवाज चढला असावा . सर्वानीच माझ्याकडे चमकून पाहिलं .
.
. . श्री हाताने मला शांत होण्याची खूण करत म्हणाला , " अग , हो . हो ! चिडतेस काय एकदम . सोनाली काय आणि सलोनी काय ! बरं ! काय झालं त्या सोना ..... सॉरी ... सलोनीचं ? "
.
. . आता सूत्र ह्यांनी हातात घेतली . त्यांनी सरळ विचारलं , " श्री तू तिला लग्नाचं वचन दिलं होतंस ?"
.
. " मी ? " तो फ्रीजमधून काढत असलेला आईस्क्रीमचा डबा त्याच्या हातातून निसटतच होता . त्याने कसाबसा तो सांभाळला .
.
. मी सांगत असलेलं सर्व त्याने शांतपणे ऐकलं . उठला . म्हणाला ," चला आपण तिच्या घरी जाऊ ! "
.
. " आत्ता ? अरे नऊ वाजून गेलेत . झोपले असतील "
. " झोपले असतील तर उठवूया . आपली झोप उडवायची नसेल तर त्यांना जागं करायलाच हवं . आत्ताच ! तुम्ही येणार आहात का ? नाहीतर मी एकटा जातो . "#सुरेखामोंडकर . ०४/०३/२०१७
*क्रमशः

भास आभास ( भाग १ )

. #भास_आभास ( भाग १ )
. . सकाळच्या कोवळ्या उन्हात , अंगणातल्या झोपाळ्यावर मी पेपर वाचत बसले होते . खूप दिवसांनी अचानक आलेल्या ह्या गारव्यात उबदार उन्ह सुखद वाटत होतं पेपरवर कुणाचीतरी सावली पडली म्हणून दचकून वरती पाहिलं. रोज सकाळी फिरायला जाताना हमखास भेटणाऱ्या बाई आणि त्यांची मुलगी उभ्या होत्या . मी थक्कच झाले . नेहमी भेट होत असल्यानं एकमेकींकडे बघून हसणं - कधी दूरवर असलोतर हात करणं , एखाद्यावेळी भेट नाही झाली तर , " दिसला नाहीत बऱ्याच दिवसांत ! " असं एखादं वाक्य टाकणं , एवढीच ओळख होती आमची . पण तेवढ्या ओळखीवर त्या अशा अगदी घरी येऊन उभ्या राहतील असं वाटलं नव्हतं ..
.
. " अरे ! तुम्ही ? " मी गडबडूनच गेले होते . '
.
." हो ! आज आला नाहीत तुम्ही टेकडीवर ! दोन दिवस सर्दी पण झाली होती ना तुम्हांला ! बरं नाहिए की काय ? आम्ही ह्याच रस्त्याने जात होतो . तुम्हांला बाहेर बसलेलं पाहिलं ; म्हटलं , हालहवाल विचारून जाऊया . तब्येत ठीक आहे ना ? "
.
. " हो , हो ! एकदम छान . सकाळी जरा जास्तच गारवा होता ना , सर्दी वाढायला नको म्हणून नाही आले आज चालायला . आता संध्याकाळी जाईन , " मनात आलंच , ह्यांच्या कसं लक्षात आलं मला सर्दी झालीय ते ! सूक्ष्म निरीक्षण दिसतंय . पण आता मी स्थिरस्थावर झाले होते . अजून त्या उभ्याच आहेत हे माझ्या लक्षात आलं . " बसा ना ! " मी झोपाळ्यावर जरा सरकून त्यांना बसायला जागा करून दिली .इतका वेळ शांतपणे बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या मुलीला पण म्हटलं , " बस गं! उभी का तू ? " एक छोटंसं स्मितहास्य पण न देता , आंब्याच्या झाडाखाली मुद्दामहून ठेवलेल्या एका मोठ्या दगडावर जाऊन ती बसली .
.
. . बसायला तर सांगितलं , पण संभाषण पुढे कसं न्यायचं तेच माझ्या लक्षात येईना . रोज भेटत होतो खरं , पण मला त्यांचं नाव देखील माहीत नव्हतं . जवळच असलेल्या टेकडीवर सकाळी खूप जण व्यायामाच्या निमित्ताने फिरायला येतात . नियमित येणार्यांची एकमेकांशी तोंडओळख होतेच . मग त्यातूनच स्मितहास्याची ; सुप्रभात ; हरि ओम ; जय मातादी ! अशा निरनिराळ्या शुभेच्छाची देवाणघेवाण होते . पण तेवढंच . थांबून एकमेकांशी गप्पा मारायला कोणालाच वेळ नसतो . त्यामुळे नावबिव समजायची शक्यता तशी कमीच असते .. आता काय करावं ह्या विचारात मी असतानाच त्या म्हणाल्या , " श्री च्या आई , बाग छान आहे हं तुमची . हा झोपाळा , दगडांच्या केलेल्या बैठका , ह्या मुळे कसं अगदी गावच्यासारखं वातावरण वाटतं . "
.
. . . मी दचकलेच . म्हणजे ह्या बाई मला ओळखताहेत . ते पण ' श्री ची आई 'म्हणून . म्हणजे आम्ही खूप जवळच्या परिचित आहोत की काय ? मग मला कशा ह्या आठवत नाहीत ? मी मनातल्या मनात डोक्यावर चार टपल्या मारून नाव आठवायचा प्रयत्न केला . पण छे ! मेंदू पूर्णपणे कोरा ! जरा देखील आठवेना ,
.
. . अशा वेळेला खूप पंचाईत होते . समोरची व्यक्ती इतकी जवळीक दाखवत असताना आपल्याला तिचं नाव पण आठवत नाहीए , हे व्यक्त करताना आपल्याला थोडं अपराधी वाटतं . त्यांच्या स्नेहाचा अपमान केल्यासारखंही वाटतं . कसं चलाखीनं ह्यांचं नाव जाणून घ्यावं ह्या विचारात मी असतानाच त्या पुढे म्हणाल्या " सलोनी , अगं पाहिलंस का . ह्यांच्याकडे लाजाळूची झाडं पण आहेत हं ! अगं , त्यांना नुसता स्पर्श जरी झाला ना , तरी त्यांची पानं मिटून जातात . जा ना बघ हात लावून ! "
.
. .ही सलोनी काय ! वा ! सुंदर ! छान नाव आहे . तिला शोभेल असंच . माझा प्रश्न सुटला . मी ' श्री ची आई ' तर ह्या ' सलोनीच्या आई .' माझ्या मनातला ताण गेला . सलोनी लाजाळूच्या मिटल्यापानासारखा चेहरा ठेवून उठली . शांतपणे लाजाळूच्या रोपांना हात लावून आली . जणू काही नेमून दिल्याप्रमाणे पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली . ती त्या निसर्गाच्या सान्निध्यात असूनसुद्धा त्यात नसल्यासारखी वाटत होती . माझ्या लक्षात आलं , तिला आवडलं नसणार आईचं असं आगंतुकासारखं माझ्याकडे येणं . मनाविरुद्ध अगदी नाईलाजाने तिला यावं लागलं असणार . आता बाहेर पडल्यावर ही चांगली झापणार आहे आईला . श्री पण असाच करतो . काही मनाविरुद्ध करावं लागलं तर चार जणांसमोर आमचा मान ठेवतो , पण मग मात्र चांगलंच कीर्तन करतो . तिला थोडंसं मोकळं वाटावं म्हणून मीच म्हटलं , " सलोनी , एखादं फूल आवडलं असेल तर सांग , मी देते तुला तोडून ." तशाच शांत चेहऱ्याने एखाद्या बाहुलीसारखी ती फुलझाडांकडे गेली . राग कमी झालेला दिसत नव्हता .
.
. . सलोनीची आई मात्र सहजपणे सगळीकडे बघत होती . " तुमचं घर पण छान आहे . आतून तर खूपच छान असणार ". त्यांची इच्छा माझ्या लक्षात आली . मी सवयीने लवकर उठते , पण माझं घर मात्र अजून झोपलेलंच होतं . बाई पण अजून आल्या नव्हत्या . पारोशा घरात एवढ्या अल्पपरिचयावर कोणाला ते दाखविण्यासाठी आत नेण्याची माझी इच्छा नव्हती . मी हसून उत्तर द्यायचं टाळलं .
.
. अजूनही मला संभाषण वाढवता येत नव्हतं . माझी अस्वस्थता कदाचित त्यांच्या देखील लक्षात आली असेल . " अग बाई ; उशीरच झाला . बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही . ' " मनगटी घड्याळाकडे बघत त्या म्हणाल्या . " सलोनी , चला निघूया ! " आज्ञाधारकपणे ती आईबरोबर निघाली . तिने माझ्याकडे एकही फूल मागितलं नाही , आणि मी देखील स्वतःहून दिलं नाही .
.
. . गेटपाशी जाऊन त्या थोड्या घुटमळल्या . वळून म्हणाल्या ," श्री नाहीए का घरात ? "
.
. " आहे , पण अजून उठला नाही ! "
.
. " आलोच आहोत तर त्याला भेटून गेलो असतो . सलोनीचा मित्र आहे ना तो . अमेरिकेला चाललाय ना ? परत कधी भेटेल कोण जाणे ! "
.
." अहो भेटेल की . जायला अजून खूप अवकाश आहे . सलोनी त्याच्या वर्गात होती का ? "
.
.' "हो ना ! बरोबरच शिकले दोघे . खूप दोस्ती बरं का दोघांची ! "
.
.त्या सलोनी , श्री आणि त्यांचा मित्रपरिवार ह्याबद्दल बरंच काही सांगत होत्या . सलोनी गप्पच होती . मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं . जरा आश्चर्यच वाटलं . श्रीने मला कधीच कसं काही सांगितलं नाही ? खरं म्हणजे त्याचे सर्व मित्र , मैत्रिणी नेहमी आमच्या घरी येत .त्यांच्या कुटुंबाशी पण आमचे घरोब्याचे संबंध तयार झाले होते . आमच्या घराची गच्ची मोठी असल्यामुळे कोजागिरी , गाण्याचे कार्यक्रम , एखाद्याचे नाट्य वाचन , नाहीतर नुसताच धांगडधिंगा करायला अड्डा आमच्याचकडे असायचा . पण त्यात सलोनीला पाहिल्याचं मला आठवत नव्हतं .आणि सलोनीसारख्या देखण्या मुलीकडे दुर्लक्ष होणं शक्यच नव्हतं. एखाद्या मॉडेल सारखी उंची , डौलदार बांधा . लांब , घनदाट केस . सावळी तजेलदार कांती आणि सौम्य शांत चेहरा . खूप आवडली होती मला ती .#सुरेखामोंडकर ०४/०३/२०१७
*क्रमशः
LikeShow more reactions

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

नटसम्राट ( सिनेमा )

.
.
.~~~~~~~~~~~~~~~~~~~ नटसम्राट ~~~~~~~~~~~~
. रविवारची दुपार म्हणजे , मन चाहेल ते करण्याचा परवाना असतो . नेहमीच नाही हं ; पण बरेच वेळेला . काल खूप दिवसांनी मला असा रिकामा , शांत , आळशी रविवार मिळाला . दुपारी यू ट्यूब वर मराठी नाटक " नटसम्राट " पाहिलं .
नटसम्राट हे सदाहरित नाटक आहे ; अजरामर ! कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर ह्या सिद्हस्त , प्रतिभावान लेखकाने , प्रत्येकाला गुंतवून ठेवणारं हे नाटक लिहिलं. १९७० मध्ये दि गोवा हिंदू असोशिअशन ह्या संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणलं . तेव्हां अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती . त्यांनी बरेच प्रयोग केले . उत्कृष्ट कलाकार , ती भूमिका प्रत्यक्ष जगत असतो .ह्या शोकांतिकेचा कलाकारावर मानसिक ताण येतो .मन: स्वास्थ्या वर परिणाम व्हायला लागल्यावर डॉ. लागूनी ही भूमिका सोडली . नाटक सुरूच राहिलं होतं . त्यानंतर सतीश दुभाषी , यशवंत दत्त अशा अनेक कलाकारांनी ही भूमिका साकार केली . हे शिव धनुष्य होतं . येरागबाळयाला पेलण्या सारखं नव्हतं . ही भूमिका साकारणे हे कलाकाराला आव्हान होतं . नामवंत अभिनेते ही भूमिका मिळणे म्हणजे आपले भाग्य मानत असत ; ते त्यांचं स्वप्न असे .
मी डॉ. लागूंची भूमिका पाहिली ; तेव्हां सरकार होत्या शांता जोग . नंतर दत्ता भट यांनी साकारलेली व्यक्तिरेखा पाहिली . ऐशीच्या पहिल्या पंचकात दूरदर्शनवर देखील हे नाटक सादर करण्यात आलं होतं . शेक्सपिअरच्या एकाहून अनेक कलाकृतीवर हे नाटक बेतलेलं आहे . पण हे भाषांतर किवा रुपांतर नाही . तात्यासाहेब शिरवाडकर यांनी त्याला अस्सल मराठी मातीचा , वातावरणाचा , कुटुंब संस्थेचा गंध दिला आहे .
काल नटसम्राट पाहताना ते सगळे मंतरलेले दिवस ; एकंदरीतच रंगभूमीचा सुवर्णकाळ आठवला .ह्या नाटकाचं चित्रीकरण श्रीराम लागूंच्या उतार वयात , त्यांना कंपवात सुरु झाल्यावर केलेलं आहे . भूमिकेला ते अत्यंत शोभून दिसतात . नाटकाचं लेखन पण दमदार आहे . शिरवाडकरांची स्वगते लागूंनी अतिशय सहजपणे पेलली आहेत . त्यांचे उच्चार , शब्दांची फेक , शब्दांचं वजन , प्रेक्षकांपर्यंत नेमका आशय पोचवण्याच सामर्थ्य ; आपल्याला अचंबित करतं . सुरकुतलेल्या चेहऱ्या वरचे भाव ; डोळ्यातील विषण्णता , हाताशता , आनंद , दुखः , वेदना , समाधान - नाना भावना आपल्या काळजाला हात घालतात . नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हा एक वस्तूपाठ आहे
अप्पासाहेब आणि सरकार मुलीकडे जायला स्टेशन वर उतरतात . खूप वाट पाहिल्या नंतर गडबडीने ; समाधानाने दोघेही मुलीकडे जायला निघतात . बरोबर आणलेला फिरकीचा तांब्या आणि हातात धरायची काठी तिथेच विसरतात . ( खऱ्या नाटकात नाही हं! चित्रित नाटकात ! ह्याला आम्ही' दिग्दर्शकाच्या डुलक्या' म्हणतो ) फिरकीचा पितळी तांब्या इतका सुबक होता . माझ्या अगदी मनात भरला होता . नाटकाशी मी इतकी एकरूप झाले होते की न राहवून दोनदा तीनदा ओरडले , " सरकार , तांब्या राहिला ! " पण कोणी माझ्याकडे लक्षच दिलं नाही . ढुंकूनही पाहिलं नाही . माझा जीव हळहळत राहिला. शेवटी एका प्रसंगात तो तांब्या टेबलावर दिसला ; तेव्हां कुठे माझा जीव तांब्यात .. म्हणजे आपलं... भांड्यात पडला .
आता नटसम्राट सिनेमा विषयी . थांबा थांबा , पळू नका . मी त्या बद्दल काहीही लिहिणार नाहीये . कारण मी अजून तो पाहिलाच नाहीये . काही आठवडे सिनेमा धोधो चालल्या नंतर त्यात ' नाना आणि विक्रम गोखले ' यांचा एक सीन नव्याने घातल्याचं जाहीर करण्यात आलं . सिनेमा धावायला लागला . आतल्या गोटातून बातमी आहे की पुढच्या आठवड्यात ' विक्रम गोखले आणि नाना ' यांचे आणखीन एक दृश्य नव्याने घालण्यात येणार आहे . मी तेव्हां सिनेमा पाहणार आहे . तर.... पुढच्या आठवड्यात लिहीन ' नटसम्राट ' सिनेमावर !!
#सुरेखा मोंडकर
०८/०२/२०१६

अनुभव


.
.
आमच्या गावात माध्यमिक आणि पुढील शिक्षणाची काही सोय नव्हती . शिक्षणासाठी म्हणून गावाच्या बाहेर पडलो . शहराच्या अलिबाबाच्या गुहेला बाहेर पडायची वाट नव्हती . गोष्टीतल्या सिंहाच्या गुहेत जसे फक्त आत जाणाऱ्या प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसायचे ; बाहेर येणारे ठसेच नसायचे , तसंच हे शहराच्या बाबतीत सुद्धा !
.
. . खूप वर्ष गावाकडची याद सतावत होती . आज शेवटी आलोच गावी . सगळं बदललंय . माझं गांव मलाच ओळखता येत नाहीये . खाडीच्या काठाकाठाने शहराकडे जाणारा एक रस्ता होता . जाताना खूप दूर पर्यंत त्याने माझी सोबत केली होती ; पण ती खाडीच आता दिसत नव्हती . गडप झाली होती . खाडी , तळी , विहिरी सगळंच बुजवलं होतं . तिवरांची जंगलं , वाड्या , आमराया सगळं सफाचट झालं होतं . ह्या गगनाला भिडणाऱ्या इमारतींच्या जंजाळात मला माझं , लहानपणीचं छोट्ट घर शोधून काढायचं होतं . ज्या वाड्यात आम्ही तिन्ही त्रिकाळ उच्छाद घालायचो , तो पाटलाचा वाडा शोधायचा होता . समोरच एक पोलीस स्टेशन दिसलं . रम्याची आठवण आली . म्हटलं बघूया त्याचा काही ठावठिकाणा लागतोय का ! भेटला तर त्याच्याच संगतीनं गांव पालथा घालू . लहानपणी विटीदांडू खेळताना करायचो तसा . ह्याच पोलीस स्टेशन मध्ये तो होता .
. . शिरलोच आत मध्ये . कोणीतरी दखल घेई पर्यंत , भिंतीवर लावलेले गुन्हेगारांचे फोटो बघत बसलो . शेवटी हात हालवत बाहेर पडलो . रम्या आता तिथे नव्हताच . पण पाटलाच्या वाड्याचा मात्र पत्ता मिळाला . पोचलो तिथे . आबाबाबाबा ! वाडा कसला बकिंगह्याम प्यालेसच होता तो ! पण आता तो पाटलाचा वाडा नव्हता , इनामदाराचा होता . पम्यापण दोस्तच माझा ! म्हटलं बघूया भेटतो का !
.
. . गेट वरचा दरवान पाहिल्यावर पोटात गोळाच आला . जुन्या सिनेमात दाखवतात तसा चंबळ च्या खोर्यातला डाकू वाटत होता . ह्या भल्यामोठ्या मिशा , त्यातच कानाशिलाकडचे कल्ले मिसळले होते , चेहराभर नुसत्या मिशाच मिशा .मनाचा हिय्या करून त्याला विचारलं . कायम पम्या म्हणायची संवय , त्याचं नावच आठवेना . शेवटी साहेब भेटतील का , म्हणून विचारलं . महालात फोन , नोंद वहीत संपूर्ण माहिती , मेटल डिटेक्टर मधून तपासणी , अंगाची चाचपणी असे सगळे सोपस्कार करून एकदाचा आत गेलो . माझी गाडी मात्र मला गेटच्या बाहेरच ठेवावी लागली .
.
. . जाताना दोन्ही बाजूला कमांडोंची कतार . दहशत बसेल असे एकेक चेहरे . महालात मात्र दिवाणखान्यातच शाही इतमानात पम्या बसला होता . मला पाहिल्या बरोबर , दोन्ही हात पसरून उठला , मला गळामिठी मारलीन . मी खुश , इतक्या वर्षानी देखील मला ओळखलं म्हणून आणि अचंबित ; पाचवीतच शाळा सोडल्या नंतर ह्याची स्मरणशक्ती एवढी कशी वाढली ह्या कल्पनेने . बोलता बोलता कळल त्याने अबराकाडबरा युनिवर्सिटीची डॉक्टरेट मिळवली होती .
.
. . माझं आगतस्वागत तर जंगी झालं . सोन्याच्या ट्रोली वर ठेवलेल्या सोन्याच्या टी सेट मधून मला चहा देण्यात आला . मी प्यायलो नाही , ओठ आणि जीभ भाजेल ह्या भीतीने ! बिस्किटं पण होती . ती देखील मी खाल्ली नाही . कोण जाणे , सोन्याच्या बिस्किटांना ग्लुकोज चा मुलामा दिलेला असायचा ! एक म्हणता दोन व्हायचं ! दाताचा तुकडाच पडायचा ! ट्रोली घेऊन आलेला माणूसही नखशिखांत सोन्याने लहडलेला होता . गळ्यात मनगटा एवढ्या जाडीच्या डझनभर सोन्याच्या चेनी , मनगटात , दंडावर , कमरे भोवती , बोटात , सगळीकडे निरनिराळ्या आकारात सोनंच सोनं . एवढंच काय त्याची स्लीपर देखील सोन्याची होती . हा चेहरा देखील मला ओळखीचा वाटला होता . एकाच वेळी भीतीने माझ्या पोटात खड्डा पडून त्यात वटवाघळ उडत होती ; मित्राचा उत्कर्ष बघून अभिमानाने भरून आलेल्या हृदयात फुलपाखर उडत होती ; मेंदूत नाना विचारांचा गुंता होऊन , त्यात कोळी कोळिष्टके करीत होता . .
.
. . एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला . अरेच्या ह्या सगळ्यांचे फोटो मी पोलीस स्टेशनच्या भिंतीवर wanted च्या यादीत पाहिले होते .हा चहा देणार्याचा फोटो गंठण आणि चेनी खेचाणार्यांच्या विभागात होता . मी बाहेर जाण्यासाठी धडपडून , गांगरून उभा राहिलो . पम्या मात्र चाणाक्ष , अंतर्ज्ञानी . त्याने माझा जांगडगुठ्ठा बरोब्बर ओळखला . माझ्या पाठीवर थोपटत म्हणाला , " तुला वाटतंय ते खरं आहे . अरे हे सगळे गुन्हेगार माझ्या चाकरीला आहेत म्हणूनच तर पोलिसांना सापडत नाहीयेत . मी त्यांना मोठ्या उदार मनाने आधी माझ्याच घरात कामाला ठेवलेत . आता हळूहळू मी त्यांना सुधारणार आहे . माझ्याच घरात असल्यामुळे मला ते सोपेही जाणार आहे . नाहीतर कुठे शोधत फिरू मी त्यांना सुधारण्यासाठी !! मित्रा एक लक्षात ठेव सज्जन ..दुर्जन ; सत्य .. असत्य ..." तो थोडा घुटमळला
" पुण्य ... पाप ; चांगले ... वाईट " मी म्हणालो .
.
.तो हसला ! खळखळून , गडगडून आणि म्हणाला , " शाब्बास ! तर मी काय म्हणत होतो , ह्या सगळ्यांमध्ये नेहमी सज्जन , सत्य , पुण्य , चांगले ह्यांचाच विजय होत असतो . दोस्ता , अंतिम विजय आपलाच आहे . " मला त्याची तळमळ कळत होती . त्याची कळकळ माझ्या जिव्हारी जाऊन पोचली होती .
.
. मी मुंडी हलवली .पुन्हा पम्याने मला मिठी मारली . कमांडोंच्या पहाऱ्यातून मी बाहेर आलो . दरवानाने गेट उघडलं . मी माझ्या गाडीकडे वळलो .... आणि मटकन खालीच बसलो . गाडीची चारी चाकं , स्टीअरिंग व्हील , डेक सगळं चोरीला गेलं होतं . सैरावैरा धावतच मी पुन्हा महालाच्या गेट कडे वळलो . गेट बंद होतं ,पण दरवानाच्या चौकीत मला एकावर एक ठेवलेली चार चाकं आणि इतर वस्तू दिसत होत्या .
.
. मी दाणदाण गेट वाजवायला सुरुवात केली . कोणीही माझी दखल नाही घेतली . कमांडोंची ट्रिगर वरची बोटं मला दिसली . मी मुकाट्याने खाली मुंडी घालून रस्त्यावर आलो . आता काय करावं बर ! रिक्षाने जवळच्या पोलीस स्टेशन वर जावं की शहाण्यासारखं एखादं ग्यारेज गाठावं ? काहीही करायचं तर पैसे तर हवेत ! मी खिशात हात घातला आणि ....
.
. . पम्याच्या गळामिठीचं रहस्य मला कळल . पैश्याचं पाकीट गुल झालेलं होतं . मी कपाळावर हात मारला आणि स्वतःला कोसत , पाय फरफटवत , समजुतदारपणे स्टेशनच्या दिशेने चालायला सुरुवात केली .